Jump to content

ऊदा देवी

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट

ऊदा देवी १८५७ च्या स्वातंत्रयुद्धातील एक लढवय्यी होती, जिने जुलमी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढा दिला.

१८५७ च्या उठावातील ऊदा देवी आणि आणि इतर दलित स्त्री योद्ध्याचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने वीरांगना म्हणून त्यांचे स्मरण केले जाते.[]

ऐतिहासिक घटना[संपादन | स्रोत संपादित करा]

भारतीय लोकांमधील ब्रिटीश प्रशासनाविरुद्ध वाढत जाणारा राग पाहून, ऊदा देवी जिल्ह्याच्या राणीकडे, म्हणजे बेगम हजरत महलकडे युद्धात सहभागी होण्यासाठी गेली. येऊ घातलेल्या युद्धासाठी तयार रहाण्याकरिता बेगम हजरत महलने तिला स्त्रियांची पलटण उभी करण्यासाठी मदत केली.[] जेव्हा ब्रिटिशांनी अवधवर हल्ला केला तेव्हा ऊदा देवी आणि तिचा नवरा दोघेही सशस्त्र प्रतिकारात सहभागी झाले. जेव्हा तिला तिच्या नवऱ्याला लढाईत वीरमरण आल्याचे समजले तेव्हा तिने पूर्ण शक्तीनिशी शेवटची मोहीम उघडली.[] जेव्हा ब्रिटिशांनी कॉलीन कॅंपबेल ह्याच्या नेतृत्वाखाली लखनौ शहरातील सिकंदर बागेवर हल्ला केला, तेव्हा त्याला दलित स्त्री लष्कराचा सामना करावा लागला. लढाईच्या ह्या क्षणांविषयी कविता लिहिल्या गेल्या आहेत आणि अनेक गीते गायली गेली आहेत. त्यापैकी एक गाणे:

“कोई उनको हब्सीन कहता, कोई कहता नीच अछूत”
“अबला कोई उन्हे बतलाए, कोई कहे उन्हे मजबूत”

(त्यांना कोणी काळी आफ्रिकी गुलाम म्हणते, तर कोणी शुद्र-अस्पृश्य, काही जण त्यांना अबला म्हणतात, तर काही जण सामर्थ्यवान म्हणतात.)[]

सिकंदरबागचे युद्ध[संपादन | स्रोत संपादित करा]

नोव्हेंबर १८५७ मध्ये सिकंदर बाग येथे ऊदा देवी यांनी ब्रिटीश सैन्याशी युद्ध केले. आपल्या सैन्याला युद्धासाठी सुचना देऊन झाल्यावर ऊदा देवी स्वतः पिंपळाच्या झाडावर चढल्या आणि आपल्या बंदुकीने पुढे सरसावणाऱ्या ब्रिटीश फ़ौजेवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळच्या एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या लक्षात आले की, अनेक सैनिकांना वरच्या दिशेने आलेल्या गोळ्यांनी ठार केलेले होते.[] वरून येणाऱ्या गोळ्या आसपासच्या झाडांवर लपून बसलेल्या नेमबाजाच्या बंदूकीतून येत असाव्यात असा अंदाज त्या अधिकाऱ्याने बांधला आणि आपल्या सैनिकांना आसपासच्या झाडांवर गोळीबार करण्यास सांगितले. झाडावरून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला मारून खाली पाडण्यात यश आल्यावर, त्यांनी तपासले असता ती ऊदा देवी होती. विल्यम फ़ोर्ब्स-मिशेल यांच्या रेमिनिसन्सेस ऑफ़ द ग्रेट म्युटीनी या पुस्तकात ऊदा देवी बद्दल ते लिहितात, "ती दोन जुन्या बनावटीच्या काव्हीलरी पिस्तूलांनी सज्ज होती, एक तीच्या हातात तर दुसरे कमर पट्ट्यात खोवलेले होते आणि त्यातल्या गोळ्या अजुनही भरलेल्या होत्या, तिच्या जवळ गोळ्यांनी भरलेला एक बटवा होता, तिने स्वतःच युद्धापूर्वी काळजीपूर्वक तयार केलेल्या लपायच्या झाडावरील जागेवरून सहा पेक्षा जास्त सैनिकांना ठार केले होते."[] पिलभीतचा पासी समुदाय, प्रत्येक दरवर्षी नोव्हेंबरच्या 16 तारखेला ऊदा देवींचा हुतात्मादिन साजरा करण्यासाठी एकत्र येतो.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]