द बर्डन ऑफ रेफ्यूज
द बर्डन ऑफ रेफ्यूज[१] हे ऋता कोठारी[२] यांनी लिहिलेले पुस्तक आहे. हे ओरिएंट लॉंगमनने २००७ साली प्रकाशित केले.
पुस्तकाची पार्श्वभूमी संपादन
या पुस्तकात १९४७ साली भारताच्या झालेल्या फाळणीनंतर गुजरातमध्ये आसरा घेतलेल्या हिंदू-सिंधी समूहातील लोक व त्यांची स्वसमूहाबद्दलची अस्मिता व आपुलकी यांची दखल घेतली आहे. हिंदू-सिंधी समूहाचे अनुभव हे नेहमीच्या फाळणीच्या इतिहासाप्रमाणे नाहीत. भारतामध्ये स्थलांतरित झालेला हा समूह रक्तरंजित हिंसाचाराने ग्रस्त झालेला नसला तरी विस्थापन, भीती व अस्वस्थता हे अनुभव त्यांना आले. सिंध प्रांतामधील श्रीमंत असा हा व्यापारी समूह भारतामध्ये रेफ्युजी (निर्वासित) म्हणून स्थलांतरित झाला तेव्हा त्यांच्याकडे जमीन नव्हती व अतिशय मर्यादित संसाधने होती. गुजरातमधील हिंदू गुजराती लोकांकडून त्यांना जो परकेपणा व विरोध सहन करावा लागला. याचा परिणाम म्हणजे नंतरच्या पिढ्यांनी एकतर त्यांचे सिंधीपण हे सोडून दिले किंवा नवीन प्रदेशात पर्भावी असलेल्या हिंदुत्वाच्या चौकटीमध्ये योग्यप्रकारे बसेल अशा प्रकारे स्वतःला घडविले.
सारांश संपादन
१९४७ मध्ये भारतामध्ये सिंधी-हिंदू समूहाचे स्थलांतर करण्याच्या निर्णय व त्याचे परिणाम याची चर्चा कोठारी यांनी केली आहे; पण त्यासोबतच २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीमध्ये मुस्लिम समूहाविरुद्ध झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक सिंधी सहभागी होते याची देखील चिकित्सा केली आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये कोठारी यांचे संशोधन संदर्भानुसार मांडलेले असून २००२ नंतरच्या गुजरातमध्ये समूहाच्या अस्मिता जेव्हा आधीच अधिक ताठर झालेल्या होत्या त्या पार्श्वभूमीचा आढावा घेतला आहे.
पहिल्या प्रकरणामध्ये सिंधी-हिंदू समूहाचे सामाजिक-धार्मिक जग हे वसाहतपूर्व सिंध प्रांतामध्ये मुस्लिम राज्यकर्ते व हिंदू-सिंधी बनिया (व्यापारी) यांच्यात समतोल राखणारे होते. जरी हे दोन समूह हे संघर्ष व सलगी असे वातावरण असलेल्या राज्यामध्ये रहात असले; तरी या प्रदेशामधील समूहांच्या अस्मिता नेहमी प्रवाही होत्या हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हिंदू-सिंधी समाजातील लोक हे सिंधमध्ये असताना इस्लाम, शीख आणि सुफी या विचारसरणीने प्रभावित असलेला हिंदुधर्म आचरीत होते. त्यांच्यामध्ये असलेल्या समान भाषा-संस्कृतीमुळे सिंधी-हिंदू समूहात एक विशिष्ट सिंधी अस्मिता निर्माण झाली होती; या अस्मितेची जागा आता श्रद्धेने घेतली आहे.
दुसऱ्या प्रकरणामध्ये सिंध प्रांताचा वसाहत काळाचा अनुभव रेखाटला आहे. एक प्रांत म्हणून मागासलेला असला तरी देखील सिंध प्रांत हा वसाहत काळात लक्ष वेधणारा का ठरला हे सुरुवातीला सांगितले आहे. वसाहतवाद्यांनी शिक्षण आणि जमीन यांच्यात जी सुधारणा केली तिचा मोठा फायदा हिंदूंना झाला आणि त्यायोगे आर्थिक व व्यवसायाच्या संधी निर्माण करून सिंध प्रदेश हा उर्वरित हिंदुस्थानाशि चांगल्याप्रकारे समरस झाला होता. कोठारी यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून झालेल्या सामाजिक सुधारणांचा देखील आढावा घेतला आहे, उदा. आर्य समाज. वसाहतकालीन सिंध प्रांतामध्ये सिंधी मुस्लिम समूहामध्ये राजकीय दृष्ट्यादेखील जागृती होण्यास सुरुवात झाली होती. हे सर्व घटक पुढील काळामध्ये वेगळ्या सिंध प्रांतासाठी झालेल्या चळवळीमध्ये निर्णायक ठरले व १९३८ मध्ये सिंध हा एक स्वायत्त (?) असा प्रांत बनला.
प्रकरण तीनमध्ये फाळणीपूर्व पहिल्या दशकामध्ये स्वायत्त (?) सिंध प्रांतामध्ये झालेल्या वेगवेगळया घटनांची चर्चा केली आहे. या घटनांचे परिणाम हे हिंदू आणि मुस्लिम यांच्यासाठी वेगवेगळे होते. विभक्त सिंध प्रांतामध्ये झालेली पहिली निवडणूक, मस्जिद मंझिल बद्दल वादविवाद आणि मुस्लिम लीगने निर्माण केलेला इस्लामचा ब्रॅंड. यांतूनच पुढील काळात पाकिस्तानसाठी पाठिंबा तयार झाला. कोठारी यांनी सिंधी-हिंदू यांचा उल्लेख हिंदू महासभा, काँग्रेस आणि गांधींची अहिंसेबद्दल सततची विनवणी या सर्वांच्या वादविवादामध्ये अडकलेले असा केला आहे. यामागील महत्त्वाची पार्श्वभूमी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यांनी मोठ्याप्रमाणात हिंदूंचा पाठिंबा संपादन केला आणि हिंदू अस्मिता अधिक दृढ केली. शिकरपूर कॉलनी बॉम्बहल्ला ही त्या काळातील महत्त्वाची घटना होती. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सिंध प्रांतामध्ये हिंदू व मुस्लिम अस्मितांचे वेगाने होणारे ध्रुवीकरण, या प्रक्रियेमध्ये RSS हा हिंदूंसोबत तर मुस्लिम लीग हे मुस्लिमांसोबत व्यवहारात होते. या व्यतिरिक्त प्रांतिक अस्मिता या भाषा, संस्कृती आणि सुफिवाद या इतर लहान लहान मार्गांनी टिकून राहिल्या होत्या.
चौथ्या प्रकरणामध्ये हिंदू-सिंधींचे भारतामध्ये झालेल्या स्थलांतराची प्रक्रिया तीन विस्तृत उदाहरणांमधून सांगितली आहे. यातील पहिले म्हणजे दंगलीच्या आठवणी; ज्या शारीरिक इजेपेक्षा देखील आधी भीतिदायक होत्या तसेच त्याचे आर्थिक परिणाम देखील मोठ्या स्वरूपात होते. दुसरे म्हणजे राज्यांतर्गत संवाद आणि तिसरे म्हणजे राज्यसंस्था व जनता यांच्यातील नाते; जे लक्षणीयरीत्या बदलत गेले. या प्रकरणामध्ये व्यक्तींचा मौखिक इतिहास व आठवणी याबद्दल माहिती दिली आहे, आणि हे देखील नमूद केले आहे की, फाळणीचे अनुभव हे व्यवसाय, वर्ग आणि लिंगभाव यांच्याशी अप्रत्यक्षपणे संबंधित होते. जे सिंधी-मुस्लिम पाकिस्तानमध्ये राहिले त्यांचा अभ्यास केल्यावर कोठारी यांना समजले की, हिंदूंच्या स्थलांतराबद्दलच्या त्यांच्या आठवणी या दुखःद व वेदनादायक आहेत, तसेच त्यांच्या भूतकाळातील आठवणी या त्यांच्या वर्तमानाने अंधुक झालेल्या होत्या.
पाचव्या प्रकरणामध्ये भारतातील हिंदू-सिंधी स्थलांतरित लोकांची सध्या काय परिस्थिती आहे, वच हा समूह त्यांचे जीवन उभे करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करीत आहे याचा एक अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातमधील स्थलांतर व पुनर्वसन यांचे संदर्भ हे सिद्ध करतो की, त्या काळातील अनुभव हे सगळ्यांचे सारखे नव्हते. प्रकरण सहा हे गुजरातमध्ये कायमचे स्थिर झालेल्या सिंधी-हिंदू यांच्या तरुण पिढीवर प्रकाश टाकणारे आहे. त्यांच्यामध्ये सिंधी असण्याबद्दल वाटणारी शरम आणि तिटकारा या भावनांचे विश्लेषण केले आहे. गुजरातमधील सिंधी-हिंदूबद्दल जी नकारात्मक गृहीतके आहेत त्याची चर्चा तर केली आहेच; पण प्रामुख्याने या समूहामध्ये वाढत जाणारी हिंदू अस्मिता यावर लक्ष केंद्रित केले आहे, आणि २००२ च्या हिंसाचारात सिंधी लोकांनी जी भूमिका घेतली त्याचे विश्लेषण केले आहे.
निष्कर्षामध्ये कोठारी अधोरेखित करतात की, सदर पुस्तक हे सिंधींना त्यांच्या मूळ ठिकाणी परत जा असे अपील करणारे नसून सिंधींनी आत्मपरीक्षण करण्याची वृत्ती वाढविणे आवश्यक आहे असे मांडते. हिंदू-सिंधींनी कलंकित नसेलेले सिंधीपण निर्माण करावे, म्हणजे त्यात समाविष्ट व्हायचे की नाही हे व्यक्तीला स्वतःला ठरविता येईल.
प्रतिक्रिया संपादन
२०१३ साली DNA या वृत्तपत्राला मुलाखत देताना ऋता कोठारी म्हणाल्या की, या पुस्तकामध्ये त्यांनी सिंधी समूहाला स्थलांतराच्या अनुषंगाने जे परिणाम भोगावे लागले त्यांची, आणि त्यांची गुजरातमध्ये स्थायिक होण्याची प्रक्रिया हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याच मुलाखतीमध्ये त्या दावा करतात की, 'सिंधीं'च्या स्थलांतराचा अनुभवाची जितकी दखल घेतली जाणे आवश्यक होते तितकी ती घेतली गेली नाही. [३]
JNU मधील अभ्यासक सुरिंदर एस. जोधका म्हणाल्या की, ऋता कोठारी यांचे पुस्तक हा गुजरातमधील सिंधी लोकांचा वेधक असा लेखाजोखात्मक अभ्यास असून त्याद्वारे त्यांच्या हृदयस्पर्शी दैनंदिन जीवनाचा आपल्याला परिचय होतो. . दुर्दैवाने हे पुस्तक लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवांपलीकडे जात नाही.[४]