लखीमी बरुआ
लखीमी बरुआ ह्या एक भारतीय बँकर , सामाजिक कार्यकर्त्या आणि आसामच्या पहिल्या महिला सहकारी बँक 'कोनोकलता (मराठी:कनक-लता) महिला नागरी सहकारी बँकेच्या' संस्थापक आहेत. ही सहकारी बँक विशेष करून महिला ग्राहकांसाठी असून या बँकेच्या सर्व कर्मचारी सुद्धा महिला आहेत. आसामच्या महिलांना आर्थिक सशक्तीकरणाच्या योगदानासाठी आणि त्याकरिता घेतलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्कार (भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार) देऊन सन्मानित केले.[१][२][३][४][५][६][७][८][९]
प्रारंभिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
बरुआचा जन्म जोरहाट, आसाम येथे झाला. बरुआ लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यांचा पुढील सांभाळ त्यांच्या वडिलांनी केला. घरची परिस्थिती अगदी सामान्य होती. बरुआचे पदवी काळातील शिक्षणास सुरुवात झाली आणि अचानक त्यांच्या वडिलांचा पण मृत्यू झाला. आता त्यांचा पुढील सांभाळ त्यांच्या नातेवाईकांनी सुरू केला. नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने बरुआने १९६९ मध्ये आपले पुढील शिक्षण बंद केले. इ.स. १९७३ मध्ये सरळ, शांत आणि सुस्वभावी प्रभात बरुआ सोबत लखीमींचे लग्न झाले.[१०] आपल्या पतीच्या प्रेरणेने लखीमी बरुआ यांनी परत एकदा आपल्या शिक्षणास सुरुवात केली. जोरहाट येथील वाहना कॉलेज मधून इस १९८० मध्ये त्यां पदवीधर झाल्या. त्याच वेळी त्यांना डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बँकेत अकाउंटेंट मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली.[१] त्यावेळेस गरीब अशिक्षित, विशेष करून चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या असहाय महिलांची आर्थिक ससेहोलपट त्यांना जवळून अनुभवायला मिळाली. शेवटी इस १९९० मध्ये त्यांनी बँकेतील नोकरी सोडून दिली आणि कनकलता महिला कोऑपरेटिव बँकेची स्थापना केली. बँकेचे नाव भारत छोडो आंदोलनात हुतात्मा झालेल्या सोळा वर्षीय 'कनकलता बरुआ' यांच्या नावावरून ठेवण्यात आले. बँकेच्या रजिस्ट्रेशन आणि संपूर्ण प्रक्रियेस आठ वर्षे लागली. फेब्रुवारी २००० मध्ये त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘कमर्शियल बँकिंग’चा परवाना प्राप्त झाला. पुढील वीस वर्षांत बँकेच्या विविध शाखांत ४३,००० पेक्षा जास्त खातेदार निर्माण झाले.[११]
पुरस्कार आणि सन्मान[संपादन | स्रोत संपादित करा]
लखीमी बरुआ यांना त्यांच्या योगदानासाठी आणि आसामच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या प्रयत्नांसाठी बरेच पुरस्कार मिळाले. मार्च २०१६ मध्ये महिला सशक्तिकरण मधील त्यांच्या असामान्य योगदानासाठी पूर्व राष्ट्रपति प्रणव मुखर्जीच्या हस्ते त्यांना नारी शक्ती पुरस्कार दिल्या गेला. त्यानंतर इ.स. २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.[४][१२]
पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]
- देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार - (२०१५))[३]
- नारी शक्ती पुरस्कार (२०१६)[१३]
- जिंगल पुरस्कार - (२०१९)[१४]
- पद्मश्री - (२०२१)[३][१]