Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
शिवराम हरी राजगुरू - मराठीपिडिया Jump to content

शिवराम हरी राजगुरू

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र शिवराम हरी राजगुरू (जन्म : खेड-पुणॆ, २४ ऑगस्ट १९०८; - लाहोर, २३ मार्च १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. लाला लजपत राय यांच्यावर जेम्स स्कॉट नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीहल्ला केला, त्यात जखमी होऊन ते मरण पावले. त्याचा बदला घेण्यासाठी १७ फेब्रुवारी १९२८ रोजी राजगुरू, भगतसिंग यांनी लाहोर येथे साँडर्सवर ( जेम्स स्कॉटला मारताना चुकून )गोळ्या घालून त्यांना ठार केले.

नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही राजगुरूंचा सहभाग होता, २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग व सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली.

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे ऑगस्ट २४, इ.स. १९०८ रोजी एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे.

स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग[संपादन | स्रोत संपादित करा]

लहानपणी १४व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले. आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयत, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने - वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणात जात होता. त्या काळी कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झाशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती, आणि काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते.

मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री हनुमान आखाड्यात व्यायामविशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले. त्यानंतर ते पुन्हा काशीत परतले. दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय झाला आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात घेतले. 'आपणासारिखे करिती तात्काळ' असे आझाद, अन्‌ 'दुजांसारखे होती तात्काळ' असे राजगुरू, एकत्र आले आणि त्यांचे ३६ गुण जुळाले. इंग्रज सरकारशी ३६चा आकडा हेच या गुणांचे फलित होते आणि या ध्येयासाठी व हौतात्म्यासाठी राजगुरू कायमच उतावळे असायचे. या संदर्भातील त्यांच्या भावना, त्यांचे वागणेच विलक्षण होते, त्यागासाठी ते कायम तयार, आसुसलेले होते. ही भावना इतकी पराकोटीची होती की, आपल्या आधी भगतसिंह किंवा इतर कोणीही फासावर चढू नये ही त्यांची इच्छा होती.

आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले, पण थेट कार्यवाही करायची वेळ आली आणि तुझ्याजोगे काम निघाले, तर तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल, असे सांगून आझाद निघून गेले. काही दिवसांनंतर राजगुरूंजोगे काम निघाले. पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिव वर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली. दोघेही दिल्लीत आले. पण पिस्तूल एकच असल्याने व गद्दार जिवाला घाबरून घराबाहेर क्वचितच पडत असल्याने त्यांची पंचाईत झाली. रात्री ७ ते ८ या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात असे, त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे, असे ठरवून दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी वर्मा लाहोरला गेले आणि तीन दिवसांनंतर परतले ते पिस्तूल न घेताच. सायंकाळ असल्याने शर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागीच पोहोचले, आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्चलाइट, गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली होती. इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वेरुळांतून पळ काढला. पोलीस गोळ्या झाडू लागले, त्या वेळी त्यांनी रेल्वेरुळांखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते. एव्हाना पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि चारी बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू झाला. ही शोधमोहीम जवळजवळ २-३ तास सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल-पाण्यात, काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पनादेखील पोलिसांना नव्हती. पोलिसांनी नाद सोडून दिला. पोलीस गेल्यावर मथुरेच्या दिशेने राजगुरू पळत सुटले. पुढील २ स्थानके त्यांनी पळतच पार केली. नंतर मथुरेच्या गाडीत बसून मथुरेत आले. येथे यमुनेकाठी कपडे धुऊन वाळूतच झोपले. तिसऱ्या दिवशी कानपूरला येऊन त्यांनी हा किस्सा ऐकवल्यानंतर वर्मांना धक्काच बसला!

राजगुरूंची भारताला खरी ओळख झाली ती साँडर्सच्या वधाच्या वेळी!

साँडर्सची हत्या[संपादन | स्रोत संपादित करा]

त्या काळी सायमन कमिशन एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला आले. लाहोरला पंजाबकेसरी लाला लजपतराय यांनी कमिशनची वाट अडवली. पोलीस अधिकारी स्कॉट याने साँडर्स याच्यासमवेत लालाजींवर जबरदस्त लाठीमार केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या दिवशीच सायंकाळी लाहोरच्या प्रचंड सभेत देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी गरजल्या, ‘‘लालाजीकी चिता की आग ठंडी होने के पहलेही किसी भारतीय नौजवान ने इस क्रूरता का बदला लेना चाहिये!’’ त्यांच्या या शब्दांनी सरदार भगतसिंह व्याकूळ झाले. त्यांनी स्कॉटला मारण्याचा प्रस्ताव पार्टीत मांडला. स्कॉटला मारल्यानंतर न्यायालयासमोर तर्कसंगत भाषण करणे आवश्यक होते, की स्कॉटला का मारावे लागले? आणि हे काम भगतसिंह करू शकत होते. पण राजगुरूंना हे मान्य नव्हते. राजगुरू हट्टाने पेटून उठले. त्यांना मोहिमेत सामील केले गेले.

योजना अशी आखण्यात आली की, मालरोड पोलीस स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि भगतसिंग व राजगुरू त्याच्या इशाऱ्यावर गोळीबार करतील. पण ४ दिवस स्कॉट त्या भागात फिरकलाच नाही. शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जय गोपाळने भगतसिंहांना खूण केली की हाच स्कॉट असावा, यावर भगतसिंहांनी खुणेनेच सांगितले की हा नसावा, पण ही ‘नसावा’ची खूण राजगुरूंच्या लक्षातच आली नाही. राजगुरूंनी साहेबाच्या दिशेने गोळी झाडली. लगेचच भगतसिहांनी आपल्या पिस्तुलातून ८ गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवे केले. एव्हाना गोळ्यांचा आवाज ऐकून चौकीतील लोक बाहेर जमले. त्यातला एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून गेला. राजगुरूंचे पिस्तूल नेमके या वेळी चालत नव्हते. त्यामुळे राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याला कमरेला धरून इतक्या जोरात आपटले, की तो सर्व गोंधळ संपेपर्यंत तो उठलाच नाही. या सर्व गडबडीत भगतसिंह यांच्या पिस्तुलातील ‘मॅगझिन’ खाली पडले. राजगुरूंच्या हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी प्रसंगावधान राखत, स्वतःचा जीव धोक्यात घालून, ते मॅगझिन शिताफीने उचलले. या राजगुरूंच्या कृतीमुळे चंद्रशेखर आझादांसह त्यांचे सर्व सहकारी राजगुरूंवर खूष झाले.

साँडर्सच्या हत्येनंतर लाहोरहून भगतसिंग एका मिलिटरी ऑफिसरच्या वेषात राजकोटला निसटले. (या वेळी भगवतीचरण व्होरा यांच्या पत्नी दुर्गाभाभी यांनी भगतसिंहांच्या पत्‍नी असल्याचे नाटक तान्ह्या लेकरासह केले होते.) राजगुरू त्यांचे नोकर आणि आझाद हे मथुरेतील पंड्याच्या रूपात भगतसिंहाबरोबर होते. तिघेही दिवसाढवळ्या, `जागृत' पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून, एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले.

त्यानंतरच्या काळात राजगुरूंनी लाठीकाठीचा वर्ग अगदी काशीच्या मुख्य पोलीस स्टेशनसमोर कंपनीबागेत सुरू ठेवला. राजगुरूंच्या या धारिष्ट्यास काही सीमाच नव्हती. बरेच महिने राजगुरू काशीत उघडपणे, निर्भयतेने वावरत होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या धनुष्यबाणाचे कौशल्यही लोकांनी गणेशोत्सवात पाहिले. पण कोणासही कल्पना नव्हती की इतका साधा दिसणारा मनुष्य मोठा क्रांतिकारक असेल! अनेक महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले. पण अखेर सप्टेंबर, १९२९ मध्ये ते पुणे येथे पोलिसांच्या ताब्यात सापडले. पुढे जेलमध्ये आमरण उपोषण, न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार ह्या घटना घडल्या. भगतसिंग, सुखदेव व अन्य काही क्रांतिकारक त्यांच्या समवेत होतेच. सर्व क्रांतिकारकांना आपले भविष्य माहीत होतेच, पण शिवराम राजगुरूंना मित्र भेटल्याचा आनंद झाला, तसेच राजगुरू भेटल्यामुळे इतरांमध्येही एक चैतन्य निर्माण झाले. सर्वांना राजकीय कैदी म्हणून वागणूक मिळावी यासाठी क्रांतिकारकांनी उपोषण सुरू केले. राजगुरू अर्थातच पुढाकार घेत होते. डॉक्टर रोज सकाळी १०-१२ सहकाऱ्यांना घेऊन रबरी नळीने, जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्‍न करीत. या पोलिसांच्या प्रयत्‍नांमुळे राजगुरूंसह सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागला, शारीरिक हाल-अपेष्टांचा सामना करावा लागला. पण याही स्थितीत सर्वच जण उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते.

फाशी[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
Front page of The Tribune announcing the executions

लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंगसुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंगसुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठी हुसेनीवाला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.[] या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो.

फाशीवर प्रतिक्रिया[संपादन | स्रोत संपादित करा]

कराची येथे काँग्रेस पक्षाच्या वार्षिक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विशेषतः पत्रकारांना फाशीची माहिती देण्यात आली.न्यू यॉर्क टाइम्सने अहवाल दिला :

संयुक्त प्रांतातील कानपूर शहरात दहशतीचे साम्राज्य आणि कराचीबाहेरील तरुणाने महात्मा गांधींवर केलेला हल्ला. ही भगतसिंग आणि दोन साथीदारांना फाशी देण्याच्या भारतीयांनी दिलेले होते.[]

वारसा आणि स्मारके[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
राजगुरू यांच्या स्मृत्यर्थ काढलेले पोस्टाचे तिकीट

राष्ट्रीय शहीद स्मारक[संपादन | स्रोत संपादित करा]

राजगुरूंचे राष्ट्रीय स्मारक भारताच्या पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला येथे आहे. लाहोर तुरूंगात फाशी दिल्यानंतर शिवाराम राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव थापर यांचे मृतदेह गुप्तपणे येथे आणण्यात आले होते. अधिकाऱ्यानी  त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो.स्मारकात श्रद्धांजली व आदरांजली वाहिली जाते.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
राष्ट्रीय शहीद स्मारक, हुसैनीवाला

राजगुरुनगर[संपादन | स्रोत संपादित करा]

शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावाचे खेड हे नाव बदलून राजगुरुनगर असे करण्यात आले..[][]

राजगुरू वाडा[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सध्याच्या राजगुरुनगरमधील राजगुरू वाडा

राजगुरू वाडा हे राजगुरूंचा जन्म झालेले त्यांचे वडिलोपार्जित घर आहे.२,७८८ चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेली ही वास्तू पुणे-नाशिक रोडवरील भीमा नदीच्या काठावर आहे. शिवराम राजगुरू यांचे स्मारक म्हणून ते राखले जात आहे. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती (एचआरएसएस) ही स्थानिक संस्था २००४ पासून प्रजासत्ताक दिनी येथे राष्ट्रध्वज फडकावते.[]

साचा:संदर्भनोंदी

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

अशफाक उल्ला खान

बटुकेश्वर दत्त

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा