लाठमार होली
लाठमार होली हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यात साजरा होणारा होळी उत्सव आहे.[१] मथुरा, वृंदावन या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्त्व आहे.[२]
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
पौराणिक कथेनुसार मानले जाते की श्रीकृष्णाने राधा आणि तिच्या सख्यांची खोडी काढली आणि त्यांना चिडवले. त्यामुळे गोपी कृष्णावर आणि त्याच्या मित्रांवर लाठी उगारू लागल्या, ते पाहून कृष्ण आणी त्याचे सर्व सवंगडी पाळायला लागले. या घटनेची आठवण म्हणून लाठमार होळी साजरी केली जाते. पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिला हातात जाड लाकडी काठी घेऊन पुरुषांवर उगारतात आणि त्याचा मार टाळण्यासाठी पुरुष गावभर धावत सुटतात, ढाल हातात घेऊन स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मनोरंजन आणि खेळ असाही हेतू आहे.[३]
स्वरूप[संपादन | स्रोत संपादित करा]
वसंत पंचमी पासून हा उत्सव सुरू होत असून पुढे सुमारे ४० दिवस याचे आयोजन असते. प्रत्येक मंदिरात आणि छोट्या गावांमध्ये लोक विविध प्रकारे या उत्सवाचा आनंद घेतात. होळीच्या आदल्या दिवशी नंदगाव , बरसाना, मथुरा या उत्तर प्रदेश मधील छोट्या गावांमध्ये हा सण साजरा होतो.[४] लाठ म्हणजे लाकडाची एक जाडसर काठी.बरसाना येथील राधा राणी मंदिरात याची सुरुवात होते.[५] आठवडाभर चालणा-या या सोहळ्यात लोक नृत्य, संगीत , आणि एकमेकांना रंग लावण्याचा आनंद घेतात. थंडाई (पेय) नावाचे एक विशेष पेय यानिमित्ताने प्यायले जाते. द्वारकाधीश मंदिरातून यानिमित्त कृष्णाची विशेष पालखी निघते आणि याची मिरवणूक प्रसिद्ध आहे.