नारायणराव पेशवे
साचा:इतिहासलेखन साचा:माहितीचौकट राज्याधिकारी डिसेंबर १७७२ मध्ये माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव हे पेशवे झाले. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खून केला. आणि, १७७३ मध्ये राघोबादादा स्वतःच पेशवे झाले. नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावाच्या खुनाचा ठपका राघोबादादांवर ठेवला, राघोबांनी निमूटपणे पेशवेपदाचा राजीनामा देऊन नारायणरावाचा पुत्र माधवराव २रा म्हणजेच सवाई माधवराव यास गादीवर बसवले. १७९६ पर्यंत त्यांनी गादी चालवली. सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली. खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकून राहिले, बादशहाने त्यांना वजीर म्हणून नेमणूक करायचा प्रस्ताव दिला, पण अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ती वस्त्रे पुण्यास पाठवून पेशव्यांना वजीर नेमले. दिल्लीच्या नाड्या पुनः पुण्याच्या हातात आल्या याचेच हे पुरावे होते. इथे मराठ्यांनी इंग्रजांची २-३ राजकीय व लष्करी आक्रमणे परतवून लावली. यामुळे "जबतक नाना तबतक पुना" असे भारतभर म्हंटले जाऊ लागले.
हत्या
वयाच्या १८व्या वर्षी नारायणरावाची हत्या झाली.
मराठ्यांच्या इतिहासात पेशवेपद पूर्वीपासून असले तरी ते प्रत्यक्ष राज्यकारभार करत नव्हते. त्या पदास प्रथम सत्तेच्या केंद्रस्थानी आणले ते बाळाजी विश्वनाथ भट ह्याने. तो मुळचा श्रीवर्धनचा (कोकण) होता. औरंगजेबाच्या कैदेतून परत आलेल्या शाहूला त्याने मदतीचा हात दिला, त्यामुळे छत्रपती शाहूंनी त्याच्या मृत्यूनंतर बऱ्याच जणांचा विरोध डावलत त्याचा मुलगा बाजीराव यास पेशवेपद दिले. पहिला बाजीराव हा अतिशय पराक्रमी निघाला येथून ते पद वंशपंरपंरागत बनले.
बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा दुसरा मुलगा चिमाजी अप्पा हे सदैव बाजीरावांसोबत राहिले. त्यांना एक मुलगा झाला. ते सदाशिवराव भाऊ . बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा नानासाहेब हे पेशवे बनले. नानासाहेबास ३ मुले झाली. विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव.
पानिपताच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांची मोठी हानी झाली. स्वतः सदाशिवरावभाऊ व विश्वासराव हे लढाईत मारले गेले. या धक्क्यानंतर कालांतराने नानासाहेब पेशवे दगावले. यावेळी अशी परिस्थिती होती, नानासाहेब पेशवे यांचे वरिष्ठ पुत्र विश्वासराव जिवंत नव्हते. सर्वात वरिष्ठ होते ते रघुनाथराव (बाजीरावांचा थोरला मुलगा) होते. पण पेशवेपद वरिष्ठता न बघता वंशपरंपरा ठेवत, ते नानासाहेबांचे दुसरे पुत्र माधवराव यांकडे आले. माधवराव पेशव्यांचाही २७ वर्षाच्या आयुष्य जगून विनासंतान मृत्यू झाला. यानंतरही पेशवेपद त्यांच्या भावाला नारायणरावाला दिले गेले. पेशवे पदापासून दोनदा डावलले जात पोरससवदा तरुणांना पेशवेपद दिल्याने रघुनाथराव नाराज झाले. त्यांना ईर्षेला इतर काही मंडळींनीही खतपाणी घातले. यामुळे रघुनाथराव काहीसे लहरी वागत.
माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका असणारे रघुनाथराव ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. अखेर आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने त्यांची सत्तालालसा वाढली. व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. याचा काहीसा संदेह जरी पेशव्यांकडील मंडळींना असला, तरी गारदी खुद्द पेशव्याविरोधात काही आगळीक करण्याची शक्यता इतकी तीव्र वाटली नाही. कारण इब्राहिम गारदीने पानिपतावर पेशव्यांकडून लढत अतुल्य पराक्रम गाजवला होता. अखेर अब्दालीने त्याला जिवंत पकडले तरी हालहाल करत मारले. म्हणुन त्यानंतर कौतुक म्हणुन शनिवारवाड्याची सर्व सुरक्षा माधवराव पेशवयांनी गारद्यांकडेच दिली होती. पण रघुनाथरावाच्या पत्नी आनंदीबाई यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठ्तील मजकुर " नारायणरावांस धरावे" ऐवजी "नारायणरावांस मारावे" असा केला. मराठीतील 'धचा मा करणे' ही म्हण याच प्रसंगावरून पडली. गारद्यांनी चिठ्ठीनुसार नारायणराव पेशव्यांची हत्या केली. नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावाला पेशवेपद मिळाले. पण ते तात्पुरते ठरले. त्याच्या विरोधात बंड तर झालेच शिवाय नारायणरावांच्या हत्येनंतर जन्माला आलेल्या मुलालाच पेशवा बनवले गेले.