नालंदा विद्यापीठ
नालंदा विश्वविद्यालय हे बिहारमधील नालंदा येथे असलेले भारतातील व जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध शिक्षणकेंद्र होते[१][२].jay hind
पार्श्वभूमी संपादन
नालंदा हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असून तेथेच विश्वविद्यालयाची वास्तू होती. सद्यस्थितीत तिचे भग्नावशेष शिल्लक आहेत. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विश्वविद्यालयाची स्थापना झाली होती. सम्राट हर्षाच्या काळात हे विश्वविद्यालय भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विश्वविद्यालयाचे नाव नलविहार असे होते. सम्राट हर्षवर्धनाने शंभर खेडी विश्वविद्यालयाच्या खर्चासाठी दान दिलेली होती. या खेड्यातील लोक विश्वविद्यालयाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवीत.
परिसर संपादन
विश्वविद्यालयाचा परिसर अनेक चौरसमैल क्षेत्रफळाचा होता. येथे भव्य अशा इमारती होत्या. तीनशे खोल्यांचे वसतीगृह, ऐंशी सभागृहे, शंभर अध्यापन कक्ष आणि ग्रहताऱ्यांच्या खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी उंच मनोरे होते. विश्वविद्यालयाच्या परिसरात बागा, उपवने, तलाव, रस्ते होते.
ग्रंथालय संपादन
नालंदा विश्वविद्यालयात अनेकमजली भव्य धर्ममायायोग नावाचे ग्रंथालय होते. ग्रंथालयाच्या तीन उपविभागांना रत्नोदधी, रत्नसागर, आणि रत्नरंजक अशी नावे होती[३]. त्यात हजारो हस्तलिखिते व ग्रंथ होते.
अध्ययन संपादन
विश्वविद्यालयात १०००० विद्यार्थी शिक्षण घेत होते, त्यांतले ३००० तर विश्वविद्यालयाच्या वसतीगृहात रहात होते. विश्वविद्यालयात शिक्षण घेणाऱ्यांत चीन,कोरिया व तिबेट येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रवेश देण्यासाठी कठीण अशी द्वारपरीक्षा घेतली जात असे. अभ्यासक्रमात हीनयान व महायान पंथाच्या तत्त्वज्ञानाबरोबरच वेदाध्ययन, अध्यात्म, व्याकरण, हेतुविद्या, आयुर्वेद, सांख्यदर्शन, धर्मशास्त्रे, ज्योतिष, व पाणिनीसूत्रे या विषयांचा समावेश होता. बौद्ध व पाणिनीच्या सूत्रसंग्रह अभ्यासाला विशेष महत्त्व होते. शीलभद्र हे विश्वविद्यालयाचे मुख्य आचार्य (कुलगुरू) होते आणि धर्मपाल, जिनमित्र, प्रभामित्र व चंद्रपाल, शांतरक्षित, आतिश, आर्यदेव, ज्ञानचंद्र व वसुबंधू आदी विविध विषयातील तज्ज्ञ आचार्य अध्यापनाचे कार्य करीत होते. विश्वविद्यालयात एकूण १५७० अध्यापक होते. विश्वविद्यालयाच्या विविध सभागृहांत रात्रंदिवस वादविवाद, परिसंवाद, प्रश्नोत्तरे व चर्चासत्रे चालत.
अस्त संपादन
इ.स. ११९३ साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने नालंदा नगरावर आक्रमण करून ही नगरी पूर्णपणे उध्वस्त केली आणि नालंदा विश्वविद्यालयही जाळून टाकले [४]. विश्वविद्यालयाचे ग्रंथालय तर कित्येक महिने जळत होते. चाग लुत्सावा या तिबेटी माणसाने ज्यावेळी इ.स. १२३५ला या ठिकाणी भेट दिली त्यावेळी जिथे १०००० विद्यार्थी व शेकडो आचार्य अध्ययन-अध्यापन करत होते. तिथे त्याला ९० वर्षाचे वयोवृद्ध आचार्य राहुल श्रीभद्र हे फक्त ७० विद्यार्थ्यांच्या तुकडीला अध्यापन करताना आढळले.[५].
मागोवा संपादन
- ज्या ठिकाणी नालंदा विश्वविद्यालयाचे अवशेष आहेत त्याच्याच जवळच्या परिसरात नव्याने नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ निर्मितीच्या हालचाली चालू आहेत. त्यासाठीचा नालंदा विद्यापीठ अधिनियम २०१० [६] हा २१ ऑगस्ट, इ.स. २०१० रोजी भारतीय संसदेच्या राज्यसभेने तर २६ ऑगस्ट, इ.स. २०१० रोजी भारतीय संसदेच्या लोकसभेने मंजूर केला. अधिनियम मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी तो २१ सप्टेंबर, इ.स. २०१०ला राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला [७] व राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर २५ नोव्हेंबर, इ.स. २०१० पासून नालंदा विद्यापीठ कायदा २०१० अस्तित्वात आला.
- जपान आणि सिंगापूरच्या सरकारने या नवीन विद्यापीठासाठी संयुक्तपणे ४.५ अब्ज अमेरिकन डॉलरची मदत देऊ केलेली आहे [८].
- नोव्हेंबर १५, इ.स. २०११ रोजी चीनचे भारतातील राजदूत चांग यान यांनी १ अब्ज अमेरिकन डॉलरांचा धनादेश नवनिर्मित विद्यापीठात ग्रंथालय निर्मितीसाठी भारताकडे सुपूर्द केला [९].