नेताजी पालकर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

नेताजी पालकर हे दीर्घ काळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दुसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मुळचे गांव रायगढ़ जिल्हातील चौक गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली.. अफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र पुरंदरच्या तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी वादविवादाचा बनाव करून त्यांना मोगलाकडे पाठविले, त्यांनी आदीलशहावर आक्रमन केले.मुघलांनी त्यांचे धर्मांतर केले. नेताजींना अरबस्तानात पाठविले.तसेच त्यांना नजरकैदेत ठेवले. यामुळे ते स्वराज्यापासून दूर होते.त्यांनी मुघलांची चाकरी केली, पण नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधी पार पाडून त्यांना परत हिंदू धर्मात प्रवेश दिला, व त्यांच्या मुलाचा जानोजीचा स्वतःच्या मुलीशी विवाह करून दिला. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचीही चाकरी केली होती.

पुरंदर तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, सरसेनापती नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापती सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात सरसेनापती नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली. महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले. मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्ऱ्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले.

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्ग्ऱ्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला, आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्ऱ्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे 'मुहम्मद कुलीखान' असे नामकरण करण्यात आले (जून १६६७). औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पण पुढे ९ वर्षे नेताजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. मग त्याने या 'मुहम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. १९ जून १६७६ रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना संकेश्वर येथील मंदिरात पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले.

महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणीसाहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई यांचे नेताजींशी काय नाते होते हे फार मोठे प्रश्नचिन्ह अजूनही आहे. 'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते. [स्रोत- वरील सर्व माहिती राजा शिवछत्रपति (लेखक- बाबासाहेब पुरंदरे) आणि छावा (लेखक- शिवाजी सावंत) या दोन ग्रंथांमधून घेतलेली आहे.]

नेताजी पालकर यांची समाधी तामसा (तालुका .हदगाव, जि.नांदेड) येथे आहे.

नेताजी पालकर यांच्याविषयी लिहिली गेलेली मराठी पुस्तके/चित्रपट

  • नेताजी पालकर (चित्रपट, १९७८, दिग्दर्शक कमलाकर तोरणे)
  • अग्निदिव्य (कल्याणीरमण बेन्नुरवार)
  • नेताजी पालकर (जगदीश खेबुडकर)
  • नेताजी पालकर : स्वराज्याच्या पहिल्या घनघोर संग्रामात, मिचेल मॅकमिलन यांनी पाहिलेले (लेखक - मायकेल मॅकमिलन, मराठी अनुवाद - पंढरीनाथ सावंत)
  • शिवबाचा शिलेदार (कादंबरी, ल.ना. जोशी)

संदर्भ

साचा:मराठा साम्राज्य