भूषणगड
भौगोलिक स्थान
सातारा जिल्ह्यातील माण तसेच खटाव तालुक्यातील तालुक्याचे गाव वडूज आहे. वडूज हे गावा सातारा, कऱ्हाड, फलटण, दहिवडी यांच्याशी गाडीमार्गाने जोडले गेले आहे.
जाण्यासाठी मार्ग
वडूजच्या दक्षिणेकडे साधारण पंचविस तीस कि. मी. वर भूषणगड हा किल्ला आहे. भूषणगडाचा डोंगर एकांड्या असल्यामुळे तो खूप दूरूनही ओळखून येतो. वडूजमधून भूषणगडाला जाण्यासाठी ठरावीक एस.टी. बसेस आहेत. वडूज-पुसेसावळी गाडीरस्त्यावर पळशी गाव आहे. येथून चालतही भूषणगडला जाता येते. हे अंतर पाच किलोमीटर असून रस्ता कच्चा आहे.
घडण व पहाण्यासारखी ठिकाणे
भूषणगड किल्ल्याच्या पायथ्याशीच भूषणगड नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात येण्यासाठी चारही बाजूने रस्ते आहेत. गडाची गडदेवता हरणाईमाता ही अनेकाच्या श्रद्धास्थानी आहे. भूषणगड गावातून किल्ल्याकडे निघाल्यावर आपल्या स्वागताला एक कमान उभी केलेली आहे. येथूनच गडावर जाणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग नव्यानेच बांधून काढला आहे. भक्तांच्या अर्थसहाय्यातून हा मार्ग व गडाची देवता हरणाई मातेचे मंदिर नव्याने बांधले गेले आहे.
समुद्रसपाटीपासून ९०४ मीटर उंच असलेला भूषणगड चढण्यासाठी पायथ्यापासून २० मिनिटे लागतात. दरवाजाच्या २५ फूट खाली एक वाट तटबंदीच्या खालून उजवीकडे जाते. गडाच्या पश्चिम बुरुजाला वळसा मारुन ती मागच्या बाजूच्या मंदिरापर्यंत जाते. तेथे घुमटीवजा मंदिर आहे. घुमटीमधे देवीची मूर्ती असून तिचे नाव भुयारी देवी आहे. येथून पुन्हा फिरुन दरवाजाकडे यावे लागते. दाराजवळ म्हसोबा मंदिर आहे.
येथून दरवाजाची बांधणी दिसते. पायऱ्यांच्या बाजूला संरक्षक भिंत बांधून दरवाजाची सुरक्षितता वाढवली आहे. पायऱ्यांच्या वर दोन्ही बाजुंना भक्कम बुरुज बांधून आतल्या बाजूला दरवाजा घेऊन दोन्ही बुरुजांच्या कह्यात तो ठेवला आहे. वळणदार मार्गावरच्या या दरवाजावर खालून तोफांचा मारा करणे अशक्य होते.
दरवाजाची कमान पडलेली आहे. येथून पुढे गेल्यावर सरळ वाट पश्चिम कड्यावर जाते. तर डावीकडील वाट माथ्याकडे जाते. भूषणगडाचा एकूणच विस्तार लहान आहे. माथा चारही अंगाने तटबंदीने सुरक्षीत केलेला असून जागोजागी पहाऱ्यासाठी बुरुज बांधले आहेत. गडावर सुशोभिकरणासाठी लावलेल्या झुडूपांनी आता तटबंदी व घरांची जोती आच्छादली गेली आहेत. भूषणगडाचा आकार साधारण त्रिकोणी आहे. या तिन्ही टोकावर टेहाळणीसाठी बुरुज आहेत. या तिन्ही टोकांच्या मध्यभागी उंचवटा असून त्यावर हरणाई मातेचे मंदिर आहे. पुर्वी हे मंदिर जमिनीच्या पातळीखाली होते. ते आता उचलून पातळीवर नव्याने बांधले आहे. मंदिरासमोर दिपमाळ आहे. मंदिराच्या बाजूलाच धर्मशाळा असून येथे मुक्काम करणाऱ्यांची सोय होवू शकते.
भूषणगडाला लागून एकही डोंगर नाही त्यामुळे गडावरून चारही बाजूला दूरपर्यंत शत्रूवर नजर ठेवणे शक्य होते. येथून औंधची यमाई, महिमानगड, शिखर शिंगणापूर ही दृष्टीस पडतात.
पाण्याची सोय
गडावर पाण्याचा अभावच आहे. पूर्व बाजूच्या कड्याच्या पोटात म्हणजे भूषणगडाच्या अर्ध्या डोंगरातील एका कपारीत पाण्याचे टाके आहे. तेथून पंपाने पाणी वर ओढून पुरवठा केला जातो.
इतिहास
आदिलशाही कडून हा किल्ला शिवशाहीत दाखल झाला. पुढे औरंगजेबाच्या ताब्यात हा किल्ला होता. पुढे मराठेशाही मधे हा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला.