महा विषुव संक्रांती
महा विषुव संक्रांती हा ओरिसा राज्यातील हिंदू आणि बौद्ध उपासकांचा नवीन वर्ष स्वागताचा महत्त्वाचा सण मानला जातो.[१] यालाच पान संक्रांत (ପଣା ସଂକ୍ରାନ୍ତି) असेही म्हटले जाते. सौर कालगणनेवर आधारित असलेला हा दिवस मेष या पारंपरिक महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. ग्रेगोरियन कालगणनेनुसार हा दिवस १४ एप्रिल या दिवशी येतो.
स्वरूप
या दिवशी शिव, शक्ती आणि हनुमान यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते. हा दिवस हनुमानाची जन्मतिथी मानला जातो.[२][३] तीर्थक्षेत्री जाऊन लोक नदीमध्ये पवित्र मानले गेलेले स्नान करतात. जत्रांचे आणि मेळ्याचे आयोजन या दिवशी केले जाते. नारळाचे पाणी, कैरीचा रस आणि दही घातलेले पेय या दिवशी आवर्जून प्यायले जाते.या दिवसाचे पान संक्रांत हे नाव या पेयामुळे पडले आहे.[४] या दिवशी मिठाई वाटली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो.
- पान संक्रांतीला जे पेय विशेषत्वाने केले जाते त्याची कृती- दही किंवा दुधात साखर घालावी. त्यानंतर त्यात आंब्याचा रस, नारळाचे पाणी, वेलची पूड असे घालून ढवळावे. आवडीप्रमाणे त्यात सफरचंद, द्राक्ष, केळे या फळांचे तुकडे घालावेत. सुकामेवा घालून सजावट करावी आणि प्यायला द्यावे.[५]
मंदिरातील पूजा
हा दिवस ओरिसा राज्यातील लोक देवदर्शनाने साजरा करतात. जगन्नाथपुरी येथील मंदिरात कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तीची विशेष पूजा केली जाते.[६]