Jump to content

मोहन धारिया

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट संसद सदस्य मोहन धारिया(जन्म : नाते, १४ फेब्रुवारी इ.स.१९२५ मृत्यु : पुणे, १४ ऑक्टोबर २०१३) हे भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक होते.त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील नाते या गावी झाला. त्यांचे वडी्ल मूळचे गुजराथचे, पण ते महाराष्ट्रात येऊन व्यवसायानिमित्त कोकणात स्थायिक झाले होते.

पूर्वीचे जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

मॅट्रिक परीक्षेनंतर त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. त्यांनी महाड येथे सेवादलात असताना वयाच्या १६व्या वर्षी १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यावेळी त्यांना शिक्षाही झाली होती. पुणे विद्यापीठाची कायद्याची पदवी घेऊन ते मुंबई हायकोर्टात वकील झाले.[]

प्रमुख योगदान व कार्ये[संपादन | स्रोत संपादित करा]

मोहन धारिया यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी 'लोकसेना' नावाची संस्था सुरू केली. आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी शेकडो तरुणांना संघटित केले. शिवाय वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणून मोहन धारिया यांनी पुण्यात 'नॅशनल लेबर सेंटर'ची स्थापना केली. ते १९५७ ते १९६० या काळात पुणे महापालिकेत नगरसेवक होते.सन १९६४ ते १९७० या काळात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९७१ ते १९७९ या काळात ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य व १९७१ ते १९७५ या दरम्यान योजना, बांधकाम, गृहनिर्माण व नगरविकास या खात्यांचे राज्यमंत्री झाले. पुढे केंद्रीय मंत्री झाल्यावर वाणिज्य, ताग, कापड, नागरी पुरवठा व सहकार या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या वेळी रोजगार निर्मिती, लोकसंख्या, रास्त दरात अन्नधान्य, पायाभूत सुविधा यांसह विविध विषयांवर त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन धारियांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी तयार व सादर केलेला 'धारिया कमिटी रिपोर्ट' हा शिक्षित बेरोजगारांसाठी एक महत्त्वाचा अहवाल स्वीकारला गेला. त्यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला. तत्त्वासाठी मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे धारिया हीकमेव मंत्री होते.[]

खासदार असताना मोहन धारिया यांनी १९७०मध्ये संयुक्त राष्ट्रसभेत (युनो) भारताचे प्रतिनिधित्व केले. जोहान्सबर्ग येथे झालेल्या शाश्वत विकासाबाबतच्या जागतिक शिखर परिषदेत गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळाचे ते प्रमुख होते. राजीव गांधी आणि चंद्रशेखरया पंतप्रधानांच्या आग्रहाखातर त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद स्वीकारले.

मोहन धारिया यांनी इ.स. १९८३ च्या सुमारास 'वनराई' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट लोकसहभागातून विकास साधणे हे होते. या संस्थेतर्फे सुमारे २.५ कोटीपेक्षा जास्त रोपांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. ते अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत होते व तरुणांचे प्रेरणास्थान होते.भारतातील सुमारे १७.५ हेक्टर जमिनांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी सरकारशी सतत पाठपुरावा केला. लोकसहभागातून त्यांनी जवळपास तीन लाख 'वनराई बंधारे' बांधले. त्यांद्वारे, जमिनीत पाण्याचे पुनर्भरण शक्य झाले. त्यामुळे अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवढा करायची गरज उरली नाही. हे कार्य करताना त्यांचावेगवेगळ्या सामाजिक्संस्थांशी घनिष्ट संबंध आला. साधना, भारतीय शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनसेवा अशा विविध संस्थांचे ते विश्वस्त होते.[]

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • २६वा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
  • इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार
  • जीवन गौरव पुरस्कार (पुणे विद्यापीठ)
  • डी. लिट. (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील विद्यापीठ)
  • पद्मविभूषण पुरस्कार (२००५)
  • पुण्यभूषण पुरस्कार
  • 'बापू' पुरस्कार
  • यशवंतराव चव्हाण उत्कृष्टता पुरस्कार
  • राजीव गांधी पर्यावरण रक्षण पुरस्कार
  • रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार
  • स्वामी विवेकानंद नॅशनल ॲवॉर्ड
  • सूर्यरत्न पुरस्कार

लिहिलेली पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]

  • अफॉरेस्टेशन इन इंडिया
  • जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ
  • तेथे कर माझे जुळती (निधनापूर्वीपर्यंत अप्रकाशित)
  • पॉप्युलेशन एक्स्प्लोजन ॲन्ड इंडिया
  • फ्यूम्स ॲन्ड फायर
  • 'बोल अनुभवाचे'
  • यही ज़िंदगी
  • संघर्षमय सफर (आत्मचरित्र)
  • हसत रहा (निधनापूर्वीपर्यंत अप्रकाशित)

[]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. साचा:स्रोत बातमी
  2. २.० २.१ लोकमत,नागपूर-ई-पेपर-दि.१५/१०/२०१३ पान क्र.१ व ७ दि.१५/१०/२०१३ रोजी १०.२४वाजता जसे दिसले तसे
  3. लोकमत, नागपूर-ई-पेपर-दि.१५/१०/२०१३ पान क्र.१ व ७ दि.१५/१०/२०१३ रोजी १०.२४वाजता जसे दिसले तसे