राजकुमारी अमृत कौर
डेम राजकुमारी बिबीजी अमृत कौर (पूर्वाश्रमीच्या अहलुवालिया) DSTJ (२ फेब्रुवारी १८८९ - २ ऑक्टोबर १९६४) या भारतीय कार्यकर्त्या आणि राजकारणी होत्या.[१] भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दीर्घकाळ सहभाग घेतल्यानंतर, १९४७ मध्ये त्यांना भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.[२][३][४]
कौर यांनी क्रीडा मंत्री आणि शहरी विकास मंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला आणि पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संस्था स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.[४] त्यांच्या कार्यकाळात कौर यांनी भारतात अनेक आरोग्य सेवा सुधारणा केल्या आणि या क्षेत्रातील योगदान आणि महिलांच्या हक्कांच्या समर्थनासाठी त्या ओळखल्या जातात. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या १५ महिलांमध्ये त्या एक होत्या.[५][६][७]
आरोग्य मंत्री म्हणून कौर यांनी नवी दिल्ली येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्या पहिल्या अध्यक्षा झाल्या.
कौर यांना रेने सँड मेमोरियल अवॉर्ड देण्यात आला.[८] १९४७ मध्ये टाइम मॅगझिनच्या "वुमन ऑफ द इयर" म्हणून त्यांना गौरवण्यात आले होते.[१]
जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
अमृत कौरचा जन्म 2 फेब्रुवारी 1887 रोजी बादशाह बाग, लखनौ, उत्तर प्रदेश (तेव्हाचे संयुक्त प्रांत) येथे झाला. कौरचा जन्म कपूरथलाचे राजा रणधीर सिंग यांचा धाकटा मुलगा राजा सर हरनाम सिंग अहलुवालिया यांच्या पोटी झाला. सिंहासनाच्या उत्तराधिकारावरून झालेल्या संघर्षानंतर हरनामसिंगने कपूरथला सोडले. औधच्या पूर्वीच्या संस्थानातील मालमत्तेचे व्यवस्थापक बनले आणि बंगालमधील मिशनरी गोलखनाथ चॅटर्जी यांच्या आग्रहावरून ख्रिस्ती धर्म स्वीकारला, सिंगने नंतर चॅटर्जी यांची मुलगी प्रिसिला हिच्याशी लग्न केले. आणि त्यांना दहा मुले होती, त्यापैकी अमृत कौर या सर्वात लहान आणि त्यांची एकुलती एक मुलगी होती.[३][१]
कौर एक प्रोटेस्टंट ख्रिश्चन म्हणून वाढल्या आणि त्यांचे प्रारंभिक शिक्षण इंग्लंडमधील डोरसेट येथील शेरबोर्न स्कूल फॉर गर्ल्समध्ये झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या 1918 मध्ये भारतात परतल्या.
कौर यांचे 6 फेब्रुवारी 1964 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. जरी मृत्यूच्या वेळी त्या एक प्रॉटेस्टंट ख्रिश्चन होत्या, तरी त्यांच्यावर शीख प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.[९] कौर यांनी कधीही लग्न केले नाही[१०] आणि त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा भाऊ राजा महाराज सिंह यांचे वंशज आहेत जे लंडन, दिल्ली आणि चंदीगडमध्ये राहतात.[१०]
आज त्यांची खाजगी कागदपत्रे दिल्लीतील तीन मूर्ती हाऊस येथील नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी येथील अभिलेखागाराचा भाग आहेत.[११]