रिचर्ड वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली
रिचर्ड कॉली वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली अर्थात लॉर्ड वेलस्ली (जन्म: २० जून, इ.स. १७६० मृत्यू: २६ सप्टेंबर, इ.स. १८४२) हा आयरिश ब्रिटिश राजकारणी आणि वसाहतीय प्रशासक होता. रिचर्ड वेल्लेस्लीचा जन्म इ.स. १७६० मध्ये इंग्लंडच्या उमराव घराण्यात झाला.[१] तो इ.स. १७९८ ते १८०५ च्या दरम्यान भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल होता. त्याने तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील सर्वश्रेष्ठ शक्ती बनवले आणि भारतात ब्रिटिश सत्तेची पाळमुळे आणखी घट्ट केली. यासाठी त्याने तैनाती फौजेच्या धोरणाचा अवलंब केला[२]. त्याने शांततेच्या धोरणाचा त्याग करून सरळसरळ युद्धनीतीचा वापर केला. या त्याच्या कर्तृत्वामुळे ब्रिटिश भारतात बलशाली तर झालेच परंतु त्यामुळे नेपोलिअनच्या भारतावरील संभावित आक्रमणाची भीतीही कमी झाली.