सुंदरलाल बहुगुणा
सुंदरलाल बहुगुणा ( मारोडा-टेहरी, उत्तराखंड, ९ जानेवारी १९२७, २१ मे २०२१[१]) हे एक प्रख्यात भारतीय पर्यावरणवादी असून चिपको आंदोलनाचे प्रणेते होते.
चिपको आंदोलन
महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरून सुंदरलाल बहुगुणा यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील जंगले आणि आणि पर्वतांमधून ४ हजार सातशे किलो मीटरचा पायी प्रवास केला. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांमुळे हिमालयातील नाजुक पर्यावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खेड्यांतील लोकांच्या जीवनावर होणारा परिणामही त्यांनी जवळून अनुभवला. यातूनच १९७३ साली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. जंगले व झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी दुर्गम भागांतील खेड्यापाड्यांतील जनतेला झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपकण्याची कल्पना दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांनी १९८० साली वृक्षतोडीवर १५ वर्षांची बंदी आणली.
टेहरीसाठी उपोषण
टेहरीसारख्या मोठ्या धरणालाही सुंदरलाल बहुगुणा यांचा विरोध होता. १९९५ साली हे धरण होऊ नये यासाठी त्यांनी ४५ दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी टेहरी धरणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. धरणाचे काम सुरूच राहिल्यांने बहुगुणांनी महात्मा गांधींच्या समाधिस्थळाजवळ बसून ७४ दिवसांचे प्रदीर्घ उपोषण केले. काम तात्पुरते थांबले. मात्र २००१ साली या धरणाचे काम परत सुरू झाल्यावर सुंदरलाल बहुगुणा यांना अटक झाली.
भागीरथी नदीच्या काठी कोटी या गावाजवळ त्यांचे पर्यावरण रक्षणाचे काम आजही (२०१७ साली) चालू आहे.