हाथीगुंफा शिलालेख

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
राजा खारवेल याचा हाथीगुंफा शिलालेख
युवान राजाचे छायाचित्र (असण्याची शक्यता)

हाथीगुंफा शिलालेख हा ओडिसातील भुवनेश्वर जवळील उदयगिरी येथील हाथीगुंफा येथे इसवी सन पूर्व २ ऱ्या शतकातील कलिंग साम्राज्याचा राजा खारवेल याने कोरलेला शिलालेख आहे. उदयगिरी पर्वतराजीमध्ये असलेला हा शिलालेख सात ओळींचा असून मध्य पश्चिम प्राकृत भाषेत ब्राह्मी लिपीत आहे.[१] कलिंग अक्षरलेखन पद्धतीतील वैशिष्ट्यपूर्ण असा हा लेख असून याचा काल १५० इ.स.पूर्व असल्याचे मानले जाते. खारवेल राजाच्या कारकिर्दीच्या १३ व्या वर्षी सदर लेख कोरला गेला असावा असे अभ्यासकांचे मत आहे.[२] ह्या शिलालेखापासून १० कि.मी. अंतरावर सम्राट अशोकाचा धौलीचा शिलालेख आहे.

ऐतिहासिक महत्त्व

भारतीय पुरातत्त्व शाखेतर्फे प्रसिद्ध हाथीगुंफा लेख

उदयगिरी येथील हाथीगुंफा शिलालेख हा कलिंग सम्राट खारवेल याच्याविषयी अधिकृत माहिती देणारा महत्त्वपूर्ण स्रोत आहे.[३] या शीलालेखाचा प्रथम परिचय पाश्चिमात्य जगाला ए.स्टर्लिंग यांनी इ.स. १८२० मध्ये करून दिला. याची माहिती त्यांनी एशियाटिक रिसर्च खंड १५ मध्ये, तसेच त्यांचे पुस्तक 'ॲन अकाऊंट ऑफ जाॅग्रफिकल, स्टॅस्टिकल ॲन्ड हिस्टाॅरिकल ओरिसा ऑर कटक यामध्ये प्रकाशित केली. जेम्स प्रिन्सेप यांनी ह्या शिलालेखाचे वाचन करून ते त्याच्या हुबेहूब नक्कल प्रतीसह कितो यांनी जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल भाग ६ (१८३७) येथे प्रकाशित केले. मात्र त्यावळी त्यांनी हा शिलालेख ऐरा नावाच्या राजाचा असल्याचे चुकीने नोंदविले आहे. एच.लॉक यांनी इ.स. १८७१ च्या अखेरीस या लेखाचा प्लास्टरचा साचा तयार केला. हा साचा कलकत्त्यातील इंडियन म्यूझियम येथे पहायला मिळतो. अलेक्झांडर कनिंगहेम यांनी इ.स. १८७७ मध्ये हा लेख काॅर्पस इन्स्क्रिप्शन्स इंडिकेरम भाग १ यामध्ये प्रसिद्ध केला तसेच इ.स. १८८० मध्ये आर.एल. मित्रा यांनी यामध्ये किंचितसा बदल करून तो ॲटिक्वेट ऑफ ओरिसाच्या २ऱ्या भागात प्रसिद्ध केला. खारवेल राजाच्या बाबतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो इंंडोग्रीक राजा डिमिट्रियस याला समकालीन होता. या लेखात समकालीन राजांचा उल्लेख असल्यामुळे त्यावरून सबळ माहिती प्राप्त होते.[४]

संशोधनाच्या दृष्टीने झालेले कार्य

हाथीगुंफा लेख उदयगिरी पर्वत

इ.स.१८८५ मध्ये प्राच्य विद्या अभ्यासकांची सहावी परिषद झाली. या परिषदेत भगवानलाल इंद्रजी यांनी केलेले या शिलालेखाचे वाचन हे अधिकृत आणि प्रमाण मानले जाते. सदर लेखात ज्या राजाची स्तुती आहे तो राजा खारवेल आहे हे पंडित इंद्रजी यांनी सर्वप्रथम मांडले आणि हे त्यांचे विशेष योगदान आहे. या लेखात बऱ्याच जागा रिक्त असल्याने लेखाचे नेमके वाचन करण्यात अडचणी उद्भवल्या आणि शिलालेखाच्या दुरवस्थेमुळे आणखीही अनावश्यक मत- मतांतरांना वाव मिळाला.[५]

लेखाचे ऐतिहासिक महत्त्व

लेखाच्या सहाव्या ओळीतील नंदराजाचा मौर्यकाल १०३ व्या वर्षी खारवेलाने 'खिबिरऋषीताल' हा कालवा आणला असा उल्लेख आहे. या प्रस्तरलेखातील खारवेलाच्या लोकोपयोगी कार्यामुळे महत्त्वाची तत्कालीन वास्तुवि़षयक माहिती मिळते.

लेखाचे स्वरूप

सदर शिलालेखात प्रामुख्याने सम्राटाच्या विविध विजयांची नोंद आहे. त्यामध्ये सातवाहन राजा सातकर्णी याच्याशी झालेल्या युद्धापासूनचे उल्लेख आहेत. .- “आणि दुसऱ्या वर्षी (त्याने) सातकर्णी राजाकडे दुर्लक्ष करून पश्चिम भागात घोडदळ, हत्ती, पायदळ आणि रथ पाठविले आणि (ते) कान्हा बेमना परिसरात पोहोचले आणि त्याने मुसिका परिसराची त्रेधा उडवून दिली.”[६] हाथीगुंफा शिलालेखाची सुरुवात पवित्र मानल्या गेलेल्या नमो अरिहंतानं | नमो सवसिधानं |या जैन संप्रदायाच्या पवित्र मंत्राने केलेली दिसते.

  • राज्यारोहणाच्या पहिल्या वर्षात राजाने वादळामुळे नुकसान झालेल्या कलिंग नगरीचे प्रवेशद्वार, तटबंदी आणि अन्य वास्तूंच्या दुरुस्तीचे काम केले. त्याच जोडीने तलाव, उद्याने यांचीही बांधणी केली. यासाठी त्याने पस्तीस दशसहस्र मुद्रा (नाणी) खर्च केला. त्यामुळे त्याचे प्रजाजन विशेष आनंदित झाले.
  • दुसऱ्या वर्षी राजश्री सातकर्णी याची फिकीर न करता त्याने पश्चिमेकडे घोडदळ, पायदळ, हती, रथ असे सैन्य पाठवले आणि असिकनगर प्रदेशापर्यंत (जाऊन) या दलाने कान्हा बेमना (कण्हवेम्णा) नदीपर्यंत मजल मारली.
  • त्यानंतर चौथ्या वर्षी त्याने विदधारा प्रदेश प्रस्थापित केला, जो यापूर्वी कोणत्याही कलिंग सम्राटाने केला नव्हता. रथिक आणि भोजक या प्रमुखपदी असलेल्या व्यक्तींनी आपली छत्रचामरे, मुकुट अन्य राजवस्त्रे उतरवली आणि ते समृद्धी आणि संपत्तीसह सम्राटाला शरण गेले.
  • आणि चौथ्या वर्षी, तीन हजार वर्षापूर्वी सम्राट नंद याच्या कारकिर्दीत घडलेली सेतुप्रणाली सम्राटाने कलिंग नगरीच्या व्यवस्थेसाठी कार्यान्वित केली. सातव्या वर्षी महाराणी वज्र गरा हिला पुत्ररत्न होऊन मातृत्व लाभले.
  • आठव्या वर्षी त्याने मगध साम्राज्यातील राजगृह या प्रदेशावर स्वारी केली आणि तेथील राजा युवान याला मथुरेतून माघार घेण्यास सांगितले.
  • नंतर आठव्या वर्षी (खारवेल) राजाने गोरधगिरीवर केलेल्या हल्याने राजगृहावरील ताण वाढला. त्याच्या शौर्यामुळे ग्रीक राजा युवान याच्या सैन्याचे मानसिक खच्चीकरण झाले आणि त्यामुळे मथुरेच्या साम्राज्याची पीछेहाट झाली.
    [७]
  • नवव्या वर्षी ब्राह्मणाना करमुक्त केले. स्वतःसाठी 'महाविजयप्रासाद' बांधला.
  • दहाव्या वर्षी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करून युद्धासाठी प्रस्थान ठेवले.
  • अकराव्या वर्षी जिंकलेल्या देशात मणि-रत्नांचा खजिना लुटला आणि पिथुंद नगरीवर गाढवाचा नांगर फिरवला.
  • बाराव्या वर्षी आर्यावर्तातील राजांवर स्वाऱ्या केल्या. मगधाचा राजा बृहस्पतिमित्र याचा संपूर्ण पाडाव केला.
  • तेराव्या वर्षी सतत एकशे तेरा वर्षांपासून राज्याला त्रास देणाऱ्या द्रविड देशीयांचा पराभव केला.

संदर्भ

  1. कृष्ण (१९९६) पृ.२६
  2. Alain Daniélou (11 February 2003). A Brief History of India. Inner Traditions / Bear & Co. pp. 139–141. ISBN 978-1-59477-794-3.
  3. Sudhakar Chattopadhyaya (1974). Some Early Dynasties of South India. Motilal Banarsidass Publ. pp. 44–50. ISBN 978-81-208-2941-1.
  4. गोखले, शोभना - पुराभिलेखविद्या (१९७५)
  5. A. F. Rudolf Hoernlé (2 February 1898). "Full text of "Annual address delivered to the Asiatic Society of Bengal, Calcutta, 2nd February, 1898"". Asiatic Society of Bengal. Retrieved 4 September 2014.
  6. एपिग्राफिका इंडिया भाग २
  7. Hathigumpha inscription, lines 7-8, probably in the 1st century BCE. Original text is in Brahmi script