भारताचा स्वातंत्र्यलढा
भारताचा स्वातंत्र्यलढा ही भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर युनायटेड किंग्डमचे आधिपत्य घालवून स्वतंत्र, स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात आपला वसाहतवाद रुजविला.इ.स. १७५७ ते इ.स.१८५७ असा हा प्रदीर्घ काळ होता. त्यानंतर भारतावर व्यापारी अंमल प्रस्थापित केल्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचे वर्चस्व भारताच्या उपखंडात प्रस्थापित झाले. इ.स, १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर पुन्हा इ.स.१९४७ सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी ९० वर्षे संघर्ष केलेला आहे. जगातील सर्व वसाहतवादी सत्तांच्या विरोधातही भारतीय क्रांतिकारी लढले आहेत. या सर्वांच्या संघर्षातून आणि बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अंतिमतः; भारताला स्वातंत्र्य मिळाले.[१]
ऐतिहासिक पार्श्वभूमी[संपादन | स्रोत संपादित करा]
पोर्तुगीज खलाशी वास्को- द- गामा हा इ.स.१४९८ साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला.[२] व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच, फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. सुरत येथे इ.स. १६१३ साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले.त्यांच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे. मोगलांची सत्ता १८ व्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला.[३] इ.स.१८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व भारतात प्रस्थापित केले होते.[४] त्या जोरावर १८ व्या शतकातही ब्रिटिशांनी भारतावर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले.
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध(स्वातंत्र्यसमर)[संपादन | स्रोत संपादित करा]
ब्रिटिशांच्या व्यापारामुळे आणि वसाहतवादी धोरणामुळे त्यांची भारतावर स्थापन झालेली सत्ता मोडून काढण्यासाठी इ.स.१८५७ साली भारतीयांनी उठाव केला.[५] इंग्रजानी भारतीय नागरिकांवर लादलेल्या प्रक्षोभक कायद्यामुळे भारतातील प्रजेचा असंतोष वाढत होता.रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, मंगल पांडे ,झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी काही विशेष नावे या उठावाशी संबंधित आहेत.[६][७] हा उठाव अयशस्वी ठरला असला तरी यांच्या झुंजार पराक्रमाने भारतीय इतिहासात मोलाची भर घातलेली आहे. या लढ्याच्या अपयशाची परिणती म्हणून ब्रिटिश राणीचा अंमल भारतावर सुरू झाला.
बंगालची फाळणी आणि वंगभंग चळवळ[संपादन | स्रोत संपादित करा]
इ.स.१९०५ साली लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. पूर्व बंगाल आणि आसाम हे प्रांत एकत्र केले आणि दुसरीकडे पश्चिम बंगालची स्वतंत्र रचना केली. त्याच्या या कृत्यामुळे भारतीय नागरिक संतप्त झाले.[८] रवींद्रनाथ टागोर यांनी या घटनेचातीव्र निषेध नोंदविला होता. या फाळणीच्या विरोधात भारतीयांनी १९०८ साली वंगभंग चळवळ सुरू केली.[९]
देशभक्तांची चळवळ[संपादन | स्रोत संपादित करा]
- चळवळीच्या प्रेरणा देणारे नेतृत्व-
देशातील युवकांना विशेषतः देशभक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक व्यक्तीनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आणि आपल्या कार्यातून देशातील नागरिकांना आवाहन केले. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, रवींद्रनाथ टागोर,भगिनी निवेदिता, लाला लजपतराय,सय्यद अहमद खान, बंकीमचंद्र चटर्जी,दादाभाई नौरोजी यासारख्या अनेक व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.लाल-बाल-पाल ही त्रयी म्हणजे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल यांनी या सर्व क्रांतीकार्याची धुरा पेलली असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. लोकमान्य टिळक यांना मंडाले येथे झालेली राजद्रोहाच्या आरोपासाठी जन्मठेप, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना झालेली अंदमानच्या काळ्या समुद्रावरील जन्मठेप या ऐतिहासिक घटना स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाच्या ठरल्या आहेत.भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेनुसार अवनींद्रनाथ ठाकूर यांनी क्रांतीकार्याला प्रेरक असे भारतमातेचे चित्र तयार केले. हे चित्र सर्वत्र प्रसारित करण्यात आले.
- मिठाचा सत्याग्रह-
ब्रिटिश सत्तेचा भारतावरील अंमल मोडून काढण्यासाठी भारतात पद्धतशीरपणे आणि नियोजनपूर्वक चळवळ आखली गेली. यांच्या धुरीणांनी समाजाला आवाहन केले आणि भारताचे नागरिक स्वतःच्या प्रेरणेने या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले हे याचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल.महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाने केला गेलेला दांडी येथील मिठाचा सत्याग्रह हा याचेच एक उदाहरण होय.[१०] गांधीजी हे लंडन येथून ब्यारीस्टर शिक्षण संपादन करून परत भारतात आले. त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वाला अनुसरून त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांना संघटित केले.[११] मिठाचा सत्याग्रह किंवा ब्रिटिश राजवटीशी असहकार चळवळ या चळवळी त्यांच्या नेतृत्वाने झाल्या. स्वातंत्र्य प्राप्त करण्यात अशा चळवळींना थेट यश आले नसले तरी त्यामुळे देशातील नागरिकांत स्वातंत्र्याची जाणीव वाढविण्यात अशा चळवळींचे योगदान महत्त्वाचे ठरले.
- स्वदेशी चळवळ-
परदेशी मालावर भारतीयांनी बंदी घातली आणि स्वदेशी मालाचा पुरस्कार करण्याचे भारतीय नागरिकांना आवाहन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केल्याची घटना इतिहासात महत्त्वाची मानली जाते. लोकमान्य टिळक यांनी स्वदेशीचे व्रत घेण्याचे लोकांना आवाहन केले. भारतीय उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.[१२] याद्वारे ब्रिटिशांच्या जुलूमाला विरोध करण्याचे शिकस्तीचे प्रयत्न करून भारतीयांनी आपला असंतोष व्यक्त केला. या चळवळीने संपूर्ण भारतातील क्रांतीकार्याला जोर चढला.[१३] स्वराज्य, स्वभाषा, स्वदेशी या सूत्रांनी भारतीय नागरिकांत प्रेरणा जागी ठेवण्याचे कार्य या चळवळींनी केले.[१४]
- असहकार चळवळ-
ब्रिटीशांनी स्थापन केलेल्या सरकारी संस्था, न्यायालये यावर बहिष्कार घालणे,कर न भरणे,शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार घालणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून भारतीयांनी ब्रिटीश सत्तेविरुद्ध आपला विरोध दर्शविला.[१५]
अन्य नोंद घेण्याजोगी क्रांतीकार्ये[संपादन | स्रोत संपादित करा]
- डिसेंबर १९०९ मध्ये अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा केलेला वध
- १९२९ मध्ये भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत केलेला बॉम्बहल्ला आणि या तिघांना मिळालेली फाशीची शिक्षा
- आझाद हिंद सेना- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून फॉरवर्ड ब्लॉक नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ब्रिटिशांशी लढण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.[१६]
महायुद्धे[संपादन | स्रोत संपादित करा]
पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या प्रभावामुळे भारताने युद्धात सर्वतोपरी सहाय्य दिले होते दुस-या महायुद्धाच्या वेळीही ब्रिटिश भारताला त्यात ओढू पाहत होते. तथापि सुभाषचंद्र बोस आणि अन्य काही भारतीय नेते यांना ते मान्य नव्हते.
भारताला स्वातंत्र्यप्राप्ती[संपादन | स्रोत संपादित करा]
इ.स.१९४२ साली तत्कालीन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ब्रिटिशांकडे भारताच्या स्वातंत्र्याची जोरदार मागणी करायला सुरुवात केली. छोडो भारत असे या आंदोलनाचे नाव होते.[१७] यामध्ये संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणावर उत्सफूरतपणे लोकांनी सहभाग नोंदविला.[१८] भारतीयांचा संघर्ष ब्रिटिश सत्ता दडपून शकली नाही आणि क्रांतीकारकांच्या ब्लिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे दिसू लागली. गव्हर्नर[१९] माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच १५ ऑगस्ट १९४७ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले.
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]
-
तात्या टोपे
-
झाशीशी राणी लक्ष्मीबाई
-
बाळ गंगाधर टिळक
-
दांडीचा मिठाचा सत्याग्रह
-
स्वातंत्र्यवीर सावरकर