अनंत चतुर्दशी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
भगवान विष्णू

अनंत चतुर्दशी हा विष्णूच्या व्रताचा [१] तसेच उत्सवाचा दिवस मानला जातो.[२]

अनंत व्रत

भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात.[३] या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.[४] हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. हे व्रत सार्वत्रिक नाही. कोणी उपदेशिल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालू राहते. पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी आख्यायिका आहे.[५][६]

पूजेचे स्वरूप

चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात.त्यावर पूर्णपात्र ठेवून अष्टदल काढतात. त्यावर सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेष नाग ठेवून त्याच्यापुढे हळदीने रंगविलेला चौदा गाठींचा दोरा ठेवतात.[६] कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात. कुंभातील जळाला यमुना म्हणतात. शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात.अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजा यामध्ये असतात. पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात. नंतर दोरकाची प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात. जुन्या दोऱ्यांचे विसर्जन करतात. वडे आणि घारगे यांचे वाण देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात.[७] या व्रतात सर्पपूजेचे अवशेष दिसतात असे मानले जाते. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी असा संकेत मानला जातो.[८] हरियाणात या दिवशी अनंताचे व्रत घेतात. पूजा करतात. हातात 'अणत' बांधतात.[९]

अन्य दिनविशेष

लोकमान्य टिळकांनी स्वराज्य स्थापनेच्या राष्ट्रीय हेतूने गणेशोत्सव सुरू केला आणि त्याचा कालावधी दहा दिवस इतका निश्चित केला. त्यानुसार अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करतात.[१०]

गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन

हे सुद्धा पहा

विष्णू

गणेशोत्सव

साचा:भारतीय सण आणि उत्सव साचा:हिंदू सण

संदर्भ