ऋग्वेद

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हिंदू धर्मग्रंथ

Rigveda

ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून त्याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. (उरलेले तीन वेद - यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.) ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे. हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे, अशी समजूत आहे. ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.त्यापैकी एक म्हणजे ऋग्वेद.

ऋग्वेद संस्कृत वाङ्‌मयातील पहिला ग्रंथ आहे. ऋग्वेदामध्ये एकूण १० मंडले, १०२८ सूक्ते,१०.४६२ ऋचा आणि १०५८९ मंत्र आहेत. निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास 'ऋचा' म्हणतात. ऋग्वेद रचनेचा काल इ.स.पू. ६००० पूर्वीच्या सुमाराचा असावा असा अंदाज आहे. ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था महर्षी व्यास यांनी पाहिली.

ऋग्वेदातीला सूक्तांचे कर्ते ब्राह्मण, क्षत्रियवैश्य या तीनही वर्णांचे लोक आहेत. ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत. 'अग्निमीळे पुरोहितम्' हा ऋग्वेदातील पहिला मंत्र असून अग्निसूक्ताने ऋग्वेदाचा प्रारंभ होतो.

पाणिनीच्या काळात ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे, क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली. ती पदे न फिरवता तशीच म्हंटली जावीत या साठी जटापाठ आणि घनपाठ म्हणण्याची पद्धत सु्रू झाली.

ऋग्वेद हा स्तुतिपर असून पद्यमय आहे. ऋग्वेदाच्या १०व्या मंडलातल्या पुरुषसूक्तात तीनही वेदांचा उल्लेख आहे. श्रीसूक्त हे देवीच्या वर्णनपर असलेले प्रसिद्ध सूक्त ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आहे. पुरुष सूक्त मध्ये विराट पुरुषाची संकल्पना मांडलेली आहे या विराट पुरुषाच्या विविध अवयवांपासून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या वर्णांची निर्मिती झाली असे वर्णन केलेले आहे

  वैदिक ग्रंथ अनेक ऋषिमुनींनी रचलेले असल्यामुळे त्यांना अपौरुषेय असे म्हणतात तसेच हे ग्रंथ पाठांतर द्वारे गुरूकडून शिष्याकडे हस्तांतरित झालेले आहेत.

रचना

ऋच्‌ धातूचा अर्थ पूजा करणे असा आहे. यावरून ऋचा या शब्दाचा अर्थ स्तुतिपर कविता असा होतो. वेद शब्दामध्ये विद् असा धातू आहे, त्याचा अर्थ ज्ञान असा होतो. अशा १०|२० ऋचांचे एक पद म्हणजे एक सूक्त. अशा १०|२० सूक्तांचे एक अनुवाक्‌ व अनेक अनुवाकांचे एक मंडल. अशी दहा मंडले ऋग्वेदात आहेत. ऋग्वेदातील मंत्र हे अतिशक्करी, अनुष्टुभ, गायत्री, जगती, द्विपदाविराज, पंक्ति, अशा विविध छंदांत रचलेले आहेत.

देवता- ऋग्वेदात अग्नी, अश्विनीकुमार, इंद्र, उषा, द्यावापृथिवी, मरुत, मित्रावरुण, पूषा, ब्रह्मणस्पती, वरुण, सूर्य, अशा विविध देवतांवरच्या सूक्तांची रचना दिसते.

देवता सूक्ते, संवाद सूक्ते, लौकिक सूक्ते, ध्रुवपद सूक्ते, आप्री सूक्ते असे सूक्तांचे विविध प्रकार ऋग्वेदात आढळतात.

शाखा

ऋग्वेद संहितेच्या २१  शाखा असल्याचा उल्लेख पतञ्जलीने आपल्या व्याकरण महाभाष्यात केला आहे. तथापि आज शाकल ही एकमेव शाखा उपलब्ध आहे. ऋग्वेदाच्या आश्वलायन, बाष्कल, मांडूकेय, शाकल व शांखायन अशा पांच प्रमुख शाखा होत्या परंतु त्या लुप्त होऊन आता शाकल ही एकच शाखा शिल्लक आहे.
ऋग्वेदात एकूण १०२८ सूक्ते आहेत. पहिल्या व दहाव्या मंडलात समानच म्हणजे १९१ सूक्ते आहेत.
ऋग्वेदात एकूण अक्षरांची संख्या ४३२००० आहे.

ऋग्वेदातील काही नीतिकल्पना व तत्त्वज्ञान

मृत्यूनंतरच्या जीवनासंबधी काही विचार मांडताना ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात देवता अंतरिक्षातून मानवाच्या हालचालीचे निरीक्षण करतात असे म्हटले आहे.

१) सर्व देव अमर आहेत व ते आपल्या पूजकांना अमरत्व देण्यास तयार असतात. मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचा पार्थिव देह हा मातीत मिसळून जातो; पण त्याचा आत्मा मात्र अमर असतो.
२) सृष्टीच्या उत्पत्तीचे सूक्तही ऋग्वेदात आहे. हे जग देवाहूनही श्रेष्ठ अशा कोणा उत्पादकाकडून निर्माण झाले असावे. तो उत्पादक म्हणजे पुरुष, विश्वकर्मा, हिरण्यगर्भ किंवा प्रजापती या नावाने ओळखला जातो. ऋग्वेदातील पुरुषसूक्तात म्हटले आहे की, देवांनी विराट पुरुषाला बळी दिला व त्याच्या अवयवापासून बहुविध सृष्टी निर्माण झाली आहे. हिरण्यगर्भ प्रथम निर्माण झाला व त्याने सृष्टी निर्माण केली, असेही काही ठिकाणी म्हटले आहे. काही ठिकाणी पाणी हे सृष्टीचे बीज आहे असे म्हटले आहे.
३) पापी, दुष्ट लोकांना परलोकांत स्थान नाही. यमाचा दूत म्हणून कपोत हा या पापी आत्म्यांना अंधकारात व दुःखमय अशा निवासस्थानी आणतो. अशा या निवासस्थानी अधार्मिक, यज्ञ न करणारे, असत्य बोलणारे व आचारहीन लोक राहतात.
४) पुण्य आत्म्यांना परलोकी स्थान आहे.
५) ऋग्वेदात धर्म हा शब्द सुमारे ५६ वेळेस आला आहे. नैतिक कायदे व आचार असा काहीसा अर्थ काही ठिकाणी आहे.

ऋग्वेदकालीन मूर्तिपूजेविषयी विद्वानांत तीव्र मतभेद आहेत. मॅक्समुल्लर, विल्सन, मॅकडोनाल्ड यांच्या मते, वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित नव्हती. भारतीय विचारवंतांतील वेंकटेश्वर दासवृंदावन भट्टाचार्य हे वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित असावी, असे म्हणतात. वेदांमध्ये देवांच्या मानवी रूपाचे वर्णन आढळत असले, तरी वेदांत त्यांच्या मूर्तिपूजा ध्वनित करणारी वचने मुळीच सापडत नाहीत. ऋग्वेदातील रचना आणि शब्द द्विअर्थी आहेत.

ऋग्वेद मंडलानुसार कवी
प्रथम मण्डल अनेक ऋषि
द्वितीय मण्डल गृत्समद
तृतीय मण्डल विश्वामित्र
चतुर्थ मण्डल वामदेव
पंचम मण्डल अत्रि
षष्ठम मण्डल भारद्वाज
सप्तम मण्डल वसिष्ठ
अष्ठम मण्डल कण्व व अंगिरा
नवम मण्डल (पवमान मण्डल) अनेक ऋषी
दशम मण्डल अनेक ऋषि

वेदांतील गोष्टी

  • मराठी लेखक वि.कृ. श्रोत्रिय यांनी ’वेदांतील गोष्टी’ हे दोन भागांतले पुस्तक लिहून वेदांत गोष्टी आहेत, हे जनतेच्या पहिल्यांदा ध्यानात आणून दिले.
  • एच.व्ही. बाळकुंदी यांनी ऋग्वेदाच्या अनेक मंडलांत दुष्काळाचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे. इसवी सन पूर्व ७००० ते इ.स.पू. ६५०० या काळात सतत दहा वर्षे अवर्षण होऊन दुष्काळ पडल्याचे उल्लेख ऋग्वेदात आहेत. अनेक दिवस अन्‍न न मिळाल्याने विश्वामित्रांवर कुत्र्याचे मांस खाण्याची वेळ आल्याची कथा ऋग्वेदात आहे.

संदर्भ व नोंदी

  • अनोखा परिचय ऋग्वेद आणि उपनिषदांचा (रघुनाथ जोशी)
  • ऋग्वेददर्शन - श्री.रा.गो. कोलंगडे
  • ऋग्वेद शांतिसूक्त (केशवशास्त्री जोगळेकर)
  • ऋग्वेद-संहिता, ५ भाग, (संपादन : वैदिक-संशोधन-मंडळ, पुणे, १९३३-५१).
  • ऋग्वेद-संहिता, औंध, १९४० (संपादक : श्रीपाद दामोदर सातवळेकर).
  • ऋग्वेद - सार (मूळ हिंदी संकलक विनोबा भावे, मराठी अनुवाद - अच्युत देशपांडे)
  • ऋग्वेदाचे आकलन प्रथमच वैज्ञानिकरीत्या (डाॅ. शरच्चंद्र गोविंद इंगळे)
  • ऋग्वेदाचे मराठी भाषांतर- सिद्धेश्वरशास्त्री चित्राव
  • ऋग्वेदाचे प्राचीनत्व (ज्ञानेश्वर कुलकर्णी)
  • ऋग्वेदाचे सामाजिक अंतरंग (ॲड. शंकर निकम)
  • ऋग्वेदीय सूक्तानि : सार्थ, संक्षिप्त, सस्वर (अनुवादक स्वामी विपाशानंद)
  • चार वेद (शंकर वासुदेव अभ्यंकर)
  • ओळख वेदांची - ऋग्वेद (शीतल उवाच)
  • A History of Indian Literature, Vol. I, Calcutta, 1927.(ंM. Winternitz)
  • A History of Sanskrit Literature, Delhi, 1961.(Arthur A. Macdonell)
  • वेदांतील गोष्टी (२ भाग, लेखक - वि.कृ. श्रोत्रिय)
  • History of Dharmshastra- Author,Bharatratna P.V.Kane




साचा:विस्तार साचा:वेद