कल्याणगड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट किल्ला

कल्याणगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान

पुणे - बंगळूर महामार्गावर सातारा शहर वसलेले आहे. सातारा शहराच्या पूर्वेला सह्याद्रीमधील महादेव रांगेचे एक शृंग आलेले आहे. या शृंगातच नांदगिरी ऊर्फ कल्याणगड उभारलेला आहे. पुणे ते सातारा या महामार्गाच्या पूर्वेला कल्याणगड हा किल्ला आहे. सपाट माथा असलेल्या या किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या एकमेव वटवृक्षामुळे हा किल्ला दूरूनही ओळखू येतो.

कसे जाल?

सातारा शहरापासून सातारा रोड रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग, महामार्ग ओलांडून जातो. या मार्गावर एस.टी. बसेसची सोय आहे. किंवा पुणे-मुंबईहून रेल्वेनेही येऊन सातारा रोड रेल्वेस्थानकावर उतरता येते. येथून चालत नांदगिरी ऊर्फ कल्याणगडाचा पायथा गाठता येतो. सातारा रोड रेल्वे स्थानकापासून हे अंतर तीन किलोमीटर आहे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

कल्याणगडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारी पायवाट आहे. पायथ्याला धुमाळवाडी हे गाव आहे. सध्या या गावाला नांदगिरी असेही म्हणतात. नांदगिरीमधून गडावर जाणाऱ्या पायवाटेच्या सुरुवातीला काही नव्याने बांधलेल्या पायऱ्या आहेत. सुरुवातीच्या पायऱ्या संपल्यानंतर मुरमाड वाट आहे. या वाटेने आपण चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो. या मार्गावर दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजाग रंगवलेले असल्यामुळे रस्त्यात भरकटण्याची शक्यता नाही. या दांडावर आल्यानंतर अर्ध्या डोंगरात एक कोरलेली गुहा आहे. आत पाच सहा दगडी खांब आहेत. यात सध्या पाणी भरलेले आहे. येथून पुढे गडावर जाणारे विजेचे खांब लागतात. या खांबांना धरुनच वाट गडावर पोहोचते. पूर्व बाजूला असला तरी उत्तराभिमुख असा कल्याणगडाचा पहिला दरवाजा आहे. या दरवाजाच्या खालच्या पायऱ्यांच्या दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे. या दरवाजामध्ये गावकऱ्यांनी लोखंडी जाळी बसवलेली आहे. या किल्ल्याला भेट देणाऱ्या किल्ले प्रेमी मंडळीपेक्षा भक्त मंडळीच मोठ्या संख्येने असतात.

कल्याणगडाचे एक वेगळेपण इथे दडलेले आहे. दरवाजातून आत शिरताच समोर कातळकडा आहे. या कातळकड्याच्या डावीकडे खाली काही पायऱ्या उतरल्यावर एक गुहा आहे. या गुहेत शिरण्या अगोदर काही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. या कड्यातील गुहेचे जे तोंड आहे. याच्यावर आठ दहा फूट ते वीस फूट उंची वर मधमाशांची एक दोन पासून पाच सात अशी पोळी लटकलेली असतात. कांदा - लसूण अथवा धुम्रपान याने मोहोळ उठण्याची शक्यता असते. गुहेमधे पूर्णपणे अंधार आहे. त्यामुळे टॉर्चच्या उजेडातच आत शिरावे लागते. गुहेमधे पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे चप्पल बूट बाहेर काढूनच आपल्याला आत जावे लागते. आत मार्गदर्शक अशा सळया रेलिंगसारख्या लावलेल्या आहेत. पहिले दहा पंधरा फूट गुहेची उंची कमी असल्यामुळे वाकून जावे लागते. पुढे उंची वाढल्यामुळे उभे राहून जाता येते. या मार्गावर कधी पाणी गुडघ्याएवढे असते तर कधी कमरे एवढे असते. सध्या गुहेतील वाट बांधून काढण्याचे काम गावकऱ्यांनी सुरू केलेले आहे. ते पूर्णही होत आले आहे. तीस पस्तीस फूट आत गेल्यावर नवव्या शतकातील एक पार्श्वनाथाची मूर्ती आहे. बाजूलाच दत्ताचे छोटेखानी मंदिर आहे. शेजारीच सध्या देवी मूर्तीही विराजमान झालेली आहे. हा सगळा भाग अंधार असल्यामुळे टॉर्चच्या उजेडातच पहावा लागतो. हे पाहून गोंगाट न करताच गुहेपासून दूर जावे लागते. पुन्हा दरवाजाच्याकडे येऊन येथून वरच्या दरवाजाकडे जाणारी वाट पकडावी लागते.

वरचा दरवाजा पूर्वाभिमुख असून दोन्हीकडून बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. या दरवाजाच्या आत गेल्यावर समोर हनुमानाचे मंदिर आहे. शिखरावर गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. मंदिराच्या डावीकडे कड्यावर एक गोलाकार पर्णकुटी उभारून सध्या एका महाराजांनी मठ स्थापन केलेला आहे.

कल्याणगडाचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असून आटोपशीर आहे. माथ्यावरील एका वास्तूचे नूतनीकरण करून भक्त मंडळीसाठी निवासस्थान उभारलेले आहे. या वास्तूसमोरच एक समाधी असून बाजूला पाण्याचे मोठे तळे आहे. पाण्याचा उपसा नसल्यामुळे पाणी शेवाळलेले आहे. माथ्यावर वाड्याची व शिबंदीच्या घरट्यांची जोती आहेत. मध्यभागी वडाचे मोठे झाड आहे. झाडाखाली कबर आहे. दक्षिण टोकावर कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. या टोकावरून समोरच जरंडेश्वराचा डोंगर दिसतो. सातारा शहर आणि अजिंक्यतारा किल्ला तसेच यवतेश्वराही दृष्टिपथात येतात. पूर्वेकडे किन्हईमधील यमाई देवीच्या डोंगर, तसेच एकांबेचा डोंगर दिसतो. त्यामागे भाडळीकुंडल रांगेतील वर्धनगडही दृष्टीत पडतो. संपूर्ण गड पाहण्यात तासभर पुरतो. गड पाहून, पुन्हा आल्यामार्गानेच गड उतरायला लागतो. कल्याणगडावरील वैशिष्ट्यपूर्ण असे जलमंदिर मात्र स्मृतिपटलावर कायमचे कोरले जाण्यासारखे आहे.

पहा नांदगिरी लेणी; महाराष्ट्रातील किल्ले

संदर्भ

बाहय दुवे

साचा:महाराष्ट्रातील किल्ले