मालिनी राजूरकर
साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक मालिनी राजूरकर (इ.स. १९४१ - हयात) या हिदुस्तानी संगीतातील मराठी गायिका आहेत. त्या ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीने गायन करतात.
पूर्वायुष्य
मालिनीताईंचे बालपण भारतात राजस्थान राज्यात गेले. अजमेर येथील सावित्री गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयातून त्यांनी गणित विषयात पदवी संपन्न केली व त्याच ठिकाणी त्यांनी तीन वर्षे गणित शिकविले. तीन वर्षांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन त्यांनी अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर व त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. वसंतराव राजूरकरांशी त्या पुढे विवाहबद्ध झाल्या.
सांगीतिक कारकीर्द
मालिनी राजूरकरांनी भारतातील नामांकित संगीत महोत्सवांतून आपली कला सादर केली आहे. त्यांत गुणीदास संमेलन (मुंबई), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे) आणि शंकर लाल महोत्सव (दिल्ली) या संगीत महोत्सवांचा समावेश आहे. मालिनीताईंचे टप्पा गायकीवर विशेष प्रभुत्व आहे. त्यांनी उपशास्त्रीय गायनही केले आहे. 'पांडू-नृपती जनक जया' व 'नरवर कृष्णासमान' ही त्यांनी गायलेली दोन मराठी नाट्यगीते विशेष लोकप्रिय आहेत.
मालिनीताईंच्या गायकीवर संगीतज्ञ के.जी. गिंडे, जितेंद्र अभिषेकी व कुमार गंधर्वांचा प्रभाव आहे. त्यांनी इ.स. १९६४ साली आपले संगीत कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. भारतातील शास्त्रीय संगीत वर्तुळात लवकरच त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. त्यांनी इ.स. १९८० साली अमेरिकेत व इ.स. १९८४ साली इंग्लंडमध्ये यशस्वी संगीत दौरे केले. इ.स. १९७० सालापासून त्या हैदराबाद येथे राहतात.
ध्वनिमुद्रिका
- क्लासिकल व्होकल (फाऊंटन कंपनी)
- राग तोडी
- राग बसंत मुखरी
पुरस्कार व सन्मान
त्यांना इ.स. २००१ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. इ.स. २००८ साली त्यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.