डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट इमारत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा किंवा भव्य स्मारकशिल्प (Monument memorial) हा नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात इ.स. १९६७ मध्ये उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पंचधातूचा पुतळा आहे. आंबेडकरी समाजाने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला आहे. आंबेडकरांचे हे स्मारकशिल्प चौथऱ्याशिवाय एकूण १२.५ फूट उंचीचे आहे.[१][२]

१४ एप्रिल म्हणजेच डॉ. आंबेडकर जयंती दिनी व ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इत्यादी नेते व जनता डॉ. आंबेडकरांना स्मरून या पुतळ्याला अभिवादन करत असतात.[३]

रचना

हा पुतळा पायथ्यापासून/चौथऱ्यापासून एकूण १२.५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकवून ठेवलेला आहे. आधारासह किंवा चौथऱ्यासह या पुतळ्याची उंची सुमारे २५ फूट आहे. हा पुतळा साधारण मनुष्याच्या चार पट लाईफ साईज आकाराचा आहे. पंचधातूच्या या पुतळ्याचे वजन दीड टन आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत भारतीय संविधान हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी भारतीय संसद भवनाकडे अंगुलिनिर्देशन करताना दर्शवले आहे.[२]

इतिहास

भारतीय संसदेच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

हा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने संसद परिसरासाठी भेट दिला होता आणि यासाठी आंबेडकरवादी समाजाने या पुतळ्यासाठी लोकवर्गणीद्वारे पैसा गोळा केला होता. डॉ. आंबेडकरांचा हा पुतळा मुंबईचे शिल्पकार ब्रह्मेश विनायक वाघ यांनी बनवलेला होता. ब्रह्मेश वाघ यांना हा पुतळा बनवण्यासाठी आंबेडकरांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी सर्वतोपरी मदत केली. बाबासाहेबांचे पायापासून ते डोक्यापर्यंतचे सर्व साहित्य त्यांना पुरवले. हा पुतळा दोन वर्षाच्या परिश्रमानंतर तयार झाला आहे. यापूर्वीही ब्रह्मेश वाघ यांनी इ.स. १९५९ साली मुंबईतील कूपरेज मार्गावर असलेला डॉ. आंबेडकरांचा सर्वप्रथम पुतळा तयार केला होता.[४]

अनावरण

भारताचे तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते २ एप्रिल १९६७ रोजी आंबेडकरांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.‘ज्ञानार्जन चालू ठेवा, सत्याचा शोध घ्या व ते आचरणात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करा, असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीयांना संदेश आहे’ असे भावपूर्ण उद्गार राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात काढले. राष्ट्रपती पुढे म्हणाले, ‘लोकशाही पद्धतीवर डॉ. आंबेडकरांची नितांत श्रद्धा होती. रक्तपात होऊ न देता समाजात क्रांतिकारक परिवर्तन घडविता येणे शक्य आहे, असा त्यांचा विश्वास होता. त्यांचा हा विश्वास अनाठायी नव्हता, हे भारतातील अनेक स्थित्यंतरांवरून सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय ऐक्यावर त्यांचा भर होता. भारतात जोपर्यंत हिंदू, मुस्लिम, सिंधी, तमिळी असे भेदभाव राहतील तोपर्यंत भारताती प्रगती होणार नाही, असे त्यांचे विचार होते.’ राष्ट्रपतींच्या भाषणानंतर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती'चे अध्यक्ष व भारताचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकसभेचे सभापती नीलम संजीव रेड्डी यांनीही आपल्या भाषणात बाबासाहेबांचा अनेक विशेषणांनी गौरव केला. अनावनण सभारंभाला उपराष्ट्रपती झाकीर हुसेन, उपपंतप्रधान मोरारजी देसाई, रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड, बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंत आंबेडकर, हुमायून कबीर व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.[४]

अनावरणापूर्वी श्रीलंकासांची येथील बौद्ध भिक्खूंनी यशवंत आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर बौद्धांना पंचशील दीक्षा दिली. त्या 'भव्य स्मारक शिल्प' दिवशी बाबासाहेबांचा जयघोष केला.बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या भावमुद्रेवरून ते भारतीय जनतेला 'नीतिधर्माप्रमाणे आचरण करा, राज्यघटनेचे पावित्र्य राखा आणि शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत राज्यघटनेत सांगिल्याप्रमाणे देशाचे संरक्षण करा,' या संदेशाचे स्मरण करून देत आहेत, असेच वाटते.[४][५]

संसद भवन परिसरात उभारला गेलेला हा बाबासाहेबांचा दुसरा पुतळा आहे. तत्पूर्वी जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू यांचा पुतळा या परिसरात उभारण्यात आला आहे.[४]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:बाबासाहेब आंबेडकर

  1. https://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/p8.asp
  2. २.० २.१ साचा:स्रोत पुस्तक
  3. साचा:स्रोत बातमी
  4. ४.० ४.१ ४.२ ४.३ साचा:जर्नल स्रोत
  5. भव्य स्मारक शिल्पाचा सुवर्णमहोत्सव, दैनिक वृत्तरत्न सम्राट, दि. १४ एप्रिल २०१७, जयंती विशेषांक, पृष्ठ क्र २४