भीम जन्मभूमी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट इमारत भीम जन्मभूमी हे मध्य प्रदेश राज्यातील डॉ. आंबेडकर नगर (पूर्वी महू) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असलेले एक स्मारक आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात भीमाबाईरामजी बाबा यांचे पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. (महू गावात लष्करी छावणी असल्याने त्या स्थानाला Military Headquarters of War-MHOW हे नाव होते. पुढे त्याच महू नावाने ते गाव ओळखले जाऊ लागले.)[१] आंबेडकरांच्या जन्माचे महत्त्व जाणून तेथील आंबेडकरवादी लोकांनी महू गावात आंबेडकरांचे एक भव्य स्मारक उभे केले आहे. यासाठी राज्य शासनाकडून देखील काही सहकार्य त्यांना झाले. या स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल १९९१ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते झाले. १४ एप्रिल २००८ रोजी स्मारकाचे लालकृष्ण आडवाणी यांचे हस्ते लोकार्पण केले गेले.[२] प्रत्यक्षात लष्करी छावणीतील आंबेडकरांचे एके काळचे राहते घर ताब्यात घेण्यासाठी १७ वर्ष प्रयत्न करावे लागले, त्यानंतर स्मारक उभारण्यासाठी त्यापुढील २० वर्षे लागली. एकूण ३७ वर्षांच्या प्रयत्नांनंतर २२ हजार चौरस फूट जागेत जन्मभूमीवर दोन मजली विहार तयार झाले. स्मारकाची रचना वास्तुविशारद ई.डी. निमगडे यांची आहे.[३][४]

मध्य प्रदेशातील भोपाळ येथून २१६ किमी अंतरावर व इंदूर येथून २० किलोमीटर अंतरावर महू आहे. महूची लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे. दरवर्षी येथे लाखो भीमानुयायी, बौद्ध व पर्यटक भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात. १९९१ साली १००व्या आंबेडकर जयंतीदिनी पंतप्रधान राजीव गांधी तर २०१६ साली १२५व्या आंबेडकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले होते.[५][६] २०१८ मध्ये १२७व्या आंबेडकर जयंतीदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महूला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.[७] पंचतीर्थ म्हणून भारत सरकारद्वारे विकसित होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित अशा पाच स्थळांपैकी हे एक स्थळ आहे.

इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांनी पुण्यातील पंतोजी शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. पुढे ते बढतीने प्रधान शिक्षक व त्यानंतर मुख्याध्यापक झाले. १४ वर्षे मुख्याध्यापकाचे काम केल्यानंतर ते सैन्यात सुभेदार मेजर म्हणून महूत नोकरीला लागले. महूत ते आपल्या कटुंबीयांसमवेत १८८९ पासून ते १८९४ पर्यंत राहिले. तेथेच १८९१ साली बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला; बालक भीमराव केवळ अडीच वर्ष महूत होता. पुढे अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य, भारतीय संविधानाची निर्मिती, सामुदायिक बौद्धधम्म दीक्षा व इतर गोष्टींमुळे बाबासाहेब आंबेडकर जागतिक पटलावर एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून गणले जाऊ लागते.[८][४]

आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्यासाठी अनुयायांनी देशभर त्यांची स्मारके उभारली. महू येथील अनुयायांनी देखील कष्टाने भीम जन्मभूमीवर स्मारक उभारले आहे. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरसुद्धा त्यांच्या जन्म झाला त्या निवासस्थानाची माहिती लोकांना नव्हती, केवळ महू या गावी त्यांचा जन्म झाल्याचेच बहुतेकांना माहिती होते. भंडारा जिल्ह्यातील भदंत धर्मशील यांनी महू येथील लष्करी अधिकारी डी.जी. खेवले यांच्यामार्फत भीम जन्मभूमीचा शोध लावला. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांना 'अलॉट' केलेल्या सरकारी निवासस्थानाचा अभिलेख सन १९७१ दरम्यान त्यांनी शोधून काढला. 'बॉम्बे महार रेजिमेंटच्या रजिस्टर'मध्ये रामजी सकपाळ यांना दिलेल्या निवासस्थानाची माहिती होती. त्या निवासस्थानामध्ये रामजी सकपाळ आपल्या कटुंबीयांसमवेत १८८९ पासून ते १८९४ पर्यंत राहिलेले असल्याचे त्यांना कळाले. तेव्हापासून भदंत धर्मशील यांनी आंबेडकरांचे स्मारक उभारणीसाठी 'महू' मध्येच ठाण मांडले. त्यांनी १९७२ दरम्यान स्थापलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कमिटीमार्फत लढा दिला. मात्र लष्कराने जमीन देण्यास नकार दिला त्यामुळे भदंत धर्मशील यांनी दिल्लीत २१ मार्च १९७४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये स्मारकासाठी जमीन दिल्याची घोषणा केली. पण ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्या झाल्यामुळे पुन्हा अंमलबजावणी रखडली. पुढे व्ही.पी. सिंग सरकारने २२ हजार चौरस फूट जागा धर्मशील यांच्या ट्रस्टला देऊ केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष भंते धर्मशील यांनी २७ मार्च १९९१ रोजी कमिटीची बैठक घेतली. तेथे निश्चित करण्यात आले, की स्मारकाचे भूमिपूजन करण्याकरता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना आमंत्रित केले जावे. याची सूचना मुख्यमंत्र्यांना दिली गेली. जन्मभूमीवर स्मारकाच्या बांधणीच्या नकाशे वास्तुशिल्पकार ई.डी. निमगडे यांनी तयार केले व जयंती उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली. बाबासाहेबांचा पवित्र अस्थिकलश आणण्याकरिता भंतेजी मुंबईला गेले शासनाकडून दहा हजार रुपये अनुदान घेऊन अस्थिकलश घेतला. मुंबईतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे घनश्याम तळवटकर आणि न्यायमूर्ती आर.आर. भोले यांच्याशी भेट घेतली. भंतेजी अस्थिकलश घेऊन १२ एप्रिल १९९१ला महूला आले. भूमिपूजनाच्या कार्यक्रमांसाठी दोन दिवस शिल्लक होते त्या काळात जिल्हाधिकारी अय्यर आणि एस.पी. माकूल यांनी बदोबस्त केला. १३ एप्रिल १९९१ रोजी येथे पहिल्यांदाच लाखो लोक जमले होते. १४ एप्रिल १९९१ या बाबासाहेबांच्या १०० व्या स्वर्णजयंतीदिनी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांनी स्मारकाचे भूमिपूजन केले, त्यांच्याबरोबर अटलबिहारी वाजपेयी, मंत्री भेरूलाल पाटीदार, भन्ते धर्मशील आणि इतर अनेक उल्लेखनीय व्यक्ती होते.[२][३][४]

निधीअभावी प्रत्यक्ष काम मात्र १९९४ दरम्यान सुरू झाले. पुढे १९९८ पर्यंत काम सुरू राहिले पण पुन्हा बंद पडले. स्मारकाचे वास्तविक काम २००६ ते २००८ दरम्यान झाले. भदंत धर्मशील यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण झाले. पुढे २००३ मध्ये आंबेडकरांच्या सन्मानार्थ राज्य शासनाने 'महू'ला डॉ. आंबेडकर नगर असे नाव दिले गेले. २०१८-१९ मध्ये, भारत सरकारने सुद्धा महू रेल्वे स्थानकाचे डॉ. आंबेडकर रेल्वे स्थानक असे नामकरण केले.[४][३][४]

रचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी भीम जन्मभूमी स्मारकाच्या आतील बाबासाहेबांच्या रमाईंच्या पुतळ्यांना अभिवादन करताना

भीम जन्मभूमी स्मारकाची रचना बौद्ध वास्तुकलेप्रमाणे एका स्तूपासारखी आहे. हे दोन मजली विहार असून पहिला मजला मुख्य जन्मस्थळ हॉल तर दुसरा मजला ध्यान हॉल म्हणून ओळखला जातो. या स्मारकाची एकूण उंची ६५ फुट आहे, जी आंबेडकरांच्या वयाची साधर्म्य दर्शवते. स्मारकात बाबासाहेबांचे एकूण तीन पूर्णाकृती ब्रॉंझचे पुतळे आहेत.

१४ फुटांचा पहिला प्रवेशद्वारावरील दर्शनी भागात आहे, त्याला २००८ मध्ये स्थापन केलेले आहे. तळमजल्यावर म्हणजेच मुख्य हॉल मध्ये, केंद्र स्थानी दीक्षाभूमी स्मारकाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे, नेमके याच ठिकाणी आंबेडकरांचा जन्म झाल्याचे मानले जाते. या हॉल मध्ये बाबासाहेबांचा जीवनपट अधोरेखित करणारे धातूंचे ४६ म्यूरल्स, खुर्चीत बसलेल्या स्थितीत आंबेडकरांच्या दुसरा पुतळा व त्यांच्या बाजूला रमाबाई आंबेडकर यांचाही पुतळा आहे. वरच्या मजल्यावर धम्म हॉलमध्ये, चित्रप्रदर्शन आहे आणि आंबेडकरांचे धम्मदीक्षा ग्रहण करतानाचे चित्रण आहे, त्यात तथागत बुद्ध, बाबासाहेबांना धम्मदीक्षा देणाऱ्या भदंत चंद्रमणी आणि स्वतः बाबासाहेब यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. येथे लोक ध्यान करतात.

प्रवेशद्वारावरील पुतळ्याच्या वरती "भीम जन्मभूमि" अशी हिंदी अक्षरे कोरलेली आहेत, आणि त्याच्यावर एक मोठे अशोकचक्र कोरलेले आहे. स्मारकाच्या समोर डावी-उजवीकडे असे दोन व एक शीर्षभागावर असे तीन पंचशील ध्वज (बौद्ध ध्वज) लावलेले आहेत. शिवाय तळमजल्यावर बाबासाहेबांचा जीवनपट अधोरेखित करणारे धातूंचे ४६ म्यूरल्स, वरच्या भागात चित्रप्रदर्शन आहे. विहाराच्या मागे ट्रस्टच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या 'अस्थी' ठेवल्या आहेत. देशभरातून येणारे अनुयायी या अस्थींसमोर नतमस्तक होतात. या अस्थी आंबेडकरांच्या जन्मदिनी व महापरिनिर्वाण दिनी स्मारकाच्या प्रवेशद्वारावजवळील आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ ठेवल्या जातात. स्मारकाला एकूण २४ खांब आहेत, जे अशोकचक्राचे आऱ्यांच्या संख्येनुसार असून सामाजिक संदेश देतात. या स्मारकावर आतापर्यंत (सन २०१९) सुमारे १२ कोटी रुपये खर्च झालेला असून स्मारकाचे बरेच काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे स्मारक शुभ्र धवल संगमरवर मार्बलचे बनवले गेले आहे.[४]

स्मारकाच्या जवळच असलेल्या सर्व्हे क्रमांक ६७ मधील साडेसात एकर जमीन ट्रस्टला हवी आहे. देशाभरातून आलेल्या अनुयायांसाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे या जमिनीवर आंबेडकर अनुयायांसाठी विश्रामगृह करायचे आहे.[४]

कार्यक्रम

मध्य प्रदेश सरकार दरवर्षी आंबेडकर जयंतीला महूमध्ये 'सामाजिक समरसता संमेलन' आयोजित करते. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबवले जातात.[९]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर