रा.सु. गवई

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट पदाधिकारी

रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई (३० ऑक्टोबर १९२९२५ जुलै, २०१५) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, आणि रिपाइं गवई गटाचे संस्थापक व अध्यक्ष होते. ते आंबेडकर प्रणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, आणि या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातही अनेक कामे केली. गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते. ते बिहार, सिक्किमकेरळ या तीन राज्यांचे राज्यपाल, तसेच लोकसभाराज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते. गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग ३० वर्ष सदस्य (आमदार) होते, यादम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, उपासभापती व विरोधी पक्षनेता या पदांवर कार्य केले होते. त्यांवी अनेक सामाजिक कामे सुद्धा केलेली आहेत.[१]

राजकीय कारकीर्द

गवई यांचा विद्यार्थी दशेपासून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रीय सहभाग होता. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे इ.स. १९६४ ते १९९४ अशी सलग ३० वर्षे सभासद (आमदार) होते. या कालावधी दरम्यान त्यांनी इ.स. १९६८ ते १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि इ.स. १९७८ ते १९८२ मध्ये विधान परिषदेचे सभापती म्हणून कार्य केले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते २० डिसेंबर १९८८ आणि २० डिसेंबर १९९० ते १७ जुलै १९९१ या काळात दोनदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले.[२]

गवई हे संसदेच्या दोन्ही सदनांचे सदस्य होते. इ.स. १९९८ मध्ये, ते १२व्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. १० मार्च इ.स. १९९८ ते २६ एप्रिल इ.स. १९९९ पर्यंत ते लोकसभेचे सदस्य (खासदार) होते.[३] त्यानंतर ३ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००६ दरम्यान ते राज्यसभेचे सभासद (खासदार) होते. राज्यसभेत त्यांनी अरुण शौरी लिखित 'वरशिपिंग फॉल्स गॉड' या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली असल्याने या पुस्तकाची पाने फाडून सभागृहात भिरकावली.[४]

गवईंनी तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे. ते सिक्कीमचे राज्यपाल म्हणून १३ जुलै २००६ ते १२ ऑगस्ट २००६ दरम्यान कार्यरत होते, तर बिहारचे राज्यपाल म्हणून २२ जून २००६ ते ९ जुलै २००८ दरम्यान, आणि केरळचे राज्यपाल म्हणून ११ जुलै २००८ ते ७ सप्टेंबर २०११ दरम्यान कार्यरत होते.[५]

सामाजिक कारकीर्द

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसियेशनचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या २३ नोव्हेंबर १९८० रोजी बँकॉक येथील सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. गवईंनी दलित लोकांच्या उद्धारासाठी भरीव कामगिरी केली त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेद वा पंथभेद पाळून स्वःजातियांना सवलती देऊन इतरांना कधीही दूर ढकलले नाही. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते. दीक्षाभूमी येथील स्तूप निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. इ.स. १९७८ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लागू करण्यात आल्या होत्या, त्याच सवलती अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातीलच बौद्ध धर्मांतरानंतर बनवलेल्या नवबौद्धांना (नवदीक्षित बौद्ध) त्या सवलती नाकारण्यात आल्या होत्या, त्यासाठी गवई यांनी दिल्लीमधील बोटक्लब मध्ये १४ दिवसांचे उपोषण केले होते, या उपोषणाच्या वेळी इंदिरा गांधी यांनी त्यांना भेट दिली होती.[६]

वैयक्तिक जीवन व शिक्षण

अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथे ३० ऑक्टोबर १९२९ रोजी गवईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सरूबाई तर वडिलांचे नाव सूर्यभान गवई होते. ते इ.स. १९५४ मध्ये नागपूर विद्यापीठतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. २९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचा विवाह कमला गवई यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले भूषण व राजेंद्र आणि एक मुलगी कीर्ती आहे. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, तर राजेंद्र गवई हे डॉक्टर, राजकारणी व भारिप (गवई)चे अध्यक्ष आहेत. रा.सु. गवई हे एक आंबेडकरवादीबौद्ध धर्मीय होते.[७][८]

भारिप मधील सहभाग

दादासाहेब गायकवाड व गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५६ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याशी त्यांचा संबंध आला. गायकवाड यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसशी युती केली. यावेळी पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे कॉंग्रेसने १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवडून रा.सु. गवई यांना आणि बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर उपसभापती म्हणून पाठविले. इ.स. १९६८ मध्ये गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. केंद्रीय कार्यकारिणीतील निवड व विधान परिषदेवर मिळालेले उपसभापतीपद या दोन्ही पदांमुळे गवई यांची महत्त्वाकांक्षा वाढली. याच काळात दादासाहेब गायकवाड यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे रिपब्लिकन पक्षनेता निवडीचा प्रश्न निर्माण झाला. गवईंना बॅ. खोब्रागडे अडसर वाटत होते. तो दूर करण्यासाठी गवईंनी शांताबाई दाणी यांच्या मार्फत आपले वजन वाढविले. त्यामुळे, दादासाहेब गायकवाड यांना गवई जवळचे वाटू लागले. ऑक्टोबर १९७०ला नागपूर येथे दादासाहेब गायकवाड प्रणीत गटाचे अधिवेशन भरविले. दुसरीकडे याचवेळी बॅ. खोब्रागडे यांनी देखील अधिवेशन भरविले व दोन गट भारतीय रिपब्लिकन पक्षात उदयास आले. दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला 'गवई गट' असे म्हटले जाऊ लागले.[९] यानंतर शांताबाई दाणी व गवई यांच्यात वाद झाला. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनरुज्जीवित केले. अशा प्रकारे १९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्या काळात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले. प्रत्येक गट स्वतःला अखिल भारतीय स्तरावरील भारतीय रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला. कुणी कॉंग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर बौद्ध-दलितांच्या मतांचा राजकीय लाभ मिळविण्याचे प्रयत्न नेते करू लागले. त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश या पक्षाला मिळाले नाही. फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले, ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली. रिपब्लिकन पक्षाच्या या वाताहतीचा परिणाम म्हणून पुढे दलित पॅंथरचा उदय झाला.

इ.स. १९९८ मध्ये, १२व्या लोकसभेवर महाराष्ट्रातून भारतीय रिपब्लिकन पक्षाचे चार उमेदवार हे खासदार म्हणून निवडून गेले होते, त्यांत एक गवईही होते, अन्य तिंघे प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडेरामदास आठवले हे होते.

शैक्षणिक कार्य

बिहारचे राज्यपाल असताना, रा.सु. गवई यांनी शिक्षणव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नागपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा संपूर्णपणे कायापालट करणारे डॉ. कृष्णकुमार यांना त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून बिहारमध्ये आणले. गवई यांनी केलेल्या कडक उपाययोजनांमुळे महाविद्यालयात न दिसणारा प्राध्यापकवर्ग नियमितपणे वर्गावर जाऊ लागला. जे प्राध्यापक अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा जाहीर इशाराच त्यांनी दिला होता. अभ्यासक्रम व सत्रदेखील नियमित करण्याचे निर्देश गवई यांनी विद्यापीठांना जारी केले होते..

धार्मिक काम

बिहारचे राज्यपाल असताना रा.सु. गवई यांनी तेथील जैनबौद्ध धर्मांच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातून तीर्थ यात्रेसाठी गेलेल्या राजेंद्र दर्डा यांनी बिहारमधील जैन तसेच बौद्ध धर्माच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मुद्दा मांडला होता. शिवाय तेथे पोहोचण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था, विश्रामगृह इत्यादींकडेही गवई यांचे लक्ष वेधले होते. रा.सु. गवई यांनी याची गंभीर दखल घेतली व तीर्थस्थळांच्या विकासासाठी १३०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी जातीने लक्ष घातले व अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केला हे विशेष.

निधन

गवईंचा मृत्यू वयाच्या ८६व्या वर्षी २५ जुलै २०१५ रोजी नागपुरातील कृष्‍णा रुग्णालयात झाला, या दवाखान्यात ते महिनाभर उपचार घेत होते. त्यांच्या मूळ गावी दारापूर येथे त्यांचा अंतिम संस्कार केला गेला.[१०][११]

भूषविलेली पदे

गवईंनी भूषविलेली काही प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:

  • १९५९ साली ते विदर्भ रिपब्लिकन पार्टीचे सेक्रेटरी झाले.
  • १९७२ मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष झाले.
  • १९७२ मध्ये नागपूर येथील दीक्षाभूमीच्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती"चे अध्यक्ष झाले.
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (आमदार) [सलग पाच वेळा, १९६४ ते १९९४] : १९६४ ते ७०, १९७० ते ७६, १९७६ ते ८२, १९८२ ते ८८ आणि १९८८ ते ९४
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती : इ.स. १९६८ ते ७८.
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती : इ.स. १९७८ ते ८२
  • कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे सदस्य
  • महाराष्ट्र शाखेचे संयुक्त अध्यक्ष
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता (दोनदा): १२ डिसेंबर १९८६ ते २० डिसेंबर १९८८; आणि २० डिसेंबर १९९० ते १७ जुलै १९९१[१२]
  • १२व्या लोकसभेचे सदस्य (खासदार) : १९९८ ते ९९
  • राज्यसभा सदस्य (खासदार) : ३ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००६
  • बिहारचे राज्यपाल : २२ जून २००६ ते ९ जुलै २००८
  • सिक्कीमचे राज्यपाल : १३ जुलै २००६ ते १२ ऑगस्ट २००६
  • केरळचे राज्यपाल : १० जुलै २००८ ते २५ ऑगस्ट २०११

लिहिलेली पुस्तके

साचा:विस्तार गवईंनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी एक -

  • आंबेडकरी चळवळीतील एक संघर्ष पर्व (गौरव प्रकाशन)

सन्मान आणि पुरस्कार

गवई यांना मिळालेले काही सन्मान आणि पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत:

  • कुष्ठरोग्यांकरिता केलेल्या मदतीबद्दल मिळालेले 'कुष्ठमित्र अ‍ॅवॉर्ड' आणि 'कुष्ठरोग्यांचा मित्र अ‍ॅवॉर्ड'
  • प्रियदर्शनी ग्रुप, मुंबई यांच्यातर्फे 'प्रियदर्शिनी अ‍ॅवॉर्ड' (१९९०-९१)
  • नॅशनल प्रेस इंडिया, नवी दिल्ली यांच्यातर्फे 'नॅशनल प्रेस अ‍ॅवॉर्ड' (१९९४)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य मध्यवर्ती स्मारक उभे राहावे याकरिता घेतलेले परिश्रम याकरिता 'ईश्वरी देवी अ‍ॅवॉर्ड' (हैदराबाद, १९९९)
  • मारवाडी फाउंडेशनचा 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार'

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:अमरावती