राहुल द्रविड
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
राहुल द्रविड (साचा:Audio; जन्म ११ जानेवारी १९७३) हा माजी भारतीय खेळाडू आणि कर्णधार आहे. त्याला क्रिकेटच्या इतिहासातील एक महान फलंदाज म्हणून ओळखले जाते.[१][२][३] मराठी कुटूंबात जन्म झालेल्या राहुलने, वयाच्या १२ व्या वर्षापासून क्रिकेट खेळावयास सुरुवात केली. त्यानंतर त्याने १५-वर्षांखालील, १७-वर्षांखालील आणि १९-वर्षांखालील राज्यस्तरीय संघांचे प्रतिनिधीत्व केले. द वॉल, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडचा २००० साली विस्डेन क्रिकेटर्स अल्मनाकने सर्वोत्कृष्ट पाच फलंदाजांमध्ये उल्लेख केला होता. २००४ मध्ये सुरू झालेल्या पहिल्याच आयसीसी पुरस्कार समारोहात, दरवर्षी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडूचा पुरस्कार मिळाला.[४][५] डिसेंबर २०११ मध्ये, कॅनबेरा येथे ब्रॅडमन ओरेशन देणारा तो पहिला बिगर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होता.[६]
एप्रिल २०१६ पर्यंत राहुल द्रविड हा कसोटी क्रिकेटमधील सचिन तेंडूलकर, रिकी पॉंटिंग आणि जॅक कॅलिसनंतर चवथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच कसोटी आणि एकदिवसीय ह्या दोन्ही प्रकारांत प्रत्येकी १०००० धावा करणारा सचिन तेंडूलकर नंतर तो भारताचा केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे.[७][८] २००४ मध्ये, चट्टग्राम येथे बांगलादेशविरुद्ध शतक केल्यानंतर, सर्वच्या सर्व दहा कसोटी खेळणाऱ्या देशांत शतके करणारा, तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज बनला.[९] एप्रिल २०१६ पर्यंत, यष्टीरक्षकाव्यतिरीक्त, कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने एकूण १६४ सामन्यांत २१० झेल घेतले आहेत.[१०][११]
ऑगस्ट २०११ मध्ये, इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी अचानक निवड झाल्यानंतर, त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधून निवृत्ती जाहीर केली आणि मार्च २०१२ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेट मधूनही निवृत्ती जाहीर केली. २०१२ इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते.[१२]
सिडनी येथे १ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या सातव्या वार्षिक ब्रॅडमॅन पुरस्कार सोहळ्यात राहुल द्रविडचा, ग्लेन मॅकग्रासोबत सन्मान करण्यात आला होता.[१३] भारत सरकारद्वारा दिल्या जाणाऱ्या पद्मश्री आणि पद्म भूषण ह्या अनुक्रमे चवथ्या आणि तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने द्रविडला सन्मानित करण्यात आले आहे.[१४][१५]
२०१४ मध्ये, राहुल द्रविड बंगळूर स्थित गोस्पोर्टस् फाऊंडेशमध्ये सल्लागार मंडळाचा सभासद म्हणून सामील झाला. गोस्पोर्टस् फाऊंडेशनच्या सहकार्याने राहुल द्रविड ॲथलीट मार्गदर्शक कार्यक्रमाअंतर्गत तो भविष्यातील ऑलिंपिक आणि पॅरालिंपीक खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहे.[१६] भारताचा बॅडमिंटन खेळाडू प्रणॉय कुमार, पॅरा-जलतरणपटू शरथ गायकवाड आणि तरूण गोल्फपटू चिक्करंगप्पा एस. हे तो मार्गदर्शन करीत असलेल्या सुरुवातीच्या गटातील खेळाडू आहेत.
सुरुवातीचे आणि वैयक्तिक जीवन संपादन
द्रविडचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर मध्ये एका मराठी कुटूंबात झाला.[१७] त्याचे कुटूंब नंतर कर्नाटकमधील बंगळूर येथे स्थायिक झाली, तेथेच तो लहानाचा मोठा झाला.[१८] त्याची मातृभाषा मराठी आहे.[१९] द्रविडचे वडील जॅम आणि प्रिझर्व्हज् बनविणाऱ्या कंपनीत काम करीत त्यामुळे कालांतराने राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. त्याची आई, पुष्पा, बंगळूर येथील विद्यापीठ विश्वेश्वरैया अभियांत्रिकी महाविद्यालयात वास्तुशास्त्राची प्राध्यापिका होती.[२०] द्रविडला विजय नावाचा लहान भाऊ आहे.[२१] बंगळूर येथील सेंट जोसेफ बॉइज हायस्कूलमध्ये त्याने शालेय शिक्षण घेतले, तर सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली.[२१] सेंट जोसेफ कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशन येथे एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली.
वाढीची सुरुवातीची वर्षे आणि देशांतर्गत कारकीर्द संपादन
वयाच्या १२ व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि १५, १७ आणि १९ वर्षांखालील कर्नाटकच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले.[२२] चिन्नास्वामी मैदाना उन्हाळी शिबीरात प्रशिक्षण देत असताना, माजी क्रिकेटपटू आणि कोच केकी तारापोर यांना सर्वप्रथम द्रविडची प्रतिभा लक्षात आली.[२३] द्रविडने आपल्या शाळेच्या संघातून खेळताना शतक झळकावले होते.[२४] तो एक यष्टीरक्षक म्हणून सुद्धा खेळला आहे.[२१]
द्रविडने फेब्रुवारी १९९१ मध्ये रणजी करंडक पदार्पण केले, त्यावेळी तो महाविद्यालयीन विद्यार्थीच होता.[२५] त्यावेळी तो पुण्यामध्ये महाराष्ट्राविरुद्ध त्याचेच भविष्यातील संघ सहकारी अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांच्या सोबत खेळत होता. अनिर्णित राहिलेल्या सामन्यात त्याने ८२ धावा केल्या.[२६] १९९१-९२ च्या त्याच्या पहिल्या संपूर्ण मोसमात, त्याने दोन शतके आणि ६३.३ च्या सरासरीने ३८० धावा केल्या,[२७] त्याच्या या कामगिरीमुळे दुलीप करंडकाच्या दक्षिण विभाग क्रिकेट संघात त्याची निवड झाली.[२८]
आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपादन
आंतरराष्ट्रीय पदार्पण संपादन
१९९६ च्या विश्व चषक स्पर्धेनंतर लगेचच विनोद कांबळीच्या जागी संघात स्थान मिळवित, द्रविडने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण ३ एप्रिल १९९६ रोजी श्रीलंकेविरुद्ध सिंगापूर येथील सिंगर चषक स्पर्धेच्या एकदिवसीय मालिकेत केले.[२९][३०] सामन्यात तो फलंदाजीत चमकदार कामगिरी करू शकला नाही. मुथय्या मुरलीधरनने त्याला बाद करण्याआधी त्याने फक्त तीन धावा केल्या, परंतु क्षेत्ररक्षण करताना त्याने २ झेल पकडले.[३१] पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या सामन्यातही त्याच्या पदरी अपयश आले. केवळ ४ धावा करून तो धावचित झाला.[३१] सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये केवळ २१ धावांच्या कामगिरीमुळे द्रविडला एकदिवसीय संघातले आपले स्थान गमवावे लागले.
एकदिवसीय पदार्पणाच्या एकदम विरुद्ध, त्याचे कसोटी पदार्पण फारच यशस्वी ठरले. त्याच्या सलग ५ वर्षातील देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ म्हणून इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात द्रविडला स्थान मिळाले.[३२][३३] ग्लाउस्टरशायरविरुद्ध ८६ आणि लीस्टरशायरविरुद्ध ५८ अशा अर्धशतकी खेळी करूनही त्याला पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान मिळाले नाही.[३१][३४] त्यानंतर संजय मांजरेकर दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आणि २० जून २०१६ रोजी लॉर्ड्सवर खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली.[३०] पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे मांजरेकरला दुसऱ्या कसोटीच्या दिवशी सकाळी फिटनेस चाचणी देणे गरजेते होते. जर मांजरेकर चाचणीत नापास झाला तर तुला खेळावे लागेल असे द्रविडला त्या सकाळी कळवण्यात आले होते. नाणेफेकीच्या फक्त १० मिनीटे अगोदर, भारतीय संघाचे तत्कालीन प्रशिक्षक संदीप पाटील, द्रविडकडे गेले आणि त्याला म्हणाले की तो खरोखरच आज त्याचे पदार्पण करणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर पाटील आठवण सांगतात:[३५] साचा:Quote द्रविड ७व्या क्रमांकावर क्रमांकावर फलंदाजीला आला,[३६] आणि त्याने दुसरा पदार्पण करणारा फलंदाज सौरभ गांगुली सोबत ९४ धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली. गांगुली बाद झाल्यानंतरही त्याने त्याचे कर्नाटक संघातले सहकारी अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथसोबत अनुक्रमे ५५ आणि ३७ धावांची भागीदारी करून त्याच्या संघाला एक महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.[३७] ख्रिस लुईसच्या गोलंदाजीवर बाद होण्याआधी, ६ तासांपेक्षा जास्तवेळ फलंदाजी करताना त्याने ९५ धावा केल्या. त्यावेळी तो त्याच्या पदार्पणातल्या शतकाच्या फक्त ५ धावा दूर होता, जेव्हा त्याने लुईसच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे झेल दिला आणि पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता तंबूच्या दिशेने चालू लागला. जेव्हा त्याला त्याबद्दल विचारले गेले, तेव्हा तो म्हणाला, "मैदानावर प्रत्येकाने चेंडूचा स्पर्श बॅटला झाल्याचा आवाज ऐकला होता".[३५] त्या सामन्यात त्याने श्रीनाथच्या गोलंदाजीवर, त्याचा पहिला झेल घेऊन नासिर हुसेनला बाद केले.[३८][३९] दौऱ्यातल्या पुढच्या सामन्यात, द्रविडने ब्रिटीश विद्यापीठाविरुद्ध शतक झळकावले[३१] तिसऱ्या सामन्यात मांजरेकरच्या पुनरागमनानंतरही संघातले आपले स्थान त्याने राखले. शेवटी मांजरेकरला जागा देण्यासाठी अजय जडेजाला संघातून वगळण्यात आले.[४०] नॉटिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ८४ धावा केल्या.[३१] पदार्पणातील कसोटी मालिकेच्या दोन सामन्यात त्याने ६२.३३ च्या प्रभावी सरासरीने धावा केल्या.[३५]
ब्रॅंडेड – दोन स्वरूपांची गोष्ट संपादन
द्रविडची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातीची वर्षे ही त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या अगदी विरुद्ध आहेत. जरी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये लगेच नाव कमावले असले तरी, एकदिवसीय क्रिकेट मध्ये ठसा उमटवण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला.[४१][४२]
कसोटी क्रिकेटमधील यश संपादन
इंग्लंडमध्ये यशस्वी कसोटी पदार्पण केल्यानंतर, द्रविडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली येथे पार पडलेल्या पहिल्या बॉर्डर-गावस्कर चषकाच्या एकमेव कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. हा त्याचा भारतातील पहिलाच सामना. पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने ४० धावा केल्या.[३६][४३] नोव्हेंबर १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मालिकेदरम्यान अहमदाबादमध्ये झालेल्या तीन पैकी, पहिल्या कसोटी सामन्यात द्रविड प्रथमच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला.[३६] त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याला सलामीवीराच्या स्थानावर बढती मिळाली आणि तिसऱ्या कसोटीत तो पुन्हा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला.[३६] मालिकेमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. त्याने २९.१६ च्या सरासरीने १७५ धावा केल्या, तरीही भारतातर्फे मालिकेतील तो तिसरा सर्वोत्तम फलंदाज होता.[४४] भारताने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली.[४५]
दोन आठवड्यांनंतर भारतीय संघ तीन कसोटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला. डर्बन येथील पहिल्या कसोटीत विजयासाठी ३९५ धावांची गरज असताना, उसळत्या आणि वळत्या खेळपट्टीवर भारताचा संघ अवघ्या ६६ धावांत बाद झाला.[४६] त्या डावात नाबाद २७ धावा करून दोन अंकी धावसंख्या करणारा द्रविड हा एकमेव फलंदाज होता.[४७] दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात द्रविडला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली.[३६] जरी द्रविडने १२ धावा केल्या आणि भारताच्या पदरी ह्या सामन्यातही पराभव पडला,[४८] तरी ह्या चालीचे खरे फलित भारताला मिळाले ते वॉंडरर्सच्या तिसऱ्या कसोटीत. द्रविडने पहिल्या डावातील पहिले शतक साजरे करताना १४८ धावा केल्या, आणि दुसऱ्या डावातही ८१ धावा करून भारताच्या कसोटी विजयाच्या समीप नेऊन ठेवले होते. परंतु त्यानंतर गडगडाटासह आलेले वादळ आणि डॅरेल कलीननच्या शतक दक्षिण आफ्रिकेच्या मदतीसाठी धावून आले आणि सामना अनिर्णितावस्थेत संपला.[४९][५०] ह्या सामन्यातील द्रविडच्या कामगिरीमुळे त्याला त्याचा कसोटी क्रिकेट मधील पहिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[५१] मालिकेमध्ये भारतातर्फे द्रविडने ५५.४० च्या सरासरीने सर्वाधिक २७७ धावा केल्या.[५२]
दक्षिण आफ्रिकेनंतर वेस्ट इंडीजविरुद्ध सुद्धा त्याने आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतही तो भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने चार अर्धशतकांसहित ७२.०० च्या सरासरीने ३६० धावा केल्या.[५३] त्याच्या चांगल्या कामगिरीनंतर सुद्धा, भारताने मालिका ०-१ अशी गमावली.[५४] जॉर्जटाऊन मधील पाचव्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने केलेल्या ९२ धावांमुळे त्याला शिवनारायण चंद्रपॉलसोबत सामनावीराचा बहुमान विभागून देण्यात आला.[५५] या मालिकेसोबत, द्रविडने त्याच्या एका संपूर्ण यशस्वी कसोटी मोसमाची सांगता केली. १९९६/९७ च्या मोसमात १२ सामन्यांमध्ये सहा अर्धशतके आणि एका शतकासहित ५०.११ च्या सरासरीने ८५२ धावा करून तो कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[५६]
द्रविडच्या कामगिरीतील सातत्य यानंतरही कायम राहिले. नंतरच्या आठ कसोटी सामन्यांत त्याने सात अर्धशतके केली, ज्यात ६ लागोपाठच्या अर्धशतकांचा (श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी ३) समावेश होता.[३६] असे करणारा गुंडप्पा विश्वनाथनंतर तो दुसराच भारतीय फलंदाज.[५७] श्रीलंकेमध्ये, श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खराब कामगिरी करूनही द्रविडची निवड त्यास संघासोबतच्या मायदेशी खेळविल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी झाली. त्यात त्याने ७६.०० च्या सरासरीने ३०४ धावा केल्या.[५८] १९९७/९८ च्या कसोटी मोसमाच्या शेवटापर्यंत त्याने २२ कसोटी सामन्यांत १५ अर्धशतके केली, ज्यामध्ये चार नव्वदपेक्षा जास्त धावा आणि एका शतकाचा समावेश होता.[५९]
द्रविडच्या शतकांचा दुष्काळ पुढच्याच मोसमात संपुष्टात आला.[६०] त्याने आधीच्या मोसमापेक्षा वरचढ कामगिरी करताना चार शतके आणि एका अर्धशतकासहित ६२.६६ च्या सरासरीने ७ कसोटी सामन्यांत ७५२ धावा केल्या.[६१] त्यापैकी पहिले शतक आले ते झिम्बाब्वे दौऱ्यावर. झिम्बाब्वेविरुद्ध दोन्ही डावात द्रविडने अनुक्रमे ११८ आणि ४४ धावा अशा सर्वात जास्त धावा केल्या.[६२] त्याच्या अशा कामगिरीनंतरही भारताला तो एकमेव कसोटी सामना गमवावा लागला.[६३] यानंतरच्या १३ वर्षांत, ज्या ज्या कसोटीत द्रविडने शतक केले तेव्हा भारताचा पराभव झाला नाही.[६४]
पुढच्या दौऱ्यावरील न्यू झीलंडविरुद्धच्या मालिकेची सुरुवात झाली ती दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातील त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या ‘डक’ने[६५] (पहिली कसोटी एकही चेंडू न टाकता रद्द केली गेली)[६६] आणि शेवट झाला तो हॅमिल्टनमधील तिसऱ्या कसोटीतील दुहेरी शतकाने.[६७] त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे १९० आणि १०३ धावा केल्या. एका कसोटीच्या दोन्ही डावांत शतके करणारा तो विजय हजारे आणि सुनील गावस्कर, यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज.[६८][६९] त्याच्या न्यू झीलंडविरुद्धच्या १९० धावांच्या खेळीत, त्याने जवागल श्रीनाथ सोबत ८व्या गड्यासाठी १४४ धावांची विक्रमी भागीदारी केली.[६७][७०] सामना अनिर्णितावस्थेत संपला.[६९]
त्या महिन्याच्या शेवटी, भारतीय संघ मायदेशी पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्याची मालिका खेळला. मालिकेत द्रविड समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. आणि भारताच्या पदरी पहिल्या सामन्यात पराभव पडला[७१] परंतु दिल्लीला झालेल्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात कुंबळेने घेतलेल्या ऐतिहासिक १० बळींमुळे भारताने सामना जिंकला.[७२] द्रविडने कुंबळेचा आठवा बळी मुश्ताक अहमदचा झेल घेतला.[७३]
दोन आठवड्यांनंतर पहिल्या आशियायी कसोटी चॅम्पियनशीपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारत असा सामना झाला. द्रविड सामन्यात फक्त २४ आणि १३ धावा करू शकला आणि भारताने इडन गार्डन्सवर झालेला सामना गमावला.[७४] कोलंबो येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध द्रविडने पहिल्या डावात शतक झळकावले आणि दुसऱ्या गड्यासाठी सदागोपान रमेशसोबत २३२ धावांची विक्रमी भागीदारी केली.[७५] त्याशिवाय शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करताना रसेल आर्नॉल्डला धावचीत केले.[७६] चवथ्या दिवशी सकाळी त्याच स्थानावर क्षेत्ररक्षण करताना जयवर्धनेने टोलावलेला एक चेंडू त्याच्या हेल्मेटमधून त्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली लागला. झालेल्या इजेमुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजीला येऊ शकला नाही.[७७] भारताला सामना अनिर्णित राखण्यावर समाधान मानावे लागले आणि त्यामुळे अंतिम सामन्यासाठी संघ पात्र होऊ शकला नाही.[७८]
एकदिवसीय क्रिकेटमधील संघर्ष संपादन
कसोटी कारकिर्दीच्या अगदी विरुद्ध, द्रविडला एकदिवसीय क्रिकेट मध्ये स्वतःची छाप पाडण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला.[७९] सिंगर चषक, १९९६ मध्ये दोन वेळा अयशस्वी होऊनही त्याची निवड शारजा मध्ये त्यानंतर लगेच होणाऱ्या पेप्सी चषकासाठी झाली. त्रिकोणी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांत तो फक्त १४ धावा करू शकला आणि त्यानंतर लगेचच संपूर्ण स्पर्धेतून त्याला वगळण्यात आले.[८०][८१] १९९६ च्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर, टेक्साको ट्रॉफीच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यासाठी त्याची निवड झाली नाही,[८१] परंतु तिसऱ्या सामन्यात संधी मिळाल्यानंतर त्याने डावाच्या शेवटी १५ चेंडूंत २२ धावा केल्या.[८२] त्यानंतर भारत श्रीलंकेत चौकोनी मालिका खेळण्यासाठी गेला, ज्यात द्रविडला दोन डावांत फक्त २० धावा करता आल्या.[८०]
एकदिवसीय क्रिकेट मध्ये द्रविडने पहिल्यांदा यशाची चव चाखली ती जेव्हा भारतीय संघ १४-२३ सप्टेंबर १९९६ दरम्यान कॅनडा येथे फ्रेंडशिप चषक खेळण्यासाठी गेला.[८३] द्रविडने पाकिस्तान विरुद्ध ५ सामन्यांमध्ये ४४.०० च्या सरासरीने २२० धावा केल्या.[८४] दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीनने तिसऱ्या गड्यासाठी १६१ धावांची भागीदारी केली.[८५] त्याने कमी धावसंख्येच्या तिसऱ्या सामन्यात ४६ धावा केल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमधल्या त्याच्या पहिल्यावहिल्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.[८६] तो मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असूनही,[८४] भारताने मालिका २-३ अशी गमावली.[८७]
सहारा चषकानंतर, भारतीय संघ दोन त्रिकोणी मालिका खेळला. पहिली टायटन चषक, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश होता[८८] आणि दुसरी स्टॅंडर्ड बँक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचा समावेश होता.[८९] ह्या दोन्ही त्रिकोणी मालिका भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान १९९६/९७ मध्ये मायदेशी आणि परदेशी लागोपाठ खेळविल्या गेलेल्या मालिकांचा एक भाग होता. दोन्ही त्रिकोणी मालिकांच्या मध्ये भारता आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये मुंबई येथे मोहिंदर अमरनाथ बेनिफीट सामनासुद्धा खेळवला गेला.[९०] द्रविड या सर्व सामन्यांमध्ये खेळला.[८०] त्याला या सामन्यांमध्ये माफक यश मिळाले. टायटन चषक(६ सामन्यांत २९.३३ च्या सरासरीने १७६ धावा[९१]) आणि भारतातील कसोटी मालिकेमध्ये (३ सामन्यांत २९.१६ च्या सरासरीने १७५ धावा[९२]) तो भारतातर्फे तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तसेच दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेप्रमाणेच (३ सामन्यांत ५५.४० च्या सरासरीने २७७ धावा[५२]) तेथील त्रिकोणी मालिकेमध्ये (८ सामन्यांत ३५.०० च्या सरासरीने २८० धावा[९३]) सुद्धा तो भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला तरीही सामन्यात सर्वाधिक ८४ धावा करणाऱ्या द्रविडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.[९४]
झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताच्या एकदिवसीय संघात द्रविडची निवड झाली, परंतु दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणी मालिकेतील चांगल्या कामगिरीनंतरही त्याला एकाही सामन्यात अंतिम ११ जणांत खेळण्याची संधी मिळाली नाही.[८१] परंतु त्यानंतर वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर कसोटी मालिकेमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याला एकदिवसीय मालिकेतसुद्धा सर्व सामने खेळण्याची संधी मिळाली. चार सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याला माफक यश मिळाले. त्याने ३ डावांत ४०.३३ च्या सरासरीने १२१ धावा केल्या.[९५] त्यानंतर इंडिपेंडन्स चषक चौकोनी मालिकेमध्ये पाकिस्तानविरुद्ध चेन्नई मध्ये झालेल्या सामन्यात त्याने त्याचे पहिलेवहिले एकदिवसीय शतक साजरे केले.[९६], परंतु भारताचा पराभव झाला. चौकोनी मालिकेमध्ये ९४.५० च्या सरासरीने १८९ धावा करून तो भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता,[९७] परंतु भारत अंतिम सामन्यासाठी पात्र झाला नाही.[९८] त्यानंतर आशिया चषक आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामनांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये तो जास्त प्रभाव पाडू शकला नाही. दोन्ही मालिकांमध्ये त्याने प्रत्येकी एक अर्धशतक केले. त्यानंतर टोरांटो येथे झालेल्या फ्रेंडशिप चषक स्पर्धेत त्याला धावांसाठी फार संघर्ष करावा लागला. भारताने स्पर्धा जिंकली परंतु द्रविड चार डावांमध्ये फक्त ६५ धावा करू शकला. पाकिस्तानविरुद्धच्या विल्स चॅलेंज मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वाधिक ८१ चेंडूत ५० धावा करूनही[९९], त्याला अंतिम दोन सामन्यांसाठी शेवटच्या ११ जणांमध्ये स्थान मिळू शकले नाही.[१००][१०१] डिसेंबर १९९७ मध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली, परंतु पहिल्या दोन सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.[१०२][१०३] तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध त्याला संधी मिळाली आणि त्या सामन्यात तो भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता.[१०४] तरीही त्याला भारतीय एकदिवसीय संघातून त्यानंतरच्या संपूर्ण एकदिवसीय मोसमासाठी वगळण्यात आले.[८१]
मे १९९८ दरम्यान खेळवल्या गेलेल्या कोका-कोला त्रिकोणी मालिकेसाठी द्रविडचा पुन्हा एकदा संघात समावेश केला गेला, परंतु तेथेही तो अपयशी ठरला. त्याने ४ सामन्यांमध्ये फक्त ८८ धावा केल्या, ज्या मध्ये बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांत २२ चेंडूंत ५ आणि २१ चेंडूंत १ धाव असे खराब प्रदर्शन होते.[१०५][१०६] त्यामुळे सहाजिकच अंतिम सामन्यातून त्याला वगळण्यात आले.[१०७] आणि त्यानंतर श्रीलंकेतील सिंगर निदहास त्रिकोणी मालिकेतूनही त्याला वगळण्यात आले.[८१]
टोरांटो मध्ये खेळवल्या गेलेल्या १९९८ च्या फ्रेंडशिप चषकासाठी द्रविडची पुन्हा एकदा निवड झाली आणि तिथेही ४ सामन्यांत अवघ्या ३२ धावा करून तो संघर्ष करताना दिसला,[१०८] त्यामुळे पुन्हा एकदा मालिकेच्या शेवटच्या सामन्यामधून त्याला वगळण्यात आले.[१०९] झिम्बाब्वे दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी आपले स्थान अबाधित राखण्यात त्याला यश आले, आणि त्याने तेथे बऱ्यापैकी कामगिरी केली (२ डावांत ४६.०० च्या सरासरीने ९२ धावा).[११०] त्याने आयसीसी नॉकआऊट ट्रॉफीमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले परंतु त्याला फारसे यश मिळू शकले नाही. त्यानंतर कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी १९९८-९९ साठी त्याची एकदिवसीय संघात निवड झाली, परंतु पहिल्या ३ सामन्यांत त्याला खेळायला मिळाले नाही. झिम्बाब्वेविरुद्ध फारसे महत्त्व नसलेल्या सामन्यात त्याला संधी मिळली परंतु ३ धावा करून पुन्हा एकदा त्याच्या पदरी अपयशच आले,[१११] आणि अंतिम सामन्यातून त्याला पुन्हा एकदा वगळण्यात आले.[११२] १९९८ च्या शेवटा पर्यंत द्रविडने ६५ सामन्यांत ३१.६४ च्या सरासीने १७०९ धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट ६३.४८ इतका खराब होता.[११३]
आता पर्यंत क्रिकेट तज्ञ आणि क्रीडा पत्रकारांनी द्रविडवर “कसोटी विशेषज्ञ” असा शिक्का मारला होता.[८३] कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्य धावा करणारा द्रविड त्याच्या एकदिवसीय क्रिकेट मधील खराब स्ट्राईक रेट मुळे वारंवार टिकेचा धनी होत होता.[८३] अनेक कारणांमुळे त्याच्यावर टीका झाली, एकदिवसीय क्रिकेटच्या शैलीशी त्याला जुळवून घेता येत नसे, स्ट्राइक रोटेट करणे त्याला जमत नसे तसेच मोठे फटके खेळण्यात तो कमी पडतो, त्यामुळे इतर फलंदाजांवर दबाव येई[११४] १९९९ साली हे सर्व बदलले.[८३] त्याने विविध फटके आपल्या भात्यात आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचा खेळ बदलला. तसेच एकदिवसीय क्रिकेटसाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारे आपली फलंदाजी शैली बदलली.[११४]
नवीन वर्षात त्याने त्याची एकदिवसीय मोहिम सुरू केली ती तौपो येथे न्यू झीलंड विरुद्ध १ षट्कार आणि १० चौकारांनीशी १२३ चेंडूंत १२३ धावा करून,[११५], त्याच्या एक आठवडा अगोदर हॅमिल्टन कसोटी मध्ये त्याने दोन्ही डावांत शतके झळकावली होती.[६७] पुढच्या चार सामन्यात त्याने आणखी १८६ धावा केल्या आणि ७७.२५ च्या सरासरीने ५ सामन्यांत ३०९ धावा करून मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी राहिला.[११६] इडन पार्क येथील चवथ्या सामन्यातील ७१ चेंडूंती ५१ धावांनी त्याला त्याचा चवथा आणि भारताच्या विजयास कारणीभूत ठरलेला पहिलाच सामनावीराचा पुरस्कार मिळवून दिला,[११७] त्याला या पूर्वी सामनावीराचा पुरस्कार मिळालेल्या सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला होता.
नागपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध पेप्सी चषक, १९९८-९९ मध्ये द्रविडने आणखी एक शतक ठोकले,[११८] एक महिना अगोदर त्याने श्रीलंकेविरुद्धच आशियायी कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत शतक काढले होते.[११९] पुढच्याच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी केली आणि सईद अन्वरला बाद केले, तो त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच बळी ठरला. उर्वरित स्पर्धेत तो फारशा धावा करू शकला नाही. त्यानंतर त्याच्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणूनच कि काय, त्याने शारजा मधल्या कोका-कोला चषक, १९९८-९९ मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध अर्धशतके केली.[१२०] मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा नियुक्त यष्टिरक्षक नयन मोंगियाला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले आणि द्रविडने यष्टिरक्षकाची धुरा सांभाळली. त्याने सुनील जोशीच्या गोलंदाजी वर ग्रॅमी हिकला यष्टिचीत केले, आणि तो त्याचा यष्टिरक्षक म्हणून पहिला बळी ठरला.[१२१] त्याने सामन्यात आणखी एक झेलसुद्धा घेतला. मालिकेत पाच सामन्यांत त्याने भारताकडून सर्वात जास्त, १८८ धावा केल्या,[१२२] परंतु विश्वचषकाआधीच्या त्याच्या शेवटच्या सामना आणि पाकिस्तानविरुद्ध मालिकेच्या अंतिम सामन्यात तो शून्यावर बाद झाला.[१२३]
पदार्पणातील विश्व चषकामधील यश संपादन
द्रविडने विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केले ते दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होव येथे, त्यात त्याने ५४ धावा केल्या, परंतु झिम्बाब्वेविरुद्ध पुढच्याच सामन्यात तो अवघ्या १३ धावांवर बाद झाला.[१२४] भारताने दोन्ही सामने गमावले.[१२५] सुपर सिक्स फेरीमध्ये पात्र होण्यासाठी भारताला पुढील तीनही सामने जिंकावे लागणार होते. द्रविडने त्याचे विश्वचषक स्पर्धेतील पहिले शतक झळकावले ते ब्रिस्टॉल येथे केन्या विरुद्ध, ज्यात त्याने सचिन तेंडूलकर सोबत नाबाद २३७ धावांची भागीदारी केली, त्यात त्याचा वाटा होता १०४* धावांचा.[१२६] भारताने सामना ९४ धावांनी जिंकला. सामन्यादरम्या मोंगियाला दुखापत झाल्याने द्रविडला त्याच्या बदली यष्टिरक्षण करणे भाग पडले.[१२७] पुढच्या टाऊंटन येथील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही दुखापतीतून मोंगिया न सावरल्याने, द्रविडलाच यष्टिरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.[१२८] तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत द्रविडने १४ चौकार आणि एका षट्कारासह फक्त १२९ चेंडूंत १४५ धावा केल्या, आणि विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात लागोपाठ दोन शतके झळकाविणारा तो फक्त दुसरा फलंदाज ठरला.[१२८] त्याने सौरव गांगुली सोबत ३१८ धावांची भागीदारी केली, जी एकदिवसीय इतिहासातील एकमेव त्रिशतकी भागीदारी होय.[१२९] भारताने सामना १५७ धावांनी जिंकला[१३०] इंग्लंडविरुद्ध गट फेरीच्या शेवटच्या सामन्यात त्याने आणखी एक अर्धशतक झळकावले.[१२४] भारताने सामना जिंकला आणि गटात दुसरा क्रमांक मिळवून सुपर सिक्स फेरीत प्रवेश केला.[१३१] सुपर सिक्सच्या तीन सामन्यांत त्याने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यू झीलंड विरुद्ध अनुक्रमे २. ६१ आणि २९ धावा केल्या.[१२४] भारताने पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला परंतु इतर दोन सामन्यांत पराभव झाल्याने गुणतक्त्यात भारताला शेवटचे स्थान मिळाले.[१२५][१३१] स्पर्धेमध्ये ८ सामन्यांत ६५.८५ची सरासरी आणि ८५.५२ च्या स्ट्राइक रेटने द्रविडने ४६१ धावा केल्या. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[१३२] जरी भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले,[१२५][१३१] द्रविडच्या विश्वचषकातील यशामुळे तो क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांमध्ये भारताचा क्र. ३चा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून उदयास आला.
विश्वचषकानंतर द्रविडच्या कामगिरीत पुन्हा एकदा घसरण झाली. ऑगस्ट १९९९ मध्ये पार पडलेल्या आयवा चषक स्पर्धेतील ४ सामन्यांत त्याला फक्त ४० धावा करता आल्या. शेवटी सिंगापूर चॅलेंज स्पर्धेत तो पुन्हा एकदा भरात आला. स्पर्धेत भारतातर्फे सर्वात जास्त धावा द्रविडने केल्या ज्यात अंतिम सामन्यातील एका शतकाचा समावेश होता. डीएमसी चषक स्पर्धेतही तो भारतातर्फे सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. सिंगापूर चॅलेंज स्पर्धेत वेस्ट इंडीजने भारताला मात दिली परंतु त्याचा बदला भारतीय संघाने त्यांना डीएमसी चषकात २-१ ने हरवून घेतला. आताशा, द्रविड भारताचा यष्टीरक्षक म्हणून तयार होत होता. त्याने शेवटच्या १० सामन्यांत ४ वेळा यष्टीरक्षण केले होते. केन्या मधील एलजी चषक स्पर्धेतही तो जास्त छाप पाडू शकला नाही. तेथे त्याने ४ सामन्यांत ८१ धावा केल्या.
विश्वचषकानंतर कसोटी क्रिकेट मध्ये मात्र द्रविडची सुरुवात एकदम सकारात्मक झाली. त्याने भारतात खेळवल्या गेलेल्या न्यू झीलंड विरुद्धच्या ३ सामन्याच्या मालिकेतील मोहालीतील पहिल्याच कसोटीमध्ये पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या ८३ धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शतक केले, त्यामुळे भारताला सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले. ह्या आधी द्रविडच्या नावे २९ कसोटी सामन्यांमध्ये ५ शतके होती, जी सर्व परदेशी खेळल्या गेलेल्या सामन्यांतील होती. हे त्याचे मायदेशी झळकावलेले पहिलेच शतक. ह्या खेळीव्यतिरिक्त संपूर्ण मालिकेत तो संघर्ष करताना दिसला.
परंतू त्यानंतरच्या भारताने ३-२ अशा जिंकलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. त्याने ५ सामन्यांत ६०ची सरासरी आणि ८३.८२ च्या स्ट्राईक रेटने २४० धावा केल्या.[१३३] हैदराबाद मधील दुसऱ्या सामन्यात त्याने १५३ धावांची, त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली, ज्यात १५ चौकार आणि २ षट्कारांचा समावेश होता. त्यावेळी त्याने सचिन तेंडूलकरसोबत एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील विश्वविक्रमी ३३१ धावांची भागीदारी केली. ह्या कामगिरीने द्रविडने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील एका यशस्वी वर्षाची सांगता केली. १९९९ मध्ये त्याने ४३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत ४६.३४ची सरासरी आणि ७५.१६ च्या स्ट्राईक रेट ने १७६१ धावा केल्या. तसेच त्याने दोनवेळा ३००+ धावांची भागीदारी केल्या.
डिसेंबर १९९९ मध्ये भारत ३ कसोटी सामन्यांची मालिका आणि त्रिकोणी एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. कसोटी मालिकेत द्रविडची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली, ६ डावांत तो १५.५० च्या सरासरीने फक्त ९३ धावा करू शकला.[१३४]. भारताला त्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश मिळाला. परंतु त्या नंतरच्या कार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-२००० ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये त्याने समाधानकारक कामगिरी करताना ३ अर्धशतके केली.
तळागाळातून वर संपादन
द्रविडची कसोटीतील खराब कामगिरी त्यानंतर मायदेशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत तशीच सुरू राहिली. भारताला मालिकेत पुन्हा एकदा ०-२ असा व्हाईटवॉश मिळाला. ह्या अपमानास्पद पराभवानंतर मार्च २००० मध्ये सचिन तेंडूलकरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी सौरव गांगुली उप-कर्णधार होता, त्याला कर्णधार पदावर बढती देण्यात आली आणि द्रविडला उप-कर्णधार करण्यात आले.
नव्याने नियुक्त झालेल्या उप-कर्णधाराला उभयसंघांतील एकदिवसीय मालिकेत समाधान कारक यश मिळाले. द्रविडने ५ सामन्यांत २ अर्धशतकांसह ४१.६० च्या सरासरीने २०८ धावा केल्या. त्याशिवाय त्याने मालिकेत गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले. कोचीमधी पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९ षटकांमध्ये ४३ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद केले, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी राहिली.[१३५] त्याची मालिकेतील गोलंदाजी सरासरी २२.६६ अशी सर्व गोलंदाजांमध्ये उत्कृष्ट होती. भारताने मालिका ३-२ अशी जिंकली
उभयसंघातील ह्या मालिकेनंतर लगेचच भारतीय संघ त्रिकोणी मालिकेसाठी शारजाला रवाना झाला. भारतीय संघाचे प्रदर्शन ह्या मालिकेत खूपच खराब झाले आणि संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळू शकला नाही. द्रविडने ४ सामन्यांत २२.२५ च्या सरासरीने ८९ धावा केल्या, असे असूनही तो मालिकेतील भारताचा दुसरा सर्वोत्तम फलंदाज होता, ह्यावरूनच भारतीय फलंदाजीच्या वाईट कामगिरीची कल्पना येते.[१३६] याच्या एका आठवड्यानंतर दक्षिण आफ्रिका मॅच फिक्सिंग स्कॅंडल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उघडकीस आले, आणि त्याने अझरुद्दीन आणि क्रोन्ये सहित भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या खेळाडूंना चांगलंच वेढलं.
इंग्लिश काउंटी क्रिकेट संपादन
काउंटी क्रिकेट खेळून इंग्लंडच्या वातावरणात आपल्या फलंदाजीत, जास्तीत जास्त सखोलता आणण्यासाठी द्रविड नेहमीच उत्सुक असे. भारतीय संघ न्यू झीलंडच्या १९९८-९९ च्या दौऱ्यावर असताना, त्याने तत्कालीन प्रशिक्षक आणि न्यू झीलंडचा माजी क्रिकेटपटू जॉन राईट यांच्याशी त्याबद्दल चर्चा केली. राईट त्यावेळी द्रविडच्या कामगिरीवर आणि विशेषतः हॅमिल्टन मध्ये केलेल्या दोन शतकांमुळे खूपच खूष होते. त्या चर्चेल त्यावेळी यश आले जेव्हा त्याने एप्रिल २००० मध्ये केंट काउंटी संघाविरुद्ध काउंटी पदार्पण केले. गांगुलीने सुद्धा त्याच सामन्यात विरोधी संघात पदार्पण केले
केंटची ऑफर हा द्रविडसाठी एक स्वागतार्ह बदल होता. मॅच फिक्सिंग वादंगामुळे भारतीय क्रिकेटला खूप जास्त नकारात्मकतेने वेढले होते. द्रविडसुद्धा धावांसाठी संघर्ष करत होता. मोहालीतील न्यू झीलंडविरुद्धच्या एका शतकाशिवाय १९९९-२००० च्या मोसमात द्रविडने एकही लक्षवेधी खेळी केली नव्हती. काउंटी क्रिकेटने त्याला "नव्या वातावरणात जाण्याची" आणि "आराम" करण्याची संधी दिली. इंग्लंड मधील विविध प्रकारच्या खेळपट्ट्या व हवामान आणि व्यावसायिक क्रिडापटूंविरुद्ध तिखट काउंटी क्रिकेटचा एक संपूर्ण मोसम ह्यामुळे त्याला अधिक क्रिकेट प्रशिक्षणाची संधी मिळाली.
द्रविडने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. केंटकडून खेळताना त्याच्या दुसऱ्या सामन्यात त्याने १८२ धावा केल्या आणि दौऱ्यावर असलेल्या झिम्बाब्वेवर केंटने एक डाव आणि १६३ धावांनी मात दिली. दौऱ्यावरच्या ७ प्रथम श्रेणी सामन्यांपैकी फक्त केंट संघच झिम्बाब्वेला हरवू शकला. सरे विरुद्धच्या अनिर्णित सामन्यात त्याने आणखी एक अर्धशतक केले. जून २०००, मध्ये द्रविडला त्याची राष्ट्रीय कर्तव्ये पार पाडण्यासाठी एका काउंटी सामन्याला मुकावे लागले.
भारतीय संघ चांगल्या मनस्थितीत नव्हता, आणि सहाजिकच आशिया चषक, २००० मध्ये संघाची कामगिरी निराशाजनक झाली. द्रविडचे १९९९-०० मोसमातील खराब प्रदर्शन आशिया चषक मालिकेमध्ये सुद्धा तसेच चालू राहिले. परंतु जेव्हा तो केंट संघात परतला तेव्हा त्याच्या कोणत्याही खुणा दिसल्या नाहीत. काउंटी क्रिकेट मधील त्याचा चांगला फॉर्म तसाच सुरू राहिला.
जुलै २०००, मधील पोर्ट्समाऊथ मधील हॅम्पशायरविरुद्धचा सामना हा वॉर्न आणि द्रविड दोन महान खेळाडूंमधली जणू एक शक्तिपरीक्षाच होता. आणि त्यामध्ये द्रविडने बाजी मारली. घरच्या संघातल्या स्पिनर्सला साजेशा खेळपट्टीवर वॉर्नने ४ बळी घेतले परंतु तो सर्वात महत्त्वाच्या द्रविडला बाद करू शकला नाही. १५/२ या धावसंख्येवर खेळायला येत त्याने २९५ चेंडूंत १३७ धावा केल्या, हे त्याचे काउंटी चॅम्पियनशीप मधील पहिलेच शतक होते. दुसऱ्या डावात त्याने नाबाद ७३ धावा केल्या आणि केंटला सहा गडी राखून विजय मिळवून दिला. वॉर्नला एकही बळी मिळाला नाही.
मोसमातील शेवटच्या काउंटी सामन्यात, केंटला ‘दुसऱ्या गटात’ जाण्यापासून वाचण्यासाठी एका अतिरिक्त (बोनस) गुणाची गरज होती. द्रविडने ७७ धावांची खेळी करून त्यांना तो एक अतिरिक्त गुण मिळवून दिला आणि संघाला ‘पहिल्या गटात’ कायम ठेवले.
२ शतके आणि ८ अर्धशतकां सहीत ५५.५० च्या सरासरीने, १६ प्रथमश्रेणी सामन्यांत १२२१ धावांसहित द्रविडने त्याच्या यशस्वी काउंटी मोसमाचा शेवट केला. केंटच्या फलंदाजीची धुरा त्याने एकहाती खांद्यावर घेतली होती. त्याच कालावधीतील केंटचा दुसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज, पॉल निक्सनने, १७ सामन्यांत ३३.३५ च्या सरासरीने ५६७ धावा केल्या. केंट काउंटी मोहिमेत त्याने फक्त फलंदाजीच नव्हे तर १४ झेल पकडून एक क्षेत्ररक्षक म्हणून आणि ३२.०० च्या सरासरीने ४ गडी बाद करून एक गोलंदाज म्हणूनही योगदान दिले.
सोनेरी वर्षे संपादन
नव्या आंतरराष्ट्रीय मोसमाला सुरुवात झाली आणि नव्याने नियुक्त झालेल्या कर्णधार आणि उपकर्णधार, गांगुली आणि द्रविडपुढे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे आव्हान होते ते मॅच-फिक्सींग घोटाळ्यांच्या खोल गर्तेत गेलेल्या संघाला नवी उभारी देण्याचे. आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी, २००० मध्ये भारतीय संघ जोमाने खेळला आणि केन्या, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेला एकामागोमाग एक पराभूत करीत, अंतिम सामन्यात पोहोचला. अंतिम सामन्यात न्यू झीलंडविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला, परंतु स्पर्धेतील संघाच्या आवेशपूर्ण कामगिरीमुळे प्रेक्षकांचा भारतीय क्रिकेटवरील विश्वास पुर्नस्थापित होण्यास मदत झाली. द्रविडने ४ सामन्यांत २ अर्धशतके आणि ५२.३३ च्या सरासरीने १५७ धावांचे योगदान दिले. त्यानंतर कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी, २००० मध्ये पहिल्या दोन सामन्यांत त्याने ८५ धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने त्यानंतरच्या सामन्यांत तो खेळू शकला नाही.
भारताने नव्या कसोटी मोसमाची सुरुवात बांगलादेशविरुद्ध ९-गड्यांनी विजय मिळवून केला. सामन्यातील दुसऱ्या डावात ६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द्रविडने ५ चौकार आणि १ षट्कारासहीत ४९ चेंडूत ४१ धावांची जलद खेळी केली. परंतू, द्रविडच्या कारकिर्दीतील एक खराब हिस्सा खऱ्या अर्थाने संपला तो पुढच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेत, जी जॉन राईट यांचीही भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून पहिलीच मालिका होती. न्यू झीलंडविरुद्ध मोहाली मध्ये शेवटचे शतक केल्यानंतर द्रविडने आतापर्यंत ८ कसोटी सामन्यांत २३.३३ च्या सरासरीने अवघ्या ३५० दावा केल्या ज्यात एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता. भारताच्या ह्या उप-कर्णधाराने धावांचा दुष्काळ संपवला आणि नव्या भारतीय प्रशिक्षकाचे स्वागत केले ते, त्याच्या पहिल्या द्विशतकाने. त्याने पहिल्या डावात नाबाद २०० आणि दुसऱ्या डावात नाबाद ७० धावा केल्या आणि भारताला झिम्बाब्वेविरुद्ध ९-गड्यांनी सहज विजय मिळाला. दुसऱ्या अनिर्णित राहिलेल्या कसोटीत त्याने १६२ धावा केल्या आणि ४३२.०० च्या सरासरीने मालिका संपवली. भारतीय फलंदाजातर्फे एका मालिकेतील ही सर्वाधिक सरासरी आहे.[१३७]
भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानच्या पाच सामन्यांच्या द्विदेशीय एकदिवसीय मालिकेमधील फक्त दुसऱ्या सामन्यात द्रविडने एकमेव अर्धशतक झळकावले, परंतु ही मालिका द्रविडच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. गांगुलीवरच्या एका सामन्याच्या बंदीमुळे मालिकेतील ५व्या सामन्यात पहिल्यांदाच द्रविडने भारताचे नेतृत्व केले. सामन्यात आगरकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर, भारताने त्याच्या कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात ३९ धावांनी विजय मिळवला.[१३८]
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा २०००/०१ संपादन
३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी २००१ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. ह्या दौऱ्याला "फायनल फ्रंटियर" असे म्हटले जाते, कारण स्टीव्ह वॉचा संघ लागोपाठ १५ कसोटी सामने जिंकल्यानंतर भारतात आला होता. पहिल्या कसोटीत भारताला १० गड्यांनी सहज हरवून ऑस्ट्रेलियाच्या संघाने लागोपाठ १६ कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला. पहिल्या डावात द्रविडने ९ धावा केल्या आणि भारताचा डाव १७६ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात द्रविडने, तेंडूलकरसोबत थोडाफार प्रतिकार केला. सामन्यात एका क्षणी द्रविडने मारलेला पुलचा फटका चुकला आणि स्लेटरने त्याचा झेल पकडला. परंतु तिसऱ्या पंचांच्या मते तो झेल स्वच्छ नव्हता आणि त्यांनी द्रविडला नाबाद दिले. त्यावेळी स्लेटरची द्रविड आणि मैदानावरच्या पंचांची बाचाबाची झाली. द्रविडचा १९६ चेंडूंचा प्रतिकार वॉर्नने त्याला ३९ धावांवर त्रिफळाचीत करून संपवला.
इडन गार्डनवर रचला इतिहास संपादन
इडन गार्डन्सवरच्या दुसऱ्या कसोटीमध्येही ऑस्ट्रेलियाचा विजयरथ न थांबवता येण्याजोगा वाटत होता, जेव्हा संघ लागोपाठ १७व्या कसोटी विजयाच्या मार्गावर होता. नाणेफेक जिंकून फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात ४४५ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या भारतीय संघाचा अवघ्या १७१ धावांत खुर्दा उडाला आणि ऑस्ट्रेलियाला २७४ धावांची आघाडी मिळाली. द्रविडने ८२ चेंडूंत २५ धावा केल्या आणि सलग दुसऱ्यांदा वॉर्नच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. डावामध्ये द्रविडपेक्षा जास्त धावा फक्त लक्ष्मणने केल्या. अपेक्षेनुसार स्टीव्ह वॉने भारताला फॉलो-ऑन दिला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या लक्ष्मणला चांगल्या भरात नसलेल्या द्रविडऐवजी तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली, आणि द्रविडला ६व्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्यात आले. फलंदाजांनी दुसऱ्या डावात पहिल्यापेक्षा चांगले प्रदर्शन करूनही, अजूनही भारतीय संघाला पराभव समोर दिसत होता. द्रविड ६व्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा धावफलकावर ४ बाद २३२ धावा लागल्या होत्या आणि डावाचा पराभव टाळण्यासाठी भारताला अजूनही ४२ धावांची गरज होती. ३ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लक्ष्मणच्या साथीने द्रविडने आणखी पडझड होऊ न देता दिवसअखेर पर्यंत किल्ला लढवला. दिवसाच्या शेवटी भारताच्या ४ बाद २५४ धावा झाल्या ज्यात लक्ष्मण १०९ आणि द्रविड ७ धावांवर नाबाद होता.
चौथ्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा भारत अजूनही २० धावांनी मागे होता आणि संपूर्ण दोन दिवसांचा खेळ बाकी असताना भारताचे केवळ ६ गडी बाकी होते, ऑस्ट्रेलियासाठी आणखी एक सहजसाध्य विजय दृष्टीपथात होता. परंतु चौथ्या दिवशी जे घडले त्यामुळे लक्ष्मण आणि द्रविडचे नाव क्रिकेटच्या इतिहासात कायमचे कोरले गेले. लक्ष्मण आणि द्रविडने बाद न होता संपूर्ण दिवस फलंदाजी केली. स्टीव्ह वॉने तब्बल ९ गोलंदाज वापरले, परंतु लक्ष्मण आणि द्रविडने मॅकग्रा-वॉर्न आणि कंपनीला भीक न घालता स्वतःच्या इच्छेनुसार धावा केल्या, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला त्यांनी पूर्णपणे निष्प्रभ केले. दिवसाच्या सुरुवातीचा धावफलक होता २५४/४ आणि दिवसाच्या शेवटी ५८९/४. चौथ्या दिवशी जोडीने अनेक विक्रम मोडीत काढत ३३५ धावांची भर घातली. मालिकेच्या सुरुवातीला आलेल्या अपयशामुळे टीकाकारांच्या टीकेचा धनी झालेल्या द्रविडने त्याच्या लौकिकाविरुद्ध प्रेस बॉक्सच्या दिशेला हावभाव करीत शतक साजरे केले. दिवसाच्या अखेरीस तो १५५ धावांवर आणि लक्ष्मण २७६ धावांवर नाबाद राहिले.
पाचव्या दिवशी स्वतःच्या धावसंख्येत अवघ्या ५ धावांची भर घालून, त्रिशतकाच्या जवळ असताना २८१ धावांवर लक्ष्मण तंबूत परतला, आणि ३७५ धावांची ऐतिहासिक भागीदारी संपुष्टात आली. परंतु १८० धावांवर धावचीत होईपर्यंत द्रविड तसाच पुढे खेळत राहिला. कर्णधार गांगुलीने तळाच्या फलंदाजांना थोडी फटकेबाजी करण्याची संधी देऊन ६५७/७ ह्या धावसंख्येवर डाव घोषित केला, आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ७५ षटकांमध्ये ३८४ धावांचे आव्हान दिले. लक्ष्मण-द्रविडच्या भागीदारीने भारतासाठी सामनाच खेचून आणला नाही तर संघामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला. प्रेरणा मिळालेल्या भारतीय संघाने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि ऑस्ट्रेलियाला ६८.३ षटकांमध्ये २१२ धावांवर सर्वबाद केले. भारताने सामना १७१ धावांनी जिंकून फॉलो-ऑन नंतर सामना जिंकलेला केवळ दुसरा संघ बनला.
चेन्नईमधील तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात द्रविडने ८१ धावा केल्या आणि ४ झेल पकडले, आणि एका अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला २ गड्यांनी मात देत मालिका २-१ अशी खिशात घातली. मालिकेमध्ये ५६.३३ च्या सरासरीने ३३८ धावा अशी अप्रतिम कामगिरी करूनही द्रविडला हवेहवेसे वाटणारे फलंदाजीतील क्र. ३ चे स्थान गमवावे लागले.
५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील त्याच्या घरच्या मैदानावरील १ल्या सामन्यात द्रविडने ८० धावा केल्या आणि भारताने सामना ६० धावांनी जिंकला. उर्वरित ४ सामन्यांत त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही आणि ऑस्ट्रेलियाने मालिका ३-२ अशी जिंकली.
एप्रिल २००१ ते मार्च २००२ संपादन
एप्रिल २००१ ते मार्च २००२ दरम्यान भारतीय संघ १२ कसोटी सामने खेळला. ज्यामध्ये प्रत्येकी २ झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये(३री कसोटी अनधिकृत घोषित केली गेली), श्रीलंकेमध्ये ३ आणि मायदेशी इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची तर झिम्बाब्वेविरुद्ध २ सामन्याची मालिका ह्यांचा समावेश होता. द्रविडची कामगिरी त्याच्या लौकिकास साजेशी नव्हती, त्याने १२ कसोटी सामन्यांमध्ये ३९.३५ च्या सरासरीने ६६९ धावा केल्या.
झिम्बाब्वेमध्ये त्याने पहिल्या दौरा सामन्यात १३४ चेंडूंत १३७ धावा केल्याने तो चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता. परंतु कसोटी मालिकेत त्याने एकमेव अर्धशतक केले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. मालिकेत त्याने ६९.०० च्या सरासरीने १३८ धावा केल्या.
त्यानंतर १४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेत झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त तेंडूलकर आणि लक्ष्मणच्या अनुपस्थितीत द्रविडला वरच्या क्रमांकावर बढती मिळाली. पहिल्या कसोटीत तो ४थ्या स्थानावर आणि उर्वरित दोन कसोट्यांमध्ये तो त्याच्या आवडत्या ३ऱ्या स्थानावर फलंदाजीस उतरला. दुसऱ्या कसोटीच्या ४थ्या डावात ३ऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन त्याने ७५ धावांची एक महत्त्वाची खेळी केली आणि भारताने २६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. मालिकेमध्ये तो भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ४७.०० च्या सरासरीने २ अर्धशतकांसहीत २३५ धावा केल्या. भारताने मालिका १-२ अशी गमावली.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर पहिल्या कसोटीत सलामीस उतरलेला द्रविड संपूर्ण अपयशी ठरला आणि भारताने सामना गमावला. दुसऱ्या कसोटीत, भारतासमोर विजयासाठी एक संपूर्ण दिवस आणि ४१ षटकांमध्ये ३९५ धावांचे आव्हान होते. आधीच्या तीन डावांमध्ये १०० षटके सुद्धा खेळता न आलेल्या भारतीय संघाची सुरुवातही अडखळत झाली. धावफलकावर शून्य धावा असतानाच भारताचा पहिला गडी बाद झाला. परंतु द्रविडने, दीप दासगुप्तासोबत १७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भागीदारी ८३.२ षटके सुरू राहिल्यामुळे सामना भारताच्या दृष्टीने सुरक्षित झाला होता. खराब हवामानाचाही भारताला काहीसा फायदा झाला, डावामध्ये फक्त ९६.२ षटके टाकली गेली आणि सामना अनिर्णितावस्थेत संपला. दुसऱ्या कसोटी दरम्यान गाजलेल्या माईक डेनिस प्रकरणामुळे तिसरा कसोटी सामना अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आला, ज्यामध्ये द्रविडने दुखापतग्रस्त गांगुलीच्या ऐवजी कर्णधारपदाची धुरा सांभाळली. भारताने तो सामना डावाने गमावला.[१३९] पोर्ट एलिझाबेथमधील सामना वाचवणारी ८७ धावांची खेळी वगळता द्रविडच्या पदरी मालिकेत दारूण अपयशच आले. त्याने २ कसोटी सामन्यांत २५.५० च्या सरासरीने अवघ्या १०२ धावा केल्या.[१४०]
नंतरच्या मायदेशी खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत त्याने ३ सामन्यांतील ४ डावांत ४०.६६ च्या सरासरीने एका अर्धशतकासहित १२२ धावा केल्या[१४१] आणि झिम्बाब्वे विरुद्ध कसोटी मालिकेमध्ये त्याने ३ डावांमध्ये २४.०० च्या सरासरीने अवघ्या ७२ धावा केल्या ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता.[१४२]
२००१-०२ च्या कसोटी मोसमातील अपयशाची भरपाई द्रविडने एकदिवसीय सामन्यांतील चांगल्या प्रदर्शनाने केली. झिम्बाब्वेतील त्रिकोणी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ६४ चेंडूंत नाबाद ७२ धावा केल्या आणि भारताला ४ गडी व ४ चेंडू राखून विजय मिळवून दिला. त्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. मालिकेतील ५ सामन्यांत त्याने १०१.६८चा स्ट्राईक रेट आणि ४०.३३ च्या सरासरीने १२१ धावा केल्या. १०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने १०० पेक्षा जास्त धावा करणारा तो मालिकेतील एकमेव खेळाडू होता.[१४३]
श्रीलंकेतील त्रिकोणी मालिकेमध्ये, भारताने पहिले लागोपाठ तीन सामने गमावले आणि स्पर्धेतून बाद होण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. दुखापतग्रस्त तेंडूलकर आणि झहीर व बंदी असलेल्या गांगुलीच्या अनुपस्थितीत द्रविडने ४थ्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले आणि भारताला मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला. शेवटच्या तीनही साखळी सामन्यांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला लागोपाठ तीन विजय मिळवून देण्यास आणि परिणामतः अंतिम सामन्यासाठी पात्र होण्यास हातभार लावला. भारताने श्रीलंकेविरुद्धचा अंतिम सामना १२१ धावांनी गमावला. मालिकेमध्ये भारतातर्फे सर्वाधिक धावा द्रविडच्या होत्या. त्याने ७ सामन्यांमध्ये ५१.८० च्या सरासरीने २५९ धावा केल्या.[१४४]
त्यानंतरच्या दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या स्टॅंडर्ड बँक त्रिकोणी मालिकेत द्रविडने पुन्हा एकदा चांगले प्रदर्शन केले. त्याने ५ डावांमध्ये ७१.८१चा स्ट्राईक रेट आणि ५३.५० च्या सरासरीने २१४ धावा केल्या ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश होता.[१४५] अंतिम सामन्यासहित शेवटच्या तीन सामन्यांत त्याने यष्टिरक्षण करताना ३ खेळाडूंना यष्टिचीत केले केले.
दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपता संपता द्रविडचा उजवा खांदा दुखण्यास सुरुवात झाली. मायदेशी खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर त्याने इंग्लंडविरुद्ध ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुखऱ्या खांद्यावर उपचार घेण्यास सुरुवात केली. झिम्बाब्वेविरुद्ध मायदेशी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याने पुनरागमन केले आणि दुसऱ्या सामन्यातील ५९ चेंडूंतील ६६ धावांच्या खेळीसह ५ सामन्यांत ३८.३५ च्या सरासरीने १५३ धावा केल्या.[१४६]
एप्रिल २००२ मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला. जॉर्जटाऊन येथील पहिल्या कसोटी सामन्यात द्रविडने त्याचे दहावे आणि परदेशातले ६वे शतक केले. मर्व्हिन डिलनचा एक उसळता चेंडू जबड्याला लागून सूज आलेली असताना, द्रविडने नाबाद १४४ धावा केल्या, ज्यामुळे भारताला फॉलो-ऑन टाळता आला.[१४७] सामना अनिर्णितावस्थेत संपला. पोर्ट ऑफ स्पेन मधील सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा ३७ धावांनी पराभव केला. द्रविडने एक अर्धशतक आणि ४ झेल असे स्वतःचे योगदान दिले. सेंट जॉन्स येथील चौथ्या अनिर्णित राहिलेल्या कसोटीत द्रविडने ९१ धावा केल्या. त्याने ११८ धावांवर फलंदाजी करत असताना रिडली जेकब्सला बाद केले, तो त्याचा कसोटी क्रिकेटमधील एकमेव बळी. ५ सामन्यांची मालिका भारताने १-२ अशी गमावली. मालिकेत भारतातर्फे ५७.७१ च्या सरासरीने ४०४ धावा करून द्रविड भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता.[१४८] द्विदेशीय एकदिवसीय मालिकेमध्ये मात्र द्रविड सपशेल अपयशी ठरला. परंतु त्याने मालिकेमध्ये यष्टिरक्षण करताना २ गडी बाद केले (१ झेल आणि १ यष्टिचीत).
भारताचा इंग्लंड दौरा २००२ संपादन
यानंतर भारतीय संघ ६ वर्षांनंतर पहिल्यांदाच, २२ जून ते ९ सप्टेंबर दरम्यान इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यावर गेला. ह्या दौऱ्यामध्ये द्रविड त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर होता. दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय त्रिकोणी मालिकेने झाली, ज्यामध्ये भारत आणि इंग्लंडशिवाय श्रीलंकेच्या संघाचा समावेश होता. द्रविडने ह्या मालिकेतही त्याचे क्षेत्ररक्षणाचे काम चालूच ठेवले. लॉर्डस् वरील मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, ३ फलंदाज बाद करण्यात त्याचा सहभाग होता (२ झेल आणि १ यष्टिचीत) आणि त्यानंतर त्याने नाबाद ७३ धावांची खेळी केली आणि युवराज सिंग सोबत भारताला इंग्लंडविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवून दिला.[१४९] श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील ६व्या एकदिवसीय सामन्यात त्याने १ झेल घेतला आणि ५० धावा केल्या. भारताने सामना ४ गडी राखून जिंकला आणि द्रविडला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१५०] अंतिम सामन्यात भारताने ३२५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडवर २ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला.[१५१] मालिकेत द्रविडने ४९.०० च्या सरासरीने ३ अर्धशतकांसह २४५ धावा केल्या. मालिकेत भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज होता.[१५२] तसेच तो, मालिकेमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा यष्टिरक्षक होता (९ बळी, ६ झेल व ३ यष्टीचीत).[१५३]
४ सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी द्रविडने हॅम्पशायरविरुद्ध सराव सामन्यात अर्धशतक केले.[१५४] लॉर्डस् वरील पहिल्या सामन्यात त्याने ४६ आणि ६३ धावा केल्या. भारताने सामना १७० धावांनी गमावला.[१५५] दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात तो अपयशी ठरला परंतु भारताने ३५७ धावा केल्या. मायकेल वॉनच्या १९७ धावांमुळे इंग्लंडने ६१७ एवढी प्रचंड धावसंख्या उभारली आणि पहिल्या डावात २६० धावांची आघाडी घेतली. त्यात दुसऱ्या डावात ११ धावांच्या मोबदल्यात दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्याने भारताच्या संघावर चिंतेचे सावट पसरले. परंतु त्यानंतर द्रविडचे शतक तसेच तेंडूलकर आणि गांगुलीच्या अर्धशतके आणि तळाच्या फलंदाजांनी केलेल्या चिवट फलंदाजीमुळे भारताला सामना अनिर्णित राखण्यात यश आले.[१५६]
तिसरी कसोटी हेडींग्लेच्या मैदानावर झाली, जे तेजगती गोलंदाजांसाठी अनुकूल मानले जाते. गांगुलीने नाणेफेक जिंकून अच्छादलेल्या सकाळी प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. इंग्लंडचा कर्णदार नासिर हुसेनने चार तेजगती गोलंदाजांचा ताफा निवडला होता, ज्यात हॉगार्ड, फ्लिन्टॉफ, ट्यूडर आणि कॅडीक यांचा समावेश होता. त्यात अजून वाईट गोष्ट घडली ती, भारताने सातव्याच षटकात १५ धावसंख्येवर सेहवागला गमावले. परंतु त्यानंतर द्रविडने बांगरसोबत डावाला आकार दिला. दोघांनी मिळून उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. त्यांनी अनेकदा चेंडू अंगावर घेतले, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांना कोणतीही संधी मिळू दिली नाही. दोघांनी मिळून १७० धावांची भागीदारी केली. एका स्तुत्य अर्धशतकानंतर बांगर बाद होईपर्यंत सूर्य ढगातून वर आला होता आणि फलंदाजी करणे सोपे झाले होते. त्यानंतर द्रविडच्या सोबतीला तेंडूलकर आला. द्रविडने त्याचे १२ वे कसोटी शतक पूर्ण केले आणि दोघांनी मिळून १५० धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाचे सकाळचे अवघड सत्र खेळून काढल्यानंतर, वारंवार चेंडू लागून, शेकून निघालेला द्रविड शेवटी जाइल्सच्या गोलंदाजीवर १४८ धावा करून यष्टिचीत झाला. जसजसे फलंदाजी करणे सोपे होऊ लागले तसे तेंडूलकर आणि गांगुलीने स्वतःची शतके करीत, इंग्लंडच्या गोलंदाजीची दुर्दशा केली. भारताने डाव ८ बाद ६२८ धावसंख्येवर घोषित केला आणि इंग्लंडला दोनदा सर्वबाद (२७३ व ३०९) करून एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला. हा भारताचा १९७७/७८ नंतर परदेशी मिळवलेला पहिलाच डावाचा विजय होता. द्रविडच्या सात तासाच्या लढाऊ खेळीचा परिणाम इतका जास्त होता की सचिनने द्रविडपेक्षा ४५ धावा जास्त करूनही (१९३), द्रविडला त्याच्या १४८ धावांसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
द्रविडने त्याच्या दोन लागोपाठच्या शतकांनंतर ओव्हलवरच्या सामन्यात आणखी एक शतक केले, परंतु यावेळी ते द्विशतक होते. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने ५१५ धावा केल्यानंतर, द्रविडने २१७ धावा करून भारताची धावसंख्या ५०५ धावांवर नेली. कसोटी आणि मालिका अनिर्णितावस्थेत संपली. द्रविडला लागोपाठ दुसऱ्यांदा सामनावीर घोषित करण्यात आले.[१५७] द्रविडने मालिकेत ३ शतके आणि एका अर्धशतका सहित १००.३३ च्या सरासरीने ६०२ धावा केल्या,[१५८] त्याला वॉन सोबत मालिकावीराचा पुरस्कार विभागून दिला गेला.[१५७]
दौऱ्यावरील १५ सामन्यांत द्रविडने ७०.५३ च्या सरासरीने १०५८ धावा केल्या, ज्यात १ द्विशतक, २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश होता.[१५९]
मुंबईतील वानखेडे मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत शतक केल्यानंतर, लागोपाठ चार कसोटी सामन्यांमध्ये नाबाद १०० धावा करणारा द्रविड पहिलाच भारतीय फलंदाज बनला. तीव्र पेटके (cramps) आणि सतत होणाऱ्या वांतीमुळे (dehydration) द्रविडला १०० धावा केल्यानंतर उपचारांसाठी त्याचा डाव अर्धवट सोडावा लागला. भारताने कसोटी एक डाव आणि ११२ धावांनी जिंकली. उर्वरित दोन कसोट्यांमध्ये द्रविड फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. मालिकेमध्ये त्याने ४९.३३ च्या सरासरीने १४८ धावा केल्या.[१६०] भारताने मालिका २-० अशी जिंकली.
त्यानंतर झालेल्या द्विदेशीय ७ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये द्रविडने चांगली कामगिरी केली. मालिकेमध्ये द्रविडने ८९.८२चा स्ट्राईक रेट आणि ७५ च्या सरासरीने ३०० धावा केल्या ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. मालिकेमध्ये त्याची सरासरी सर्वात जास्त होती.[१६१] मालिकेमध्ये यष्टीरक्षक म्हणून ७ गडी बाद करण्यात त्याचा सहभात होता. (६ झेल व १ यष्टिचीत). चौथ्या एकदिवसीय सामन्यात, वेस्ट इंडीजने भारतासमोर अशक्यप्राय वाटणारे ३२५ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले होते. परंतु द्रविडची शतकी खेळी आणि त्याने बांगर सोबत ६व्या गड्यासाठी केलेल्या १०.१ षटकांतील नाबाद ९४ धावांच्या भागीदारीमुळे[१६२] भारताने सामना जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. त्यानंतर त्याने ६व्या सामन्यात पुन्हा अर्धशतक करून भारताला २-३ अशा पिछाडीवरून ३-३ अशी बरोबरी साधून दिली. परंतु शेवटच्या सामन्यासह भारताने मालिका ३-४ अशी गमावली.
क्रिकेट विश्वचषक, २००३ साठी भारतीय संघाची तयारी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. विश्वचषकाआधीचा संघाचा न्यू झीलंड दौरा एखादे अरिष्टच म्हणावे लागेल. कसोटी मालिकेमध्ये भारताला व्हाईटवॉश मिळाला आणि एकदिवसीय मालिका २-५ अशी गमवावी लागली. भारतातर्फे, द्रविडने कसोटी मालिकेमध्ये सर्वाधिक धावा केल्या[१६३] आणि एकदिवसीय मालिकेमध्ये भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज होता,[१६४] तरीही त्याची कामगिरी म्हणावी तितकी समाधानकारक नव्हती.
विश्वचषक २००३ आणि २००७ संपादन
क्रिकेट विश्वचषक, २००३ साठी द्रविडची उप-कर्णधार म्हणून निवड झाली, भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून विश्वचषक जिंकला. संघात आणखी एका फलंदाजाला स्थान मिळावे म्हणून द्रविडने यष्टिरक्षक फलंदाजाची यशस्वी भूमिका पार पाडली. त्याने विश्वचषकातील १० डावांत ५ वेळा नाबाद राहून ६३.६० च्या सरासरीने ३१८ धावा केल्या ज्यात २ अर्धशतकांचा समावेश होता. भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज होता.[१६५]
त्यानंतरच्या क्रिकेट विश्वचषक, २००७ मध्ये द्रविड भारतीय संघाचा संघाचा कर्णधार होता. ह्यावेळी बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव पदरी पडल्यामुळे गट फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले.
२००३-०४चा मोसम संपादन
२००३-०४ च्या कसोटी मोसमात, द्रविडने तीन द्विशतके झळकावली ती न्यू झीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध. न्यू झीलंडविरुद्ध मायदेशी झालेल्या कसोटी मालिकेतील अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात द्रविडने २२२ धावा करून संघातर्फे ५०० धावा उभारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.[१६६] त्यात त्याने लक्ष्मणसोबत ४थ्या गड्यासाठी १३० धावांची आणि गांगुलीसोबत ५व्या गड्यासाठी १८२ धावांची भागीदारी केली.[१६७] सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या सामन्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला, तरीही मालिकेत ७८.२५ च्या सरासरीने ३१३ धावा केल्याने, तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[१६८]. मालिकेतील दोन्ही सामने अनिर्णित राहिले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील, ॲडलेड येथील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या ५५६ धावांच्या उत्तरादाखल भारताची अवस्था ४ बाद ८५ अशी झाली होती, तेव्हा द्रविड आणि लक्ष्मणने ५व्या गड्यासाठी ३०३ धावांची भागीदारी केली. लक्ष्मण १४८ धावांवर बाद झाला आणि द्रविडने २३३ धावा केल्या, ज्या त्यावेळी भारतीय फलंदाजातर्फे परदेशातील सर्वोच्च धावा होत्या. त्याने दुसऱ्या डावात नाबाद ७२ धावा केल्या आणि भारत विजयी झाला.[१६९] द्रविडने ४ सामन्यांच्या मालिकेत १२३.८० च्या सरासरीने भारतातर्फे सर्वाधिक ६१९ धावा केल्या, ज्यामध्ये १ द्विशतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता,[१७०] त्याला मालिकावीर घोषित करण्यात आले.[१७१]
मोसमात त्यानंतर गांगुलीच्या अनुपस्थितीत, पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठी द्रविडने भारतीय संघाचे नेतृत्व केले. पहिल्या मुलतान क्रिकेट मैदानावर झालेल्या कसोटीत भारताने इतिहासात प्रथमच पाकिस्तानी संघाला त्यांच्याच मैदानावर धूळ चारली.[१७२]. रावळपिंडी येथील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात द्रविडने २७० धावा केल्या, आणि भारताला मालिका विजयात मदत केली.[१७३] ही त्याची कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी ठरली. या कसोटीमध्ये त्याने पार्थिव पटेल, लक्ष्मण आणि गांगुलीसोबत शतकी भागीदारी केल्या. भारताने मालिका २-० अशी जिंकली.
२००३-०४ च्या एकदिवसीय मोसमातील भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघांमध्ये मायदेशी झालेल्या टीव्हीएस चषक त्रिकोणी मालिकेत भारतातर्फे द्रविड सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. त्याने ९३.८०चा स्ट्राईक रेट आणि ४५.४० च्या सरासरीने २२७ धावा केल्या, ज्यात २ अर्धशतकांचा समावेश होता.[१७४] भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने मात दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियामधील त्रिकोणी मालिकेत द्रविडने ३ अर्धशतके आणि ३०.७७ च्या सरासरीने २७७ धावा केल्या.[१७५] पाकिस्तानातील एकदिवसीय मालिकेत द्रविड भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने दोन अर्धशतकांसह, ६२.०० च्या सरासरीने २४८ धावा केल्या.[१७६] कराची येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले.
२००४-०५ मोसम संपादन
सप्टेंबर ते नोव्हेंबर २००४ दरम्यान ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱ्यावर ४-कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात गांगुलीच्या अनुपस्थितीत द्रविडने संघाचे नेतृत्व केले, परंतु ही मालिका त्याच्यासाठी फलदायी ठरली नाही. त्याने २७.८३ च्या सरासरीने १६७ धावा केल्या.[१७७]
त्यानंतर मार्च २००५ मध्ये पाकिस्तानी संघ भारताच्या दौऱ्यावर ३-कसोटी आणि ६-एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी आला होता. पहिली कसोटी अनिर्णित राहिल्या नंतर, कोलकाता मध्ये खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी मध्ये पहिल्या डावात भारताने द्रविडच्या ११० धावांच्या मदतीने ४०७ धावा केल्या. १४ धावांची निसटती आघाडी मिळाल्यानंतर, दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या ४ बाद १५४ असताना द्रविडने शतक झळकावत, दिनेश कार्तिक सोबत ५व्या गड्यासाठी १६५ धावांची भागीदारी केली आणि भारताने पुन्हा ४०७ धावा केल्या. भारताने सामना १९५ धावांनी जिंकला आणि सहाजिकच द्रविडला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१७८] मालिकेमध्ये द्रविडने ६६.६० च्या सरासरीने ३३३ धावा केल्या ज्यामध्ये २ शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश होता.[१७९] त्यानंतरची एकदिवसीय मालिका द्रविडसाठी खूपच फलदायी ठरली. कोची येथील पहिल्या सामन्यात भारताची दुसऱ्याच षटकात भारताची अवस्था २ बाद ४ अशी झालेली असताना सेहवाग आणि द्रविडने ३३.२ षटकांमध्ये २०१ धावांची भागीदारी केली. ही भारताची पाकिस्तान विरुद्ध मायदेशातली सर्वोच्च भागीदारी होती.[१८०]. भारताने सामना ८७ धावांनी जिंकला.[१८१] ५व्या सामन्यात गांगुलीच्या अनुपस्थितीत द्रविडने संघाचे नेतृत्व करताना भारताची अवस्था १७ व्या षटकात ४ बाद ५९ अशी झालेली असताना मोहम्मद कैफ सोबत १३५ धावांची भागीदारी केली ज्यात द्रविडचे योगदान ८६ धावांचे होते. परंतु भारताने सामना गमावला. एकदिवसीय मालिकेमध्ये द्रविड सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ५१.३३ च्या सरासरीने एक शतक आणि २ अर्धशतके फटकावत ३०८ धावा केल्या.[१८२]
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी खेळवल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेमध्ये द्रविडने ९०.५० च्या सरासरीने १८१ धावा केल्या.[१८३]
साल २००४ च्या शेवटी भारताने बांगलादेश दौरा केला. चट्टग्राम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात द्रविडने शतक झळकावले (१६० धावा) आणि गंभीरसोबत दुसऱ्या गड्यासाठी २५९ धावांची भागीदारी केली. ह्या शतकामुळे कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच्या सर्व १० देशांमध्ये शतक झळकाविणारा तो पहिला फलंदाज ठरला.[९][१८४] एकदिवसीय मालिकेमधील दोन्ही सामन्यांत द्रविडने अर्धशतके झळकावली.
साल २००५ संपादन
ऑगस्ट-सप्टेंबर २००५ दरम्यान भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला. दौऱ्यावरील भारत, झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड दरम्यान झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये द्रविड सपशेल अपयशी ठरला. परंतु नंतरच्या कसोटी मालिकेमध्ये पुनरागमन करताना त्याने ८७.५० च्या सरासरीने सर्वाधिक १७५ धावा केल्या.[१८५]
त्यानंतर ऑक्टोबर-डिसेंबर २००५ दरम्यान श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर ७-एकदिवसीय आणि ३-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आला होता. ह्या दौऱ्यावर भारतीय संघाचा नवा कर्णधार होता राहुल द्रविड. नागपूर मधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात आपल्या नैसर्गिक खेळाशी विसंगत अशी वेगवान खेळी करताना त्याने अवघ्या ६३ चेंडूंत १ षट्कार आणि ८ चौकारांसहीत ८५ धावा केल्या. त्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. एकदिवसीय मालिकेमध्ये ४ वेळा नाबाद राहून, सर्वाधिक १५६.०० च्या सरासरीने एका शतकासह ३१२ धावा करणाऱ्या[१८६] द्रविडची कामगिरी कसोटी मालिकेत मात्र सुमारच झाली. एकदिवसीय मालिकेमधील त्याच्या कामगिरीमुळे आयसीसी खेळाडूंच्या क्रमवारीत तो १८ स्थानांनी वर आला.
नोव्हेंबर २००५ मध्ये श्रीलंकेच्या मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर ५-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला. कर्णधार द्रविडने मालिकेमध्ये ३४.०० च्या सरासरीने अवघ्या १०२ धावा केल्या.
साल २००६ संपादन
७ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २००६ दरम्यान भारतीय संघ द्रविडच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला. ३-कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील लाहोर येथील पहिल्या सामन्यात द्रविड-सेहवाग जोडीने पहिल्या गड्यासाठी ४१० धावांची भागीदारी केली. ज्यात द्रविडने १२८ धावा केल्या.[१८७] विनू मंकड आणि पंकज रॉय यांच्या ४१३ धावांच्या ५०-वर्षे जुन्या भागीदारीचा विश्वविक्रम मागे टाकण्यात ते ३ धावांनी कमी पडले.[१८८] दुसऱ्या कसोटीमध्ये सुद्धा द्रविडने शतक झळकावले आणि पाकिस्तानच्या ५८८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताला पहिल्या डावात ६०३ धावा उभारण्यास मदत केली.[१८९]. मालिकेमध्ये त्याने ८०.३३ च्या सरासरीने २ शतकांच्या जोरावर २४१ धावा केल्या.[१९०] ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये ३ अर्धशतके करून द्रविडने ४१.०० च्या सरासरीने २०५ धावा केल्या.[१९१] कसोटी मालिका ०-१ ने गमावणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तानचा एकदिवसीय मालिकेत ४-१ असा धुव्वा उडवला.
२०११ इंग्लंड दौरा संपादन
वेस्ट इंडीज दौऱ्यावर सबिना पार्क, जमैका येथे द्रविडला सुर गवसला आणि त्याने सामना जिंकून देणारी शतकी खेळी केली. त्यानंतर द्रविड इंग्लंड दौऱ्यावर रूजू झाला. ह्या मालिकेमध्ये कसोटी क्रिकेटमधल्या विश्वातील क्र. १ च्या संघाचा निर्णय होणार होता. भविष्यात क्रिकेट तज्ञांकडून त्याच्या सर्वोत्तम मालिका कामगिरींपैकी एक म्हणून गौरवली जाणार होती.
लॉर्डस् वरील पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या ४७४ धावांना उत्तर देताना द्रविडने नाबाद १०३ धावा केल्या. त्याने कसोटी पदार्पण केलेल्या ह्या मैदानावर त्याचे पहिलेच शतक. परंतु त्याला त्याच्या सहकाऱ्यांकडून अत्यल्प मदत मिळाली. भारतीय संघ २८६ धावा करून बाद झाला आणि भारताला कसोटी गमवावी लागली.[१९२] ट्रेंटब्रीज, नॉटिंगहॅम येथील २ऱ्या कसोटीमध्ये द्रविड खूपच चांगल्या लयीत दिसला. दुखापतग्रस्त गौतम गंभीरच्या जागी द्रविड सलामीला फलंदाजीस उतरला, आणि त्याने लागोपाठ दुसरे शतक झळकावले. परंतु त्याच्या ११७ धावा पुन्हा एकदा पराभवाच्या कारणी आल्या. पहिल्या डावात भारताचे शेवटचे ६ गडी अवघ्या २१ धावांत बाद झाले आणि भारताचा ३१९ धावांनी दारूण पराभव झाला.[१९३] बर्मिंगहॅममधील तिसऱ्या कसोटीत, द्रविड दोन्ही डावांत अयशस्वी ठरला आणि भारताचा एक डाव आणि २४२ धावांनी पराभव झाला.[१९४] चौथ्या कसोटीत त्याने जोरदार पुनरागमन करत सलामीला येऊन संघाच्या एकूण ३०० धावांपैकी नाबाद राहत १४६ धावा केल्या. परंतु पुन्हा एकदा त्याची खेळी वाया गेली आणि भारताने सामन्यासह मालिकेत ०-४ असा पराभव झाला.[१९५]
चार सामन्यांत त्याने ७६.८३ च्या सरासरीने तीन शतकांसह ४६१ धावा केल्या. भारताच्या एकूण धावांपैकी त्याने एकट्याने २६% धावा केल्या. त्याच्या या कामगिरीला खूपच वाहवा मिळाली आणि काही जणांनी तर त्याची एक सर्वोत्तम खेळी म्हणूनही गौरवले.[१९६][१९७]
निवृत्ती संपादन
२००९ मधील एकदिवसीय संघातून द्रविडला वगळण्यात आले, परंतु इंग्लंडविरुद्ध २०११ च्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची पून्हा निवड करण्यात आली, हा खुद्द द्रविडसाठीही एक आश्चर्याचा धक्का होता, त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतली नव्हती तरीही त्याने पुन्हा बोलावले जाण्याची अपेक्षा सुद्धा केली नव्हती.[१९८][१९९][२००] निवड झाल्यानंतर, त्याने मालिकेनंतर एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली.[१९८] इंग्लंडविरुद्ध सोफिया गार्डन्स, कार्डीफ येथे १६ सप्टेंबर २०११, रोजी तो त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला, त्यात त्याने ७९ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या आणि ग्रॅमी स्वानने त्याला त्रिफळाचीत केले.[२०१] त्याचा शेवटचा मर्यादित षटकांचा सामना हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता; त्याने त्याच्या निवृत्तीची घोषणा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळण्याआधी केली.[२०२]
२०११-१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याने ९ मार्च २०१२ रोजी कसोटी आणि स्थानिक क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली, परंतु तो म्हणला की २०१२ इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करेल. निवृत्तीच्या वेळी कसोटी क्रिकेट मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता तर सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू होता.[२०३]
जुलै २०१४, मध्ये तो एमसीसीच्या बाजूने लॉर्डस् वर द्विशतसांवत्सरिक उत्सव सामना खेळला[२०४]
ट्वेंटी२० कारकीर्द संपादन
| राहुल द्रविडची ट्वेंटी२० सामन्यांतील कामगिरी | ||||||
|---|---|---|---|---|---|---|
| लीग | सामने | धावा | सर्वाधिक | १०० | ५० | सरासरी. |
| आंतरराष्ट्रीय टी२०[२०५] | १ | ३१ | ३१ | ० | ० | ३१.०० |
| इंडियन प्रीमियर लीग[२०६] | ८९ | २१७४ | ७५* | ० | ११ | २८.२३ |
| चॅंपियन्स लीग ट्वेंटी२०[२०७] | १५ | २८२ | ७१ | ० | १ | २३.५० |
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून राहुल द्रविड आयपीएलच्या २००८, २००९ आणि २०१० च्या मोसमात खेळला. त्यानंतर तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला. २०१३ च्या मोसमात त्याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना संघाला आयपीएल २०१३ च्या प्ले ऑफ फेरीपर्यंत तर चॅम्पियन्स लीग टी२०, २०१३ मध्ये अंतिम सामन्यापर्यंत नेले. चॅम्पियन्स लीग ट्वेंटी२०, २०१३ नंतर त्याने ट्वेंटी२० क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली.[२०८][२०९]
वैयक्तिक जीवन संपादन
४ मे २०१३ रोजी द्रविडचा नागपूर स्थित शल्यविशारद विजेता पेंढारकरशी विवाह झाला.[२१०] त्यांना दोन मुले आहेत: समित, जन्म २००५,[२११] आणि अन्वय, जन्म २००९.[२१२] राहुल मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी ह्या भाषा कुशलतेने बोलू शकतो.
खेळाची शैली संपादन
द्रविड त्याच्या तंत्रशुद्धतेबद्दल ओळखला जातो, आणि भारतीय क्रिकेट संघातील तो एक सर्वोत्तम खेळाडू होता. सुरुवातीला, तो त्याच्या बचावात्मक तंत्रामुळे कसोटी क्रिकेटपुरता मर्यादित फलंदाज म्हणून ओळखला जात असे, आणि कमी स्ट्राईक रेट मुळे त्याला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. परंतू, कारकिर्दीच्या काळात तो एकदिवसीय सामन्यांमध्ये सुद्धा धावा करू लागला आणि त्याने आयसीसी प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार सुद्धा प्राप्त केला होता. रिबॉकच्या एका जाहिरातमध्ये त्याला 'द वॉल' हे नाव वापरले गेले होते, आणि आता तेच त्याचे टोपणनाव झाले आहे. द्रविडने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १६४ कसोटी सामन्यांमध्ये ५२.३१ च्या सरासरीने १३,२८८ धावा केल्या आणि ३६ शतके झळकावली ज्यामध्ये ५ द्विशतकांचा समावेश आहे. ३४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३९.१६ची सरासरी आणि ७१.२४ च्या स्ट्राईक रेटने १०,८८९ धावा केल्या.[२०५] घरच्या मैदानांपेक्षा परदेशी जास्त कसोटी सरासरी असणाऱ्या फारच थोड्या भारतीय फलंदाजांपैकी एक राहुल द्रविड आहे. भारताने जिंकलेल्या सामन्यांचा विचार केला, तर द्रविडची कसोटी मधील सरासरी आहे. ६५.७८ [२१३] आणि एकदिवसीय सामन्यांमधील सरासरी आहे ५०.६९.[२१४]
२००१-२००२ च्या वेस्ट इंडीज मालिकेमध्ये द्रविडने त्याचा एकमेव कसोटी बळी रिडले जेकब्सला बाद करून घेतला. द्रविडने अनेकदा भारतीय संघासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षण केले आहे.
एकदिवसीय क्रिकेट मधील दोन मोठ्या भागीदाऱ्यांमध्ये द्रविडचा समावेश आहे: सौरव गांगुलीसोबत ३१८ धावा (३०० पेक्षा जास्त धावा करणारी ही पहिलीच जोडी होती), आणि नंतर सचिन तेंडूलकरसोबत ३३१ धावांची भागीदारी जो एक विश्वविक्रम होता. पदार्पणानंतर शून्यावर बाद होण्यापूर्वी सर्वात जास्त डाव खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी १५३ धावांची आणि कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी २७० धावांची आहे. त्याच्या कसोटी पाच द्विशतकांची प्रत्येक खेळी ही त्याच्या आधीच्या द्विशतकीय खेळी पेक्षा मोठी आहे. (२००*, २१७, २२२, २३३, २७०).
एका कर्णधाराच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या सामन्यांमध्ये, सर्वात जास्त धावांच्या टक्केवारीचा विक्रमही द्रविडच्या नावावर आहे.[२१५] सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने २१ कसोटी सामने जिंकले ज्यामध्ये द्रविडने १०२.८४ च्या सरासरीने २५७१ धावा केल्या, ज्यामध्ये ३२ डावांत त्याने ९ शतके (३ द्विशतके सामाविष्ट) आणि १० अर्धशतके केली. ह्या २१ सामन्यांमध्ये त्याने संघाच्या धावसंख्येच्या २३% धावा केल्या.
सन २००० मध्ये त्याला विस्डेन क्रिकेटर म्हणून गौरवण्यात आले होते. प्रथमतः बचावात्मक शैलीचा फलंदाज असूनही त्याने १५ नोव्हेंबर २००३ मध्ये न्यू झीलंड विरुद्ध २२ चेंडूंमध्ये अर्धशतक केले (स्ट्राइक रेट: २२७.२७). हे भारतीय फलंदाजांमध्ये दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे.
सन २००४ मध्ये, द्रविडला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ७ सप्टेंबर २००४ मध्ये त्याला पहिल्या प्लेयर ऑफ द इयर पुरस्कारने आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने टेस्ट प्लेयर ऑफ द इयरने सन्मानित केले. १८ मार्च २००६ रोजी मुंबई मध्ये द्रविड त्याचा १०० वा कसोटी सामना खेळला.
२००६ मध्ये, घोषित करण्यात आले की वेस्ट इंडीज मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक, २००७ पर्यंत तो भारतीय संघाचा कर्णधार असेल.
परंतू इंग्लंड दौऱ्यानंतर वैयक्तिक कारणांमुळे तो कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्याच्याऐवजी महेंद्रसिंग धोणी एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि अनिल कुंबळे कसोटी क्रिकेट मध्ये कर्णधार झाले.
ऑस्ट्रेलियामधील खराब कामगिरीनंतर २००७ मध्ये, त्याला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्याने कर्नाटक कडून मुंबईविरुद्ध रणजी करंडक सामन्यात खेळताना २१८ धावा केल्या.
सन २००८, मध्ये पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात सामन्यातील सर्वाधिक ९३ धावा केल्या, ज्यामुळे भारताने कसोटी जिंकून मालिकेत १-२ अशी मजल मारली. परंतु निवड समितीने त्यानंतरच्या त्रिकोणी एकदिवसीय मालिकेसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
२००८ मधील कसोटी सामन्यांमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर द्रविड निवृत्त किंवा वगळला जाण्याबाबत प्रसारमाध्यमांच्या दबावाखाली आला. मोहालीमधील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये त्याने १३६ धावा केल्या आणि गौतम गंभीरसोबत त्रिशतकी भागीदारी केली.
कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर, तो म्हणाला, "हा खरंच एक अभिमानाचा क्षण आहे. माझ्यासाठी, मोठा होत असताना, मी भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले. मी मागे वळून पाहतो तेव्हा, मी गेल्या १०-१२ वर्षात जे केले त्यावरून कदाचित मी माझ्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी केले आहे. मला कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती कारण मी कधीच विश्वास ठेवला नाही - ते फक्त माझ्या खेळाच्या दीर्घयुष्याचे प्रतिबिंब आहे."[२१६]
फलंदाजीच्या एकाच क्रमांकावर १०००० धावा करणाऱ्या दोन पैकी द्रविड हा एक फलंदाज आहे, आणि कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज आहे.
वादविवाद संपादन
चेंडू फेरफार घटना संपादन
जानेवारी २००४ मध्ये, झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये चेंडू फेरफार करण्यावरूण द्रविडला दोषी मानले गेले. सामनाधिकारी क्लाईव्ह लॉईडच्या निर्णयानुसार द्रविडने जाणीवपुर्वक चेंडूवर दाब दिला, परंतु द्रविडने स्वतः त्याचा असा हेतू नसल्याचे सांगितले.[२१७] लॉईड यांनी आपल्या शब्दांना दुजोरा देताना सांगितले की, मंगळवारी रात्री झिम्बाब्वेच्या डावादरम्यान, चेंडूवर lozenge ठेवताना द्रविड चित्रफितीमध्ये दिसत आहे.[२१७] आयसीसीच्या आचारसंहितेनुसार चेंडूवर घाम आणि थुंकीशिवाय कोणताही पदार्थ लावण्यास खेळाडूंना परवानगी नाही.[२१७] द्रविडला सामन्याच्या ५०% मानधनाचा दंड ठोठावण्यात आला.[२१७]
भारतीय संघाचे प्रशिक्षक जॉन राईट द्रविडला पाठीशी घालताना म्हणाले "ती एक निष्पाप चूक होती". राईट यांनी दावा केला कि द्रविड चेंडूवर थुंकी लावत असताना तो चघळत असलेल्या losengeचा एक भात चेंडूवर चिकटला; आणि द्रविड तो पुसण्याचा प्रयत्न करत होता.[२१८] आयसीसीच्या नियमानुसार द्रविडला ह्या विषयावर भाष्य करण्याबाबत प्रतिबंध होता, परंतु माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने द्रविडच्य ह्या क्रियेचा उल्लेख "एक अपघात" असा केला.[२१८]
मुलतान डाव घोषणा संपादन
द्रविडने सर्वात जास्त चर्चा झालेल्या एक निर्णय मार्च २००४ मध्ये घेतला होता, त्यावेळी तो जायबंदी सौरव गांगुली ऐवजी नेतृत्व करत होता. भारताने पहिला डाव घोषित केला तेव्हा सचिन तेंडूलकर १९४ धावांवर खेळत होता आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपायला १६ षटकांचा अवकाश होता.[२१९]
इतर उल्लेखनीय घटना संपादन
कसोटी क्रिकेट मध्ये भारताचे नेतृत्व करताना राहुल द्रविडला संमिश्र यश मिळाले. २००६ मध्ये भारताने कराची कसोटी गमावली आणि पाकिस्तानने मालिका १-० अशी जिंकली. परंतु बऱ्याच भारतीय फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे हा पराभव झाला होता.
मार्च २००६ मध्ये, भारताने इंग्लंडविरुद्ध भारतामध्ये १९८५ नंतर पहिलीच कसोटी मुंबई येथे गमावली आणि मालिका १-१ अशी अनिर्णित राहिली. मुंबईतील पराभव हा सपाट आणि कोरड्या खेळपट्टीवर द्रविडने नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेल्या गोलंदाजीच्या चुकीच्या निर्णयामुळे झाल्याबद्दल वाद आहेत. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पूर्णपणे ढासळली. योगायोगाने हा द्रविडचा १०० वा कसोटी सामना होता आणि भारतीय संघ दुसऱ्या डावात १०० धावांवर बाद झाला.[२२०]
२००८ आयपीएल मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ सहभागी आठ संघांमध्ये, सातव्या स्थानावर राहिल्यानंतर, विजय मल्ल्याने त्याच्यावर संतुलित संघ न निवडल्याबद्दल टिका केली होती.[२२१]
भारत डीएलफ चषकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र होवू न शकल्यानंतर, माजी अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्रीने कप्तान द्रविडवर टीका केली. तो म्हणाला, द्रविड पुरेसा खंबीर नव्हता आणि त्याने ग्रेग चॅपेलला बरेस निर्णय घ्यायला लावले.[२२२] ह्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर द्रविड म्हणाला की शास्री हा एक 'न्याय टीकाकार' आहे परंतु संघाचे आतील निर्णय घेऊ शकत नाही.[२२३]
कर्णधार म्हणून कामगिरी संपादन
राहुल द्रविडची भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक यशस्वी फलंदज अशी ओळख आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणूनही तो यशस्वी ठरला. २००५ मध्ये भारतीय कसोटी संघाच्या नायकपदाची धुरा राहुल द्रविडवर सोपवण्यात आली. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २५ कसोटी सामने खेळले आणि यापैकी ८ सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी ठरला, तर ६ सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. ११ कसोट्या अनिर्णित राहिल्या. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची कमाल करून दाखवली.
काही क्रिकेट तज्ञांच्या मानण्यानुसार संपूर्ण कारकिर्दीत द्रविड सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग या खेळाडूंमुळे थोडासा झाकोळला गेला. ज्या खेळपट्टीवर बाकीचे भारतीय खेळाडू नांगी टाकत, अशा ठिकाणी द्रविडने अनेक शतके झळकावली आहेत; अनेक कसोटी सामने एकहाती वाचवले आहेत आणि अनेक कसोट्या जिंकवल्या देखील आहेत; संघाच्या गरजेनुसार यष्टीरक्षणाचे महत्त्वाचे काम केले आहे; कधी भारताच्या फलंदाजीची सुरुवात केली आहे.
२०११ - १२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात राहुल द्रविडची कामगिरी चांगली झाली नव्हती. ९ मार्च २०१२ रोजी बंगळुरुमध्ये पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याआधीच त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.
कसोटी सामने संपादन
| कोष्टकः प्रतिस्पर्धी संघानुसार कसोटी निकाल[२२४] | ||||||
|---|---|---|---|---|---|---|
| प्रतिस्पर्धी | कालावधी | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णित |
| साचा:Cr | २००६–२००७ | ६ | २ | १ | ० | ३ |
| साचा:Cr | २००४–२००६ | ५ | १ | २ | ० | २ |
| साचा:Cr | २००६–२००६ | ४ | १ | ० | ० | ३ |
| साचा:Cr | २००६–२००७ | ३ | १ | २ | ० | ० |
| साचा:Cr | २००४–२००४ | २ | १ | १ | ० | ० |
| साचा:Cr | २००५–२००५ | २ | १ | ० | ० | १ |
| साचा:Cr | २००७–२००७ | २ | १ | ० | ० | १ |
| साचा:Cr | २००३–२००३ | १ | ० | ० | ० | १ |
| एकूण | २००३–२००७ | २५ | ८ | ६ | ० | ११ |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने संपादन
| कोष्टकः प्रतिस्पर्धी संघानुसार एकदिवसीय निकाल[२२५][२२६] | ||||||
|---|---|---|---|---|---|---|
| प्रतिस्पर्धी | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णित | |
| साचा:Cr | १६ | ८ | ६ | ० | २ | |
| साचा:Cr | १६ | ८ | ८ | ० | ० | |
| साचा:Cr | १३ | ९ | ४ | ० | ० | |
| साचा:Cr | ९ | ५ | ४ | ० | ० | |
| साचा:Cr | ९ | ४ | ५ | ० | ० | |
| साचा:Cr | ६ | १ | ४ | ० | १ | |
| साचा:Cr | ३ | ३ | ० | ० | ० | |
| साचा:Cr | ३ | २ | १ | ० | ० | |
| साचा:Cr | २ | ० | १ | ० | १ | |
| साचा:Cr | १ | १ | ० | ० | ० | |
| साचा:Cr | १ | १ | ० | ० | ० | |
| एकूण | ७९ | ४२ | ३३ | ० | ४ | |
आकडेवारी संपादन
कसोटी क्रिकेट संपादन
- वर्षान्वये
| वर्ष | सामने | धावा | सरासरी | १०० | ५० | सर्वोच्च |
|---|---|---|---|---|---|---|
| १९९६ | ७ | ४३६ | ३९.६३ | ० | ३ | ९५ |
| १९९७ | १२ | ९८४ | ६१.५ | १ | ९ | १४८ |
| १९९८ | ५ | ४१३ | ४५.८८ | १ | ३ | ११८ |
| १९९९ | १० | ८६५ | ४८.०५ | ४ | १ | १९० |
| २००० | ६ | ६२४ | ७८ | २ | १ | २००* |
| २००१ | १३ | ९३५ | ४६.७५ | १ | ६ | १८० |
| २००२ | १६ | १३५७ | ५९ | ५ | ५ | २१७ |
| २००३ | ५ | ८०३ | १००.३७ | २ | ३ | २३३ |
| २००४ | १२ | ९४६ | ६३.०६ | २ | ४ | २७० |
| २००५ | ८ | ६४० | ५३.३३ | २ | ४ | १३५ |
| २००६ | १२ | १०९५ | ६०.८३ | ३ | ७ | १४६ |
| २००७ | १० | ६०६ | ३५.६४ | १ | ३ | १२९ |
| २००८ | १५ | ८०५ | ३०.९६ | २ | ४ | १३६ |
| २००९ | ६ | ७४७ | ८३ | २ | ५ | १७७ |
| २०१० | १२ | ७७१ | ४२.८३ | ३ | १ | १९१ |
| २०११ | १२ | ११४५ | ५७.२५ | ५ | ४ | १४६* |
| २०१२ | ३ | ११६ | १९.३३ | ० | ० | ४७ |
- ठिकाणानुसार
| ठिकाण | सामने | धावा | सरासरी | १०० | ५० | सर्वोच्च |
|---|---|---|---|---|---|---|
| मायदेशी | ७० | ५५९८ | ५१.३५ | १५ | २७ | २२२ |
| परदेशी | ९४ | ७६९० | ५३.०३ | २१ | ३६ | २७० |
संदर्भ:[२२७]
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट संपादन
- वर्षान्वये
| वर्ष | सामने | धावा | सरासरी | १०० | ५० | सर्वोच्च |
|---|---|---|---|---|---|---|
| २०११ | १ | ३१ | ३१.०० | ० | ० | ३१ |
- ठिकाणानुसार
| ठिकाण | सामने | धावा | सरासरी | १०० | ५० | सर्वोच्च |
|---|---|---|---|---|---|---|
| परदेशी | १ | ३१ | ३१.०० | ० | ० | ३१ |
संदर्भ:[२२८]
एकदिवसीय क्रिकेट संपादन
- वर्षान्वये
| वर्ष | सामने | धावा | सरासरी | १०० | ५० | सर्वोच्च |
|---|---|---|---|---|---|---|
| १९९६ | २० | ४७५ | २७.९४ | ० | ३ | ९० |
| १९९७ | ३१ | ९५१ | ३९.६२ | १ | ८ | १०७ |
| १९९८ | १४ | २८३ | २१.७६ | ० | १ | ६४ |
| १९९९ | ४३ | १७६१ | ४६.३४ | ६ | ८ | १५३ |
| २००० | ३१ | ९८० | ३५.०० | ० | ९ | ८५ |
| २००१ | २४ | ७४० | ४३.५२ | ० | ६ | ८० |
| २००२ | २८ | ९१३ | ४८.०५ | १ | ७ | १०९* |
| २००३ | २३ | ६२३ | ४१.५३ | ० | ४ | ६२ |
| २००४ | ३१ | १०२५ | ३९.४२ | १ | १० | १०४ |
| २००५ | ३० | १०९२ | ४७.४७ | २ | ९ | १०४ |
| २००६ | २७ | ९१९ | ३५.३४ | १ | ८ | १०५ |
| २००७ | ३१ | ८२३ | ३७.४० | ० | ८ | ९२* |
| २००९ | ६ | १८० | ३६.०० | ० | १ | ७६ |
| २०११ | ५ | १२४ | २४.८० | ० | १ | ६९ |
- ठिकाणानुसार
| ठिकाण | सामने | धावा | सरासरी | १०० | ५० | सर्वोच्च |
|---|---|---|---|---|---|---|
| मायदेशी | ९७ | ३४०६ | ४३.११ | ६ | २४ | १५३ |
| परदेशी | १२० | ४०४४ | ४१.२६ | २ | ३७ | १२३* |
| तटस्थ | १२७ | ३४३९ | ३४.०४ | ४ | २२ | १४५ |
संदर्भ:[२२९]
चरित्रे संपादन
राहुल द्रविड आणि त्याच्या कारकिर्दीवर दोन चरित्रे लिहीली गेली आहेत:
- राहुल द्रविड – अ बायोग्राफी लेखकः वेदम जयशंकर (ISBN 978-81-7476-481-2). प्रकाशकः युबीएसपीडी प्रकाशन. दिनांकः जानेवारी २००४[२३०]
- द नाईस गाय हु फिनीश फर्स्ट लेखकः देवेंद्र प्रभुदेसाई. प्रकाशकः रुपा प्रकाशन. दिनांकः नोव्हेंबर २००५[२३१]
द्रविडवरील लेख, मुलाखती, प्रशंसापत्रे यांचे संकलन करून इएसपीएन क्रिकइन्फोने राहुल द्रविड: टाइमलेस स्टील नावाने एक पुस्तक प्रकाशिक केले.
इतर कामे संपादन
कमर्शियल एन्डोर्समेंट्स संपादन
- रिबॉक: १९९६ – सद्य[२३२]
- पेप्सीको: १९९७ – सद्य[२३३]
- किसान: अज्ञात[२३४]
- कॅस्ट्रॉल: २००१ – सद्य[२३५]
- हच: २००३साचा:Citation needed
- कर्नाटक टुरिझम: 2004[२३६]
- मॅक्स लाईफ: २००५ – सद्य[२३७]
- बँक ऑफ बडोदा: २००५ – सद्य[२३८]
- सिटीझन: २००६ – सद्य[२३९]
- स्कायलाईन कन्स्ट्रक्शन: २००६ – सद्य[२४०]
- सॅनसुई: २००७[२४१]
- जिलेट: २००७ – सद्य[२४२]
- सॅमसंग: २००२[२४३] – २००४[२४४]
- वर्ल्ड ट्रेड सेंटर नॉयडा: २०१३ – सद्य[२४५]
सामाजिक बांधिलकी संपादन
- चिल्ड्रेन्स मुव्हमेंट फॉर सिवीक अवेयरनेस (CMCA)[२४६][२४७]
- युनीसेफ सपोर्टर ॲंड एड्स अवेयरनेस कॅम्पेन [२४८]
पुरस्कार संपादन
- १९९८ - अर्जुन पुरस्कार
- २००० - विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर
- २००४ - आयसीसी (ICC) टेस्ट प्लेयर ऑफ द इयर
- २००४ - आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर
- २००४ - पद्मश्री पुरस्कार
- २००६ - कॅप्टन ऑफ द आयसीसी टेस्ट टीम
- २०११ - पॉली उम्रीगर पुरस्कार
- २०१३ - पद्मभूषण पुरस्कार[२४९]
- २०१७- आय.सी.सी हॉल ऑफ फेम मधे समविष्ट
हे सुद्धा पहा संपादन
संदर्भ आणि नोंदी संपादन
साचा:क्रम साचा:५०च्या वर कसोटी सामन्यांची सरासरी असलेले भारतीय फलंदाज साचा:१०००० धावा एकदिवसीय सामने साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९९ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ साचा:रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग साचा:राजस्थान रॉयल्स संघ
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ९.० ९.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ भारताच्या ऑलिंपिक क्षमता असलेल्या खेळाडूंना राहुल द्रविडचे मार्गदर्शन.
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ २१.० २१.१ २१.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ३०.० ३०.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ३१.० ३१.१ ३१.२ ३१.३ ३१.४ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ ३५.० ३५.१ ३५.२ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ ३६.० ३६.१ ३६.२ ३६.३ ३६.४ ३६.५ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ५२.० ५२.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ६७.० ६७.१ ६७.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ६९.० ६९.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ८०.० ८०.१ ८०.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ८१.० ८१.१ ८१.२ ८१.३ ८१.४ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ८३.० ८३.१ ८३.२ ८३.३ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ८४.० ८४.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ११४.० ११४.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ १२४.० १२४.१ १२४.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ १२५.० १२५.१ १२५.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ १२८.० १२८.१ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ १३१.० १३१.१ १३१.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ नाटवेस्ट मालिका, २रा सामना, इंग्लंड वि. भारत, लॉर्डस्, जून २९, २००२
- ↑ नाटवेस्ट मालिका, ६वा सामना, भारत वि. श्रीलंका, बर्मिंगहॅम, जूलै १३, २००२
- ↑ नाटवेस्ट मालिका, अंतिम सामना, इंग्लंड वि. भारत, लॉर्डस्, जून २९, २००२
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ भारतीय संघाचा इंग्लंड दौरा, हॅम्पशायर वि. भारतीय, साउथॅम्प्टन, जुलै २०-२२, २००२
- ↑ भारतीय संघाचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी: इंग्लंड वि. भारत, लॉर्डस्, जुलै २५-२९, २००२
- ↑ भारतीय संघाचा इंग्लंड दौरा, २री कसोटी: इंग्लंड वि. भारत, नॉटिंगहॅम, ऑगस्ट ८-१२, २००२
- ↑ १५७.० १५७.१ भारतीय संघाचा इंग्लंड दौरा, ४थी कसोटी: इंग्लंड वि. भारत, लीड्स, सप्टेंबर ५-९, २००२
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ भारताचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी: इंग्लंड वि. भारत, लॉर्डस्, जूलै २१-२५, २०११| धावफलक. इएसपीएन क्रिकइन्फो.
- ↑ भारताचा इंग्लंड दौरा, २री कसोटी: इंग्लंड वि. भारत, नॉटिंगहॅम, जूलै २९ – ऑगस्ट १, २०११. इएसपीएन क्रिकइन्फो.
- ↑ भारताचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी: इंग्लंड वि. भारत, बर्मिंगहॅम, ऑगस्ट १०-१३, २०११. इएसपीएन क्रिकइन्फो.
- ↑ भारताचा इंग्लंड दौरा, ४थी कसोटी: इंग्लंड वि. भारत, ओव्हल, ऑगस्ट १८-२२, २०११. इएसपीएन क्रिकइन्फो.
- ↑ इंग्लंड वि. भारत: इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरल्यानंतर राहुल द्रविड आमच्या आदरास पात्र आहे. टेलिग्राफ. २१ ऑगस्ट २०११. (इंग्रजी मजकूर)
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ १९८.० १९८.१ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ राहुल द्रविड बोज आऊट इन स्टाईल – इंडिया रियल टाईम – डब्लूएसजे
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ २०५.० २०५.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ मी टी२० क्रिकेट इतका जास्त खेळू शकेल असे कधीच वाटले नव्हते: राहुल द्रविड, न्यूज – इंडिया टुडे. इंडियाटुडे.इनटुडे.इन (१० जुलै २०१३). (इंग्रजी मजकूर).
- ↑ http://www.firstpost.com/sports/rahul-dravid-leaves-greater-t20-legacy-than-sachin-tendulkar-1156873.html
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ २१७.० २१७.१ २१७.२ २१७.३ साचा:स्रोत बातमी
- ↑ २१८.० २१८.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ राहुल द्रविड कसोटी क्रिकेट आकडेवारी espncricinfo.com वर
- ↑ राहुल द्रविड टी२० क्रिकेट आकडेवारी espncricinfo.com वर
- ↑ राहुल द्रविड एकदिवसीय क्रिकेट आकडेवारी espncricinfo.com वर
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत